MPSCच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न एक महिन्यात सोडवू, स्वप्निल लोणकरच्या आत्महत्येनंतर वडेट्टीवारांचं आश्वासन

| Updated on: Jul 04, 2021 | 8:56 PM

राज्यातील एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न मुख्यमंत्र्यांकडे आग्रहाने लावून धरु आणि एका महिन्यात त्यांचे प्रश्न सोडवू असा दावा वडेट्टीवार यांनी केलाय. विद्यार्थ्यांनी खचून जाऊ नये, सरकार त्यांच्या पाठीशी आहे, असं आश्वासनही वडेट्टीवार यांनी दिलंय.

MPSCच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न एक महिन्यात सोडवू, स्वप्निल लोणकरच्या आत्महत्येनंतर वडेट्टीवारांचं आश्वासन
विजय वडेट्टीवार यांचं एमपीएससी विद्यार्थ्यांना आश्वासन
Follow us on

नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्याने पुण्यातील स्वप्निल लोणकर या तरुणाने आत्महत्या केलीय. त्यावरुन भाजप नेत्यांनी सत्ताधारी महाविकास आघाडीवर जोरदार हल्ला चढवायला सुरुवात केलीय. अशावेळी मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी एमपीएससी विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय. एमपीएससी विद्यार्थ्यांचे प्रश्न एका महिन्यात सोडवण्याचं आश्वासन वडेट्टीवार यांनी दिलंय. (Vijay Vadettiwar’s reaction to the suicide of MPSC student Swapnil Lonakar)

पुण्यातील एमपीएससीच्या विद्यार्थ्यानं आत्महत्या केल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे आणि दु:खद आहे. मी त्या वडिलांशी बोललो. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे बोलणार आहोत. राज्यातील एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न मुख्यमंत्र्यांकडे आग्रहाने लावून धरु आणि एका महिन्यात त्यांचे प्रश्न सोडवू असा दावा वडेट्टीवार यांनी केलाय. विद्यार्थ्यांनी खचून जाऊ नये, सरकार त्यांच्या पाठीशी आहे, असं आश्वासनही वडेट्टीवार यांनी दिलंय.

‘केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसारच अधिवेशन होणार’

उद्यापासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु होणार आहे. या अधिवेशनात राज्यातील प्रश्नांना न्याय देण्याचं काम करु, असा विश्वासही विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे. विरोधकांचं विरोध करण हे कामच आहे. दोन दिवसांचं अधिवेशन आहे. त्यामुळे काही मुद्द्यांना बगल द्यावी लागेल. विरोधत कितीही आरोप करत असले तरी केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसारच अधिवेशन होणार आहे. विरोधकांना केंद्राच्या सूचना मान्य नसतील तर त्यांनी सांगावं, असंही वडेट्टीवार म्हणाले.

नियुक्ती मिळत नाही, पुण्यात स्वप्निल लोणकरची आत्महत्या

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यानं पुण्यात स्वप्निल लोणकर या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केलीय. तो अथक परिश्रम घेऊन एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाला. पण उत्तीर्ण होऊन दीड वर्षे झाले तरी त्याला लोकसेवा आयोगाने नियुक्ती दिली नाही. अखेर नैराश्यातून त्याने आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं. पीडित तरुण स्वप्नील लोणकरने पुण्यातील फुरसंगी येथे आत्महत्या केली. ही घटना 29 जून रोजी घडली.

सरकारच्या नाकर्तेपणामुळेच स्वप्निलची आत्महत्या

“सध्या महाराष्ट्रमध्ये बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यात कोरोनामुळे आधीच शेतकऱ्यांचं आर्थिक कंबरडे मोडलं आहे. अशा परिस्थितीत आपली कमावती मुलं हा घरच्यांसाठी आधार असतो. पण अशा काळात जर सरकारच्या नाकर्तेपणामुळे कर्ती मुली सोडून गेली तर कुटुंबीयांनी काय करायचं? आम्ही तर म्हणू की सरकारच्या नाकर्तेपणामुळे माझ्या मुलाने आत्महत्या केलीय”, असा आरोप स्वप्नीलच्या कुटुंबियांनी केलाय.

संबंधित बातम्या :

कर्जाचा डोंगर, वाढत्या अपेक्षा… मला माफ करा; MPSC उत्तीर्ण स्वप्नील लोणकरची सुसाईड नोट जशीच्या तशी…

पुढचे 25 वर्ष राजकारणातच राहणार; संन्यास घेण्याच्या विधानानंतर फडणवीसांची सारवासारव

Vijay Vadettiwar’s reaction to the suicide of MPSC student Swapnil Lonakar