30 वर्षानंतर तिहेरी नवपंचम योग, कशी आहे ग्रहांची स्थिती आणि कोणाला होणार फायदा? जाणून घ्या

| Updated on: Mar 25, 2023 | 8:10 PM

राशीचक्रामध्ये ग्रहांची स्थिती वारंवार बदलत असते. त्यामुळे जातकांवर त्याचा परिणाम दिसून येतो. कधी कधी होणारी कामं रखडतात. तर कधी कधी न होणारी कामं चुटकीसरशी होतात.

30 वर्षानंतर तिहेरी नवपंचम योग, कशी आहे ग्रहांची स्थिती आणि कोणाला होणार फायदा? जाणून घ्या
Follow us on

मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करताना बारा घरांवर परिणाम करत असतात. प्रत्येक घराचा स्वामी आणि तिथली स्थिती यावर फळ मिळत असतं. व्यक्तीवर त्याप्रमाणे परिणाम दिसून येतो. ग्रह त्या त्या स्थितीनुसार शुभ अशुभ फळं देतात. आता 30 वर्षानंतर मंगळ आणि शनिच्या स्थितीमुळे नवपंचम योग तयार झाला आहे. त्याचबरोबर मंगळ केतु आणि शनि केतुमुळे नवपंचम योग तयार होत आहे. त्यामुळे तिहेरी नवपंचम योगाची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे तीन राशीच्या लोकांना जबरदस्त फायदा होणार आहे.

प्रत्येक ग्रहाचा भ्रमण कालावधी वेगवेगळा आहे. काही ग्रह एका राशीत दीर्घकाळ राहतात. तर काही ग्रहांचं गोचर अल्पावधीतच होत असतं. शनि कुंभ राशीत अडीच वर्षांसाठी स्थित आहे. तर केतु ऑक्टोबरपर्यंत तूळ राशीत असणार आहे. तर मंगळ हा ग्रह अल्पावधीतच गोचर करणार आहे.

तीन राशींना जबरदस्त फायदा होणार

धनु – ज्योतिषशास्त्रानुसार धनु राशीच्या जातकांना नवपंचम योग फलदायी ठरणार आहे.या राशीच्या गोचर कुंडलीत शनिदेव तिसऱ्या भावात असून बलवान स्थितीत आहेत. तर शनिपासून नवव्या स्थानात केतु बलवान स्थितीत आहे. त्यामुळे या राशीच्या जातकांमध्ये शक्ति आणि पराक्रमात वृद्धी दिसून येईल. तसेच अचानक धनलाभ होऊ शकते. कामाच्या ठिकाणी या काळात वरचष्मा दिसून येईल.आर्थिक स्थितीही झपाट्याने बदलेल. या काळात स्थावर मालमत्ता किंवा वाहन खरेदीचा योग आहे.

कुंभ – तिहेरी पंचम योग या राशीसाठी म्हणजे नवसंजीवनी आहे. कारण साडेसातीचा मधला टप्पा सुरु असून शनिदेव याच राशीत विराजमान आहे. तर शनिपासून पाचव्या स्थानात मंगळ आणि मंगळापासून पाचव्या स्थानात केतु स्थित आहे. तर केतुपासून पाचव्या स्थानात शनि आहे. त्यामुळे या राशीच्या जातकांना फायदा होईल. जातकांना नोकरी आणि व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ होण्याची शक्यता आहे. पण असं असलं तरी तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका.

मिथुन – या राशीच्या त्रिकोण भावात हा योग तयार होत आहे. नवपंचम योग या राशीच्या जातकांना अपेक्षित फळ देईल. या काळात उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण होतील. तसेच आर्थिक स्थिती चांगली होईल. नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली नोकरी मिळेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल अशी स्थिती आहे. नवं काम सुरु करण्यास उत्तम काळ आहे. शेअर बाजारातील गुंतवणुकीतून फायदा दर्शवत आहे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)