Uddhav Thackeray : शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार, महाविकास आघाडीचा प्रयोग फसला नाही; सर्वांच्या मनातील प्रश्नाला उद्धव ठाकरेंचे थेट उत्तर

| Updated on: Jul 27, 2022 | 10:42 AM

Uddhav Thackeray : भाजपबरोबर सत्तेत असताना भाजप त्रास देत असल्याचा दावा केला जात होता. भाजप नको असं सांगणारे हेच लोक होते. भाजप गावागावात शिवसेनेला काम करू देत नाही, असं हेच सांगायचे. भाजप शिवसेनेला संपवतेय असा त्यांचा दावा होता.

Uddhav Thackeray : शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार, महाविकास आघाडीचा प्रयोग फसला नाही; सर्वांच्या मनातील प्रश्नाला उद्धव ठाकरेंचे थेट उत्तर
शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार, महाविकास आघाडीचा प्रयोग फसला नाही; सर्वांच्या मनातील प्रश्नाला उद्धव ठाकरेंचे थेट उत्तर
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: शिवसेनेतून (shivsena) आमदार आणि खासदार फुटल्यानंतर आता शिवसेनेचं कसं होणार? शिवसेना टिकणार की संपणार असे प्रश्न सातत्याने विचारले जात आहेत. एवढी मोठी फूट पडल्यानंतर आता भविष्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार नाही. शिवसेनेचा महाविकास आघाडीसोबतचा (mahavikas aghadi)  प्रयोग फसला आहे, असंही बोललं जात होतं. मात्र, या सर्व प्रश्नाला खुद्द माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे. शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार आहे. विधानसभा निवडणुका होऊ द्या, शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवतो, असं उद्धव ठाकरे (uddhav thackeray) म्हणाले. तसेच महाविकास आघाडीचा प्रयोग फसला नाही. लोकांनी या प्रयोगाचं स्वागतच केलं आहे, असा दावाही त्यांनी केला आहे. दैनिक सामनाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपले सडेतोड विचार मांडले. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार तोंडसुख घेतलं आहे.

सत्ता येते आणि जाते. परत सत्ता येत असते. माझ्यासाठी म्हणाल, तर सत्ता असली काय आणि नसली काय मला काहीच फरक पडत नाही. शिवसेनेचा मुख्यमंत्री परत होणार. नाही तर माझ्या लढाईला अर्थ काय? मी मुख्यमंत्री होईल असं मी बोललो नव्हतो. आणि वचन पूर्ण केल्यानंतर सुद्धा मी काय दुकान बंद करून बसेन? मला शिवसेना वाढवायची आहे. शिवेसना वाढवण्याचा प्रयत्न मी सोडणार असेल तर माझ्या शिवसेना पक्षप्रमुखपदाला काय अर्थ? असा सवाल त्यांनी केला. सध्या शिवसैनिकांकडूनच शिवसेना संपवली जात आहे. पण जे गेले ते शिवसैनिक नाहीत हे लक्षात घ्या, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

हे सुद्धा वाचा

डोळ्यात डोळे घालून बोला

उद्धव ठाकरे आमचं म्हणणं ऐकून घेत नव्हते. आमच्या समस्या सोडवल्या जात नव्हत्या, असा दावा बंडखोर आमदारांनी केला आहे. त्यालाही उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे. मी सर्व आमदारांच्या बैठका सुरू केल्या होत्या. आमदार आणि प्रशासानाच्या अधिकाऱ्यांना बसवून या मुलाखती होत होत्या. कुणाचं काम कुठं अडलंय हे मी स्वत: पाहत होतो. विचारत होतो. तिथल्या तिथे सूचना आणि आदेश दिले जात होते. काही अडलंय का हे सुद्धा आमदारांना विचारत होतो. तेव्हा साहेब, काहीच राहिलं नाही. सर्व कामे झाली असं आमदार सांगत होते. आता तुम्ही आम्हाला जसे भेटलात तसे भेटत राहा. आम्हाला काही नको, असं आमदार सांगत होते. आता मात्र आरोप करत आहेत. त्यांनी माझ्या डोळ्यात डोळे घालून बोलावं. बोलण्याची हिंमत दाखवा, असं आव्हानच उद्धव ठाकरे यांनी केलं.

आव्हान म्हणून मुख्यमंत्रीपद स्वीकरलं

शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेन असं वचन मी बाळासाहेबांना दिलं होतं. ते वचन अजूनही अर्धवट आहे. कारण मी मुख्यमंत्री होईल असं म्हणालो नव्हतो. एक आव्हान म्हणून मला हे पद स्वीकारावं लागलं. ठरलेल्या गोष्टी भाजपने नाकारल्या. त्यामुळे मला ते स्वीकारावं लागलं, असं त्यांनी सांगितलं.

म्हणून महाविकास आघाडीचा जन्म झाला

काँग्रेस-राष्ट्रवादीने त्रास दिला असल्याचा दावा बंडखोर आमदारांनी केला होता. तो दावाही त्यांनी खोडून काढला. भाजपबरोबर सत्तेत असताना भाजप त्रास देत असल्याचा दावा केला जात होता. भाजप नको असं सांगणारे हेच लोक होते. भाजप गावागावात शिवसेनेला काम करू देत नाही, असं हेच सांगायचे. भाजप शिवसेनेला संपवतेय असा त्यांचा दावा होता. त्यामुळे आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे गेलो आणि महाविकास आघाडीचा जन्म झाला. आता नेमकं तुम्हाला हवं तरी काय? असा सवाल त्यांनी केला.