VIDEO: मोदी-ठाकरे एकांतात भेटले; ‘ते’ 30 मिनिटे महाराष्ट्राच्या राजकारणाची कूस बदलणार?

| Updated on: Jun 08, 2021 | 2:14 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज दिल्लीत भेट घेतली. यावेळी त्यांनी पंतप्रधानांसोबत पावणे दोन तास चर्चा केली.

VIDEO: मोदी-ठाकरे एकांतात भेटले; ते 30 मिनिटे महाराष्ट्राच्या राजकारणाची कूस बदलणार?
cm uddhav thackeray
Follow us on

नवी दिल्ली: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज दिल्लीत भेट घेतली. यावेळी त्यांनी पंतप्रधानांसोबत पावणे दोन तास चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोदींसोबत एकांतात अर्धा तास चर्चा केली. मोदी-ठाकरे यांच्या एकांतात झालेल्या या भेटीमुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणाची कूस बदलणार का?, अशी चर्चाही या निमित्ताने होत आहे. (What’s wrong in meeting PM Modi, says CM Uddhav Thackeray)

मोदी-ठाकरे किती तास भेट

पंतप्रधान कार्यालयातून भेटीची वेळ मिळाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण पावणे अकरा वाजताच पंतप्रधान कार्यालयात पोहोचले. त्यानंतर 11 वाजता या तिन्ही नेत्यांची मोदींसोबत बैठक सुरू झाली. तब्बल पावणे दोन तास ही भेट झाली. त्यात मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात एकांतात अर्धा तास चर्चा झाली. त्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

या भेटीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र सदन येथे येऊन प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ‘मोदी आणि आमचे व्यक्तिगत संबंध आहेत. हे सर्वांना माहीत आहे. ही गोष्ट लपलेली नाही आणि लपवण्याची गरज नाही. आज आम्ही राजकीयदृष्ट्या एकत्र नाही. पण म्हणून आमचं नातं तुटलेलं नाही. मी मोदींना भेटलो म्हणजे काही तरी चूक केलं असं नाही. मी काही नवाब शरीफांना भेटलो नाही. आताही माझ्या सहकाऱ्यांना सांगून मी मोदींना भेटायला जाऊ शकतो’, असं सांगतानाच सत्तेत एकत्र नसलो तरी नातं तुटलं नाही, असं सूचक विधान मुख्यमंत्र्यांनी केलं.

नातं कायमस्वरुपी राहिलं पाहिजे: दरेकर

चांगल्या वातावरणात चर्चा झाली असेल, नातं तुटलं नाही असं उद्धव ठाकरे म्हणत असतील तर हे नातं कायमस्वरुपी असायला हवं. दिल्लीत आले म्हणून पंतप्रधानांबाबत किंवा भाजपबरोबरच्या नात्याबाबतचं वक्तव्य महाराष्ट्राने पाहिलं आहे. मोदींच्या चर्चेवर त्यांना समाधान मिळालं असेल आणि नातं तुटलं नाही असं सांगत असतील तर आम्हाला आनंद आणि अभिमान आहे. महाराष्ट्राच्या हितानेही ते चांगलं आहे, असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सांगितलं. तसेच नात्याच्याबाबतीत मुख्यमंत्र्यांनी नात्याबाबत अशा प्रकारची भूमिका घेतली असेल तर येणाऱ्या काळात कशाप्रकारे पडसाद उमटतील हे पाहायला मिळेल, असं सूचक विधानही त्यांनी केलं.

राजकीय विश्लेषक काय म्हणतात?

मोदी-ठाकरे भेटीच्या निमित्ताने शिवसेना-भाजप राजकीयदृष्ट्या जवळ येतील असं वाटत नाही. पण मधल्या काळात त्यांच्यात जी कटुता निर्माण झाली होती. ती दूर व्हायला सुरुवात होईल. महाराष्ट्रात आपली सत्ता नसल्याने मोदींकडून महाराष्ट्राची उपेक्षा सुरू आहे. ती अन्यायकारक आहे. ती उपेक्षा थोड्याबहूत प्रमाणात थांबेल, असं राजकीय विश्लेषक प्रमोद चुंचुवार यांनी सांगितलं. तर, मोदी-ठाकरेंच्या या भेटीत सगळं होईल असं वाटत नाही. पण दोन्ही नेत्यांमध्ये जी बॉन्डिंग आहे ती राहणारच आहे. आरएसएससोबतही उद्धव ठाकरेंचे संबंध चांगले आहेत. परंतु, आजच्या भेटीने राजकीय निर्णय होईल असं वाटत नाही. ती वेळही नाही, असं राजकीय पत्रकार अभिमन्यू शितोळे यांनी सांगितलं. (What’s wrong in meeting PM Modi, says CM Uddhav Thackeray)

संबंधित बातम्या:

मराठा आरक्षण ते मेट्रो कारशेड, मुख्यमंत्र्यांनी मोदींपुढे मांडल्या 11 मागण्या; वाचा सविस्तर

Udhav Thackeray PM Modi Meet Live | पंतप्रधानांसोबत झालेल्या बैठकीवर तिन्ही पक्षाचे नेते समाधानी: उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray: मोदींनी सगळं गांभीर्याने ऐकून घेतलंय, आता सकारात्मक पाऊल उचलावं हीच आशा: उद्धव ठाकरे

(What’s wrong in meeting PM Modi, says CM Uddhav Thackeray)