Nitin Gadkari letter to Maha CM : …तर महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गांवरील कामांचा विचार करावा लागेल, गडकरींचं मुख्यमंत्र्यांना पत्र, वाचा जसंच्या तसं

| Updated on: Aug 14, 2021 | 12:45 PM

बरेच प्रकल्प पूर्णत्वास आलेले असून, काही प्रगतीपथावर आहेत. मात्र अनेक प्रकल्पांच्या कामांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी अडचणी आणत असल्याचे माझ्या निदर्शनास आलेले आहे, असे गडकरींनी पत्रात म्हटले आहे

Nitin Gadkari letter to Maha CM : ...तर महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गांवरील कामांचा विचार करावा लागेल, गडकरींचं मुख्यमंत्र्यांना पत्र, वाचा जसंच्या तसं
नितीन गडकरींचं उद्धव ठाकरेंना पत्र
Follow us on

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना अत्यंत स्फोटक पत्र लिहिलं आहे. शिवसेनेच्या नियमबाह्य कामामुळे आणि दहशतीमुळे रस्त्याची कामं बंद पडतील, असा थेट इशाराच मंत्री नितीन गडकरी यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे. वाशिम जिल्ह्यातील रस्ते कामांना स्थानिक शिवसेना आमदार-खासदारांकडून विरोध होत असल्याचं गडकरी यांनी पत्रात म्हटलं आहे.

नितीन गडकरी यांनी लिहिलेले पत्र वाचा जसेच्या तसे

केंद्राच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयातर्फे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर राष्ट्रीय महामार्गावरील प्रकल्प मंजूर करण्यात आलेले आहेत. त्यापैकी बरेच प्रकल्प पूर्णत्वास आलेले असून, काही प्रगतीपथावर आहेत. मात्र अनेक प्रकल्पांच्या कामांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी अडचणी आणत असल्याचे माझ्या निदर्शनास आलेले आहे. विविध प्रकारच्या नियमबाह्य मागण्यांनी अधिकारी आणि कंत्राटदारांना भंडावून सोडणे आणि त्यांनी न ऐकल्यास कार्यकर्त्यांना चिथावणी देऊन काम बंद पाडण्यापर्यंत या लोकप्रतिनिधींची मजल गेली आहे. विशेषतः वाशिम जिल्ह्यात हे प्रामुख्याने घडते आहे.

1. अकोला आणि नांदेड या 202 किमी राष्ट्रीय महामार्गाच्या लांबीमध्ये चौपदरीकरणाची कामे चार पॅकेजेसमध्ये सुरु आहेत. गेडशी ते वाशिम या पॅकेज-2 मध्ये वाशिम शहरासाठी बायपास (लांबी 12 किमी) निर्माण करण्याचे काम सुद्धा समाविष्ट आहे. परंतु, प्रस्तुत बायपास आणि मुख्य रस्त्याचे काम तेथील शिवसेना लोकप्रतिनिधींनी थांबवले असल्याचे मला सांगण्यात आले आहे.

2. या मतदारसंघात सुरु असलेल्या मालेगाव ते रिसोड या राष्ट्रीय महामार्गेच काम एक पूल वगळता पूर्णत्वास आलेले आहे. या लांबीमध्ये पैनगंगा नदीवर उंच पुलाचे काम अर्धवट स्वरुपात आहे. ते पूर्ण करण्यासाठी कंत्राटदाराला मज्जाव केला जात आहे. काम सुरु केल्यास कार्यकर्ते येऊन धमक्या देतात. त्यामुळे कंत्राटदाराने आहे त्या स्थितीत काम अंतिम करण्याबाबत विनंती केली आहे.

3. पुलगाव-कारंजा-मालेगाव-मेहकर-सिंदखेडराजा हा राष्ट्रीय महामार्ग अतिशय खराब अवस्थेत आहे. त्याच्या दुरुस्तीचे काम (अंदाजे किंमत 135 कोटी) आमच्या मंत्रालयाने हाती घेतले. परंतु वाशिम लोकसभा मतदारसंघातील लांबी वगळता इतर ठिकाणचे काम पूर्णत्वास आलेले आहे. वाशिम जिल्ह्यातील काम, विशेषतः सेलू बाजार गावातून जाणाऱ्या रस्त्याचे काम शिवसेना कार्यकर्त्यांनी थांबवले होते, अशी माहिती मला देण्यात आली. परिसरातील लोकांच्या मागणीनुसार आणि रस्ता धोकादायक स्थितीत असल्यामुळे कंत्राटदाराने पुन्हा काम सुरु केले असता शिवसेना कार्यकर्त्यांनी मशिनरीची जाळपोळ करुन कंत्राटदाराचे अधिकारी-कर्मचारी-कामगार यांच्यात दहशत निर्माण केली. त्यामुळे ते काम पुन्हा बंद झाले आहे.

4. उपरोक्त बाबी लक्षात घेता वाशिम जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील कामे यापुढेही सुरु ठेवावीत की कसे? याबद्दल आमचे मंत्रालय आता गांभीर्याने विचार करत आहे. ही कामे आहे त्या स्थितीत अंतिम केल्यास ती वाहतुकीसाठी धोकादायक ठरतील. अपघाताचे प्रमाण वाढेल आणि त्यामुळे जनतेच्या असंतोषाला तोंड द्यावे लागेल.

5. हे असेच चालत राहिले तर महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गावरील कामे मंजूर करण्याच्या संदर्भात आमच्या मंत्रालयाला विचार करावा लागेल. महाराष्ट्राचे आणि जनतेचे नुकसान होईल.

ही कामे डिस्कोप केली तरी आपण लोकांच्या दृष्टीने अपराधी ठरु. तसे झाले तर महाराष्ट्रातील नागरिक व लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या मनात कायमची खंत राहील. ही कामे पुढे न्यायची असतील तर आपला हस्तक्षेप मला आवश्यक वाटतो. आपण यातून कृपया मार्ग काढावा, अशी माझी विनंती आहे.

गडकरींच्या पत्रावर शिवसेनेकडून पहिली प्रतिक्रिया

शिवसेना नेते वाशिमचे पालकमंत्री आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी याविषयी टीव्ही 9 मराठीशी बातचित केली आहे. वाशिम जिल्ह्याचा पालकमंत्री असून गेल्या दिड ते दोन वर्षात अशा प्रकारची तक्रार आलेली नाही. वाशिमला जात असून सीएमओकडून पत्राबाबत माहिती घेईन, असं शंभूराज देसाई म्हणाले.

संबंधित बातम्या :

उद्धवजी, शिवसेनेच्या नियमबाह्य आणि दहशतीमुळे रस्त्याची कामं बंद पडतील, नितीन गडकरींचं स्फोटक पत्र