उद्धव ठाकरे मुख्यमंत्री, तर जयंत पाटील आणि बाळासाहेब थोरात उपमुख्यमंत्री?

| Updated on: Nov 26, 2019 | 5:59 PM

"उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री असतील, ते बैठकीला उपस्थित होते, त्यांनी होकार दिला आहे. उद्धव ठाकरे राज्यपाल यांच्याकडे सरकारस्थापनेचा दावा करण्यास जाणार आहेत", असं नवाब मलिक यांनी सांगितलं.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री, तर जयंत पाटील आणि बाळासाहेब थोरात उपमुख्यमंत्री?
Follow us on

मुंबई : देवेंद्र फडणवीस यांचं सरकार अवघ्या 4 दिवसात कोसळल्यानंतर महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं (Uddhav Thackeray Maharashtra CM) महाविकासआघाडीचं (Uddhav Thackeray Maharashtra CM) सरकार येणार हे जवळपास निश्चित झालं आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर, देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याकडे बहुमत नसल्याचं मान्य केलं. त्यानंतर त्यांनी राजभवनावर जाऊन मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे फडणवीसांच्या नेतृत्त्वातील सरकार अवघ्या 79 तासात कोसळलं.

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाविकासआघाडीकडून आज नेतानिवड केली जाणार आहे. यापूर्वी 22 नोव्हेंबरला ठरल्याप्रमाणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावाला सर्वसंमती असल्याची माहिती, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली होती. आज त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची चिन्हं आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनीही उद्धव ठाकरेच हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, असं सांगितलं. “उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री असतील, ते बैठकीला उपस्थित होते, त्यांनी होकार दिला आहे. उद्धव ठाकरे राज्यपाल यांच्याकडे सरकारस्थापनेचा दावा करण्यास जाणार आहेत”, असं नवाब मलिक यांनी सांगितलं.

उद्धव मुख्यमंत्री, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात उपमुख्यमंत्री?

दरम्यान, महाविकासाआघाडीकडून शिवसेनेचा मुख्यमंत्री तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपदं मिळणार आहेत. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री तर जयंत पाटील आणि बाळासाहेब थोरात हे दोघे उपमुख्यमंत्री असतील असं सांगण्यात येत आहे.

राज्यपालांनी विशेष अधिवेशन बोलावलं

राज्यपालांनी विधानसभेचं विशेष सत्र उद्या (27 नोव्हेंबर) सकाळी 8 वाजता बोलावलं आहे. यावेळी विधानसभेतील सर्व सदस्यांचा शपथविधी पार पडेल. हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर सदस्यांना आमदारकीची शपथ देतील. त्यानंतर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस यांच्या महाविकासआघाडीला बहुमत सिद्ध करावं लागेल.

देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचा राजीनामा

दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis press conference) यांनी विश्वासदर्शक ठरावापूर्वी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं. या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांनी राजीनामा दिल्यामुळे, आमच्याकडे बहुमत नाही, त्यामुळे मी राजीनामा देत आहे, असं सांगितलं. त्यामुळे अवघ्या चौथ्या दिवशी देवेंद्र फडणवीस सरकार कोसळले. बहुमतासाठी आवश्यक आमदार आमच्याकडे नाहीत त्यामुळे मी राजीनामा देतं आहे, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली.