आंध्रात एकहाती सत्ता, रेड्डींकडून शपथविधीचं पहिलं निमंत्रण मोदींना!

| Updated on: May 26, 2019 | 5:17 PM

नवी दिल्ली : आंध्र प्रदेशात लोकसभा निवडणूक तसेच विधानसभा निवडणुकांमध्ये वायएसआर क्राँग्रेस पक्षाने मोठा विजय मिळवला. त्यानंतर वायएसआर क्राँग्रेसचे अध्यक्ष जगन मोहन रेड्डी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. नवी दिल्ली येथे रविवारी जगन मोहन रेड्डी हे पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी पोहोचले. आंध्र प्रेदशात मिळवलेल्या ऐतिहासिक विजयानंतर जगन मोहन रेड्डी हे राज्यात नवी सरकार स्थापन करणार […]

आंध्रात एकहाती सत्ता, रेड्डींकडून शपथविधीचं पहिलं निमंत्रण मोदींना!
Follow us on

नवी दिल्ली : आंध्र प्रदेशात लोकसभा निवडणूक तसेच विधानसभा निवडणुकांमध्ये वायएसआर क्राँग्रेस पक्षाने मोठा विजय मिळवला. त्यानंतर वायएसआर क्राँग्रेसचे अध्यक्ष जगन मोहन रेड्डी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. नवी दिल्ली येथे रविवारी जगन मोहन रेड्डी हे पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी पोहोचले.

आंध्र प्रेदशात मिळवलेल्या ऐतिहासिक विजयानंतर जगन मोहन रेड्डी हे राज्यात नवी सरकार स्थापन करणार आहेत. येत्या 30 मे रोजी जगन मोहन रेड्डी हे आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. याच सोहळ्याचं निमंत्रण देण्यासाठी जगन मोहन रेड्डी यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. रेड्डी यांनी मोदींची भेट घेऊन त्यांना या शपथ ग्रहण समारोहाचं निमंत्रण दिलं.


पंतप्रधान आवास येथे ही भेट झाली. तिथे जगन मोहन रेड्डी यांनी पंतप्रधानांना पुष्पगुच्छ आणि शाल दिली. यावेळी वायएसआर काँग्रेसचे इतर नेते मंडळीही तिथे उपस्थित होते.

यावेळी जगन मोहन रेड्डी यांनी पंतप्रधानांसोबत आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा मिळावा या मुद्दावरही चर्चा केली. आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा मिळायला हवा आणि केंद्र सरकारच्या समर्थनाशिवाय राज्य विकास करु शकत नाही. जर भाजपला 250 जागा मिळाल्या असत्या, तर परिस्थिती वेगळी असती, कारण तेव्हा आम्ही आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या लिखित आश्वासनावरच सरकारला समर्थन दिलं असतं, असं जगन मोहन रेड्डी यांनी म्हटलं.

त्याशिवाय, जगन मोहन रेड्डी यांनी पंतप्रधानांकडे सध्या आंध्र प्रदेशात सुरु असलेल्या निर्माण कार्यासाठी आर्थिक मदतही मागितली. रेड्डी यांच्या या मागणीवर मोदींनी सकारात्मक प्रतिक्रिया दर्शवली असून केंद्र सरकार नेहमी आंध्र प्रेदशसोबत असल्याचं आश्वासन दिलं.

वायएसआर काँग्रेसने आंध्र प्रदेशात गुरुवारी आलेल्या विधानसभा निवडणूक निकालामध्ये 175 पैकी 151 जागांवर विजय मिळवला. त्यासोबतच पक्षाने लोकसभा निवडणुकांमध्येही 25 पैकी 22 जागा जिंकल्या. तर तेलगु देसम पक्षाला केवळ तीन जागांवर समाधान मानावं लागलं.