मोदी Vs योगी अशी चर्चा का सुरु आहे? भाजपात सर्व काही ‘ऑल इज नॉट वेल’? लक्षात ठेवा हे 5 मुद्दे…

| Updated on: Jun 12, 2021 | 10:26 AM

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिल्लीत आधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. दोन दिवसांच्या ह्या दौऱ्यात अनेक राजकीय चर्चा झडल्या. काय आहेत त्यामागची कारणं आणि का झडतायत बैठका? समजून घेऊया काही मुद्यांच्या आधारावर... | Modi vs Yogi

मोदी Vs योगी अशी चर्चा का सुरु आहे? भाजपात सर्व काही ऑल इज नॉट वेल? लक्षात ठेवा हे 5 मुद्दे...
नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ
Follow us on

मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी दिल्लीत आधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shaha) आणि नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेट घेतली. दोन दिवसांच्या ह्या दौऱ्यात अनेक राजकीय चर्चा झडल्या. पुढच्या वर्षी उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्याच पार्श्वभूमीवर दिल्लीतल्या ह्या बैठकांना महत्व प्राप्त झालं आहे. विशेष म्हणजे उत्तर प्रदेश भाजपात सर्व काही आलबेल नसल्याची चर्चाही दिल्ली वर्तूळात सुरु आहे. विरोधकांनी तर मोदी विरूद्ध योगी (Modi vs Yogi) ह्या जुन्याच वादाला आणखी हवा देण्याचा प्रयत्न केला आहे. काय आहेत त्यामागची कारणं आणि का झडतायत बैठका? समजून घेऊया काही मुद्यांच्या आधारावर. (Why discussion Modi vs Yogi, in Bjp All is not Well keep in Mind 5 point)

1. उत्तर प्रदेशचे आणखी तुकडे होणार?

दिल्लीतल्या सूत्रांच्या माहितीनुसार मोदी सरकार उत्तर प्रदेशचं विभाजन करुन नवीन पूर्वांचल राज्य तयार करु इच्छितं. पण ह्या विभाजनाला खुद्द योगी आदित्यनाथ यांचाच विरोध असल्याचीही चर्चा आहे. पूर्वांचलची निर्मिती झाली तर योगी आदित्यनाथ यांचा गोरखपूर मतदारसंघही पूर्वांचलमध्येच जाईल. याचाच अर्थ असा की, पूर्वांचलची निर्मिती म्हणजे योगी आदित्यनाथ यांची लखनौची गादीही बदलली जाणार. याच मुद्यावरुन योगी आदित्यनाथ यांचा गट मोदी-शहांवर नाराज असल्याची चर्चा आहे.

2. कसं असेल पूर्वांचल राज्य?

मोठ्या राज्यांचं विभाजन करुन नवे लहान राज्यांची निर्मिती करणं हे भाजपाचं पक्षीय धोरण राहीलेलं आहे. त्यामुळेच पूर्वांचलची निर्मिती करणं हा भाजपचा अजेंडा असू शकतो. ती झाली तर पूर्वांचल कसं असेल? योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूरसह 23 ते 25 जिल्हे पूर्वांचलमध्ये असू शकतात. पूर्वांचलमध्येच विधानसभेच्या जवळपास सव्वाशे जागा येतात. ज्याला पूर्वांचलचा कौल त्याला उत्तर प्रदेशची सत्ता हे आतापर्यंतचं गणित राहीलेलं आहे.

3. पूर्वांचलमध्ये भाजपची स्थिती कशी आहे?

पूर्वांचलचा राजकीय इतिहास पाहिला तर कधीच एका पक्षाला ह्या भागानं सत्ता दिलेली नाही. पूर्वांचलच्याच जवळपास 10 ते 12 जिल्ह्यात भाजपा अजूनही कमजोर स्थितीत आहे. त्यातल्या त्यात आझमगड, जौनपूर, मऊ, बलिया, संत कबीरनगर, चंदौली, आंबेडकरनगर, प्रतापगड, प्रयागराजमध्ये भाजपाची स्थिती म्हणावी एवढी चांगली नाही. ह्या जिल्ह्यांमध्ये समाजवादी पार्टीची चलती आहे. काही ठिकाणी बीएसपीचाही बेस आहे. पूर्वांचलनं येणाऱ्या निवडणूकीत भाजपाला साथ दिली नाही तर पूर्ण उत्तर प्रदेशचीच सत्ता गमवावी लागेल अशी भीती भाजप नेतृत्वाला वाटते. त्यातूनच पूर्वांचलची निर्मिती करण्याचा विचार जोर धरत असल्याचं दिसतं आहे.

4. उत्तर प्रदेशात नेतृत्व बदल

कोरोनाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेनं उत्तर प्रदेशात हाहा:कार माजला. देशाची पवित्र नदी मानलेल्या गंगा नदीत जगानं प्रेतं वाहून जाताना पाहिली. गंगेच्या किनाऱ्यावर शेकडो मृतदेह पुरल्याचे फोटोही उघड झाले. योगी आदित्यनाथ सरकार दुसरी लाट रोखण्यात तसच लोकांपर्यंत सुविधा पोहोचवण्यात अपयशी ठरल्याची जोरदार चर्चा झाली. त्याचा अप्रत्यक्ष फटका मोदींच्या प्रतिमेलाही बसला. खुद्द मोदी उत्तर प्रदेशातून निवडुण येतात. आगामी विधानसभा निवडणुका जिंकायच्या तर लढाई सोप्पी नाही याची जाणीव भाजप नेतृत्वाला झाली आहे. विशेषत: प.बंगालमध्ये ज्याप्रमाणे भाजपला पराभूत व्हावं लागलं त्यापार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश आणखी जड जाणार असं दिसतं आहे. त्याच पार्श्वभूमीवर काही कठोर निर्णय घेत उत्तर प्रदेशात भाजपच्या नेतृत्व बदलाचीही जोरदार चर्चा आहे.

5. मोदींचा फोटो नको

हिंदी भागातल्या अनेक वर्तमानपत्रांनी हे वृत्त दिलेलं आहे. विधानसभा निवडणुकांसाठी नरेंद्र मोदींचा चेहरा वापरु नये असा सल्ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं भाजपला दिल्याचीही चर्चा आहे. मोदींचा फोटो वापरल्यामुळे फायदा कमी आणि तोट जास्त होत असल्याचा संघाचा विचार आहे. त्यातल्या त्यात विधानसभा निवडणुकांमध्ये ते हे ठळकपणे दिसतं आहे. राज्यात पराभव झाला तर त्याचं खापर मोदी नेतृत्वावर फोडलं जात आहे आणि त्याचा परिणाम आगामी लोकसभा निवडणुकीत होऊ शकतो असंही एका गटाला वाटतं आहे. याबाबत अधिकृत कुणी माहिती दिलेली नाही पण संघ आणि भाजपच्या नेत्यांमध्ये ज्या बैठका झाल्यात त्यात हा सल्ला दिल्याचं समजतं.

(Why discussion Modi vs Yogi, in Bjp All is not Well keep in Mind 5 point)

हे ही वाचा :

Special Story: पवारांना प्रशांत किशोर भेटले, मोदींना उद्धव, कोण कुणीकडे कशासाठी का जातंय? समजून घ्या 10 पॉईंट्समधून!

Video : रावसाहेब दानवेंची अपघातग्रस्तांना मदत, ताफा थांबवत जखमींना रुग्णालयात पोहोचवण्याचीही व्यवस्था

“धोकेबाज चीनच्या कपटनीतीवर लक्ष ठेवावेच लागेल, गाफील राहून चालणार नाही”