Uddhav Thackeray : ‘त्यांच्या डोक्यात केमिकल लोच्या झालाय’, उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल, मुन्नाभाई संबोधत जोरदार टोलेबाजी

'लगे रहो मुन्नाभाई' या चित्रपटाचा उल्लेख करत उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंवर जोरदार टोलेबाजी केली. 'चित्रपटाच्या शेवटी त्या मुन्नाभाईला कळतं की साला अपुनके भेजेमे केमिकल लोचा हुआ है. तर ही केमिकल लोचाची केस आहे', अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी राज यांच्यावर केलीय.

Uddhav Thackeray : त्यांच्या डोक्यात केमिकल लोच्या झालाय, उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल, मुन्नाभाई संबोधत जोरदार टोलेबाजी
उद्धव ठाकरे यांची राज ठाकरेंवर टीका
Image Credit source: TV9
sagar joshi | Updated on: May 14, 2022 | 9:59 PM

मुंबई : राज्यात सध्या हिंदुत्वाच्या (Hindutva) मुद्द्यावरुन शिवसेना विरुद्ध मनसे आणि भाजप असं चित्र पाहायला मिळत आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडव्याला घेतलेल्या सभेत मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केलीय. राज यांच्या टीकेला शनिवारी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलंय. ‘लगे रहो मुन्नाभाई’ या चित्रपटाचा उल्लेख करत उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंवर जोरदार टोलेबाजी केली. ‘चित्रपटाच्या शेवटी त्या मुन्नाभाईला कळतं की साला अपुनके भेजेमे केमिकल लोचा हुआ है. तर ही केमिकल लोचाची केस आहे’, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी राज यांच्यावर केलीय.

राज ठाकरेंना जोरदार टोला

उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘मला एका शिवसैनिकांने विचारलं साहेब तुम्ही लगे रहो मुन्नाभाई पाहिला का? म्हटलं थोडासा पाहिला, का रे? त्यात नाही तो संजय दत्तला गांधीजी दिसतात, मग तो गांधीगिरी करायला लागतो. मी म्हटलं मग, त्यावर तो म्हणतो तशी एक केस आहे आपल्याकडे. ती नाही का, ज्याला स्वत:ला बाळासाहेब झाल्यासारखं वाटतं. शाल घेऊन फिरतात म्हणे हल्ली. मग कधी मराठीच्या नादाला लागतात, कधी हिंदुत्वाच्या नादाला लागतात. म्हटलं अरे चित्रपटातला मुन्नाभाई लोकांचं भलं तरी करत होता, हा कुठला मुन्नाभाई काढलास तू? तो म्हणाला तसं नाही… चित्रपटाच्या शेवटी त्या मुन्नाभाईला कळतं की साला अपुनके भेजेमे केमिकल लोचा हुआ है… तर ही केमिकल लोचाची केस आहे. हा पिक्चर सत्य घटनेवर आधारीत आहे. असे अनेक मुन्नाभाई फिरतात फिरू द्या. आता कुणाला अयोध्येला जायचं आहे जाऊ द्या’.

‘आम्ही कधी हिंदुत्वाचं भांडवल केलं नाही’

‘आदित्य अयोध्येला जाणार आहे. गेल्या आठवड्यात तिरुपतीला गेला होता. पण आपण अयोध्येत गेलो होतो. तेव्हा प्रश्न सुटला नव्हता. मी तुमच्या साक्षीने सांगितलं मी अयोध्येला जाणार. मी बोललो तेव्हा वादळ सुटलं होतं. विजा चमकत होत्या. भगवे मशाली सारखे फडफडत होते, आहे ना लक्षात. काय ते दैवी चित्रं होतं. जाण्यापूर्वी माझ्या लक्षात आलं राम जन्मभूमीवर जाताना शिवजन्मभूमीची माती घ्यावी. अयोध्येला गेलो मातीचा कलश दिला. तेव्हा आमची मागणी होती खास कायदा करा आणि राम मंदिर करा. एक वर्ष गेलं. नोव्हेंबप 2018 ला आपण अयोध्येला गेलो. 2019 ला अयोध्येचा निकाल बाजूने आला. त्याच वर्षी मी मुख्यमंत्री झालो. ही पूर्वजांची पुण्याई आहे. आजोबांचे आशीर्वाद, आईवडिलांचे आशीर्वाद आहेत. त्याचं भांडवल केलं नाही, असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

उद्धव ठाकरेंचं भाजपसह विरोधकांना आवाहन

आम्ही संयम बाळगतो म्हणजे नामर्दाची अवलाद नाही. एकतर आम्ही अंगावर जात नाही आणि अंगावर आले तर सोडत नाही. हे आमचं हिंदुत्व आहे, लक्षात ठेवा. आम्ही तुमच्या कुटुंबीयांची निंदानालस्ती केली नाही. भ्रष्टाचारी आहात पण म्हटलं नाही. एक एक प्रकरण येत आहे. तुम्ही का बदनाम करत आहात? महाराष्ट्राला का बदनाम करता? मी सुसंस्कृतपणे सांगतो या एकत्र बसू महाराष्ट्राला पुढे नेऊ. या… असं आवाहनही उद्धव ठाकरे यांनी भाजपला केलं आहे.

Follow Us