
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसेनेच्या उरलेल्या 15 आमदारांना (ShivSena) धन्यवाद व्यक्त करणारे भावनिक पत्र (Letter) पाठवले आहे. शिवसेनेतून एकनाथ शिंदे गटानं बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत फुट पडली आहे. यामुळे आता उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांचा वेगळा गट असं बोलल जातंय. एकनाथ शिंदे गटातील आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलं आणि आपल्याच आमदारांमुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरुन पायऊतार व्हावं लागलं. यातच आता माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उरलेल्या पंधरा आमदारांना भावनिक साद घातली आहे. यावेळी त्यांनी एका पत्राच्या माध्यमातून आपल्या लोकांना भावनिक साद घातली आहे. यात त्यांनी कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडण्याचं आवाहन केलंय. ‘ कोणत्याही धमक्या वा प्रलोभनाला बळी न पडता आपण निष्ठेने शिवसेनेसोबत राहिलात, आपल्या या भूमिकेमुळे महाराष्ट्राला अभिमान वाटला व शिवसेनेस बळ मिळाले,’ असं पत्रात उद्धव ठाकरे यांनी नमुद केलंय.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या पत्रात म्हटलंय की, ‘शिवसेना हा आपला परिवार आहे. आजही वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हेच आपले सर्वस्व आहे. निष्ठा व अस्मितेची महती हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखांनीच आपल्याला शिकवली. आईच्या दुधाशी बेईमानी करु नका हा त्यांचा निष्ठेबाबतचा मंत्र आजही सगळ्यांना सन्माननीय. शिवसेनेचे आमदार म्हणून आपण त्या निष्ठेचे पालन केलेत व वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे पाईक असल्याचे दाखवून दिलेत. कोणत्याही धमक्या वा प्रलोभनाला बळी न पडता आपण निष्ठेने शिवसेनेसोबत राहिलात, आपल्या या भूमिकेमुळे महाराष्ट्राला अभिमान वाटला व शिवसेनेस बळ मिळाले.’