तोडफोड नको, जो काही निकाल लागेल तो मान्य करावा लागेल : प्रकाश आंबेडकर

| Updated on: May 22, 2019 | 8:36 PM

सोलापूर : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचा सोलापुरातून पराभव झाला, तर भाजपचं एकही कार्यालय ठेवणार नाही, असा इशारा भीम आर्मीचे प्रदेशाध्यक्ष अशोक कांबळे यांनी दिलाय. पण जो निकाल लागेल तो मान्य करावा लागेल, कुणीही कायदा आणि सुव्यवस्था बिघडवू नये, आंबेडकर समुदायाने निकाल मान्य करावा, असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलंय. सोलापुरात ते टीव्ही […]

तोडफोड नको, जो काही निकाल लागेल तो मान्य करावा लागेल : प्रकाश आंबेडकर
Follow us on

सोलापूर : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचा सोलापुरातून पराभव झाला, तर भाजपचं एकही कार्यालय ठेवणार नाही, असा इशारा भीम आर्मीचे प्रदेशाध्यक्ष अशोक कांबळे यांनी दिलाय. पण जो निकाल लागेल तो मान्य करावा लागेल, कुणीही कायदा आणि सुव्यवस्था बिघडवू नये, आंबेडकर समुदायाने निकाल मान्य करावा, असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलंय. सोलापुरात ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.

प्रकाश आंबेडकर अकोला आणि सोलापूर या दोन मतदारसंघातून लढत आहेत. सोलापुरातून जर त्यांचा पराभव झाला तर भाजपचे सर्व कार्यालयं तोडून टाकू, अशी धमकी भीम आर्मीचे महाराष्ट्र प्रदेश प्रमुख अशोक कांबळे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. सोलापुरात प्रकाश आंबेडकरांना काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे आणि भाजपकडून डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी यांचं आव्हान आहे. काही एक्झिट पोलमध्ये सोलापुरात भाजप, तर काहींनी काँग्रेसचा विजय होत असल्याचा अंदाज व्यक्त केलाय.

प्रकाश आंबेडकर यांचा भारिप आणि असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमने 48 जागांवर उमेदवार दिले होते. ईव्हीएममध्ये घोळ झाला नाही तर आमचे सर्वच्या सर्व 48 उमेदवार निवडून येतील, असा आश्चर्यकारक दावाही प्रकाश आंबेडकरांनी केला होता. प्रकाश आंबेडकरांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून भाजपची बी टीम असा आरोप केला जातो. त्यावरही त्यांनी उत्तर दिलं. आम्हाला बी टीम म्हणून हिणवलं गेलं, पण आम्ही आमची मतं मिळवणार आणि जरी काँग्रेसनं आमचा खिमा केला, तरी आम्ही धर्मनिरपेक्ष ताकदीबरोबर राहणार, असं ते म्हणाले.

सोलापूर लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला मतदान झालं. इथे यंदा 58.45 टक्के मतदानाची नोंद झाली होती. या मतदारसंघात संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं. इथं भाजपकडून जयसिद्धेश्वर शिवाचार्य स्वामी, काँग्रेसकडून सुशीलकुमार शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर अशी तिरंगी लढत झाली.