Surya Grahan : दिवसा होणार अंधार.. भारतातही दिसणार का शतकातलं सर्वात मोठं सूर्यग्रहण ?
Longest Solar Eclipse 2027 : खगोलशास्त्राच्या जगात, काही घटना शतकानुशतके स्मरणात राहतात. 2 ऑगस्ट 2027 रोजी, अशीच एक जादुई घटना घडणार आहे. या शतकातील सर्वात मोठं, बराच वेळ चालणारं सूर्यग्रहण म्हणून ओळखलं जाणारं एक अद्भुत सूर्यग्रहण पाहायला मिळणार आहे. पण हे ग्रहण भारतातून दिसणार की नाही ?

Solar Eclipse 2027 : आभाळ अचानक काळवंडलं, दिवसाच रात्रीसारखा माहोल झाला.. असं दृश्य तुम्ही कधी पाहिलंय का ? पण पुढल्या वर्षी. 2 ऑगस्ट 2027 ला हाच नजारा दिसणार आहे. जगभरात अनेकांना हे दृश्य पहाता येणार आहे. हे सूर्यग्रहण केवळ एक सामान्य खगोलशास्त्रीय घटना नव्हे, तर 21 व्या शतकातील सर्वात मोठ्या आणि दुर्मिळ खगोलशास्त्रीय घटनांपैकी एक मानले जातंय. शास्त्रज्ञांच्या मते, हे खग्रास सूर्यग्रहण अंदाजे 6 मिनिटे आणि 23 सेकंद टिकणार आहे. त्यामुळेच ते या शतकातील सर्वात लांब, मोठं (कालावधी) खग्रास सूर्यग्रहण ठरेल. म्हणूनच खगोलशास्त्रज्ञ आणि अंतराळप्रेमी या ग्रहणाची आतुरतेने वाट पाहत आहेत. पण हे ग्रहण भारतातून दिसणार आहे का ? चला जाणून घेऊया.
का खास आहे सूर्यग्रहण ?
शास्त्रज्ञांच्या मते, खग्रास सूर्यग्रहणाचा कालावधी जितका जास्त असतो, तितकं ते दुर्मिळ मानलं जातं. खग्रास सूर्यग्रहण सामान्यतः फक्त काही मिनिटांसाठी दिसते, परंतु 2 ऑगस्ट 2027 या दिवशी, होणाऱ्या ग्रहणामुळे दिवसाच 6 मिनिटे, 20 ते 23 सेकंदांसाठी पूर्ण अंधार पडेल. इतक्या मोठ्या कालावधीचे खग्रास सूर्यग्रहण दशकांत क्वचितच पाहायला मिळतं.
कोणत्या देशात दिसणार अद्भुत नजारा ?
अतिशय ऐतिहासिक असं हे सूर्यग्रहण प्रामुख्याने युरोप, उत्तर आफ्रिका आणि मध्य पूर्वेतील अनेक देशांमध्ये स्पष्टपणे दिसणार आहे. स्पेन, मोरोक्को, अल्जेरिया, ट्युनिशिया, लिबिया, इजिप्त, सौदी अरेबिया, येमेन आणि सोमालिया यांसारख्या देशांना खग्रास सूर्यग्रहणाचे हे नेत्रदीपक दृश्य पाहता येईल.
भारतात दिसणार का सूर्य ग्रहण ?
शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार, भारतात हे सूर्यग्रहण पूर्ण रुपात दिसणार नाहीये. मात्र, जगाच्या बहुतेक भागांमध्ये ते खंडग्रास सूर्यग्रहण म्हणून दिसेल. याचा अर्थ असा की, भारतात दिवसा पूर्ण अंधार होणार नसला तरी, चंद्र सूर्याचा मोठा भाग झाकताना दिसेल.
सुतक काळ लागणार ?
ज्योतिषशास्त्रानुसार, खंडग्रास ग्रहण असो वा संपूर्ण ग्रहण, ग्रहण सुरू होण्याच्या 12 तास आधी सुतक काळ सुरू होतो आणि ग्रहण संपेपर्यंत चालू राहतो. मात्र, जर ग्रहण तुमच्या भागातून, देशातून दिसत असेल तरच हे नियम लागू होतात. या शतकातील सर्वात लांब सूर्यग्रहण भारतात दिसणार आहे, पण ते पूर्ण स्वरूपात नाही, तर खंडग्रास स्वरूपात दिसेल, त्यामुळे भारतात सुतकाचे नियम पाळले जातील. सुतक काळात मंदिरं बंद राहतात आणि गर्भवती महिलांना विशेष खबरदारी घेण्याचा सल्ला दिला जातो.
परत कधी मिळणार अशी संधी ?
शास्त्रज्ञांच्या सांगण्यानुसार, इतक्या मोठ्या, दीर्घ कालावधीचे खग्रास सूर्यग्रहण येत्या अनेक दशकांत पुन्हा दिसणार नाही. त्यामुळे, 2 ऑगस्ट 2027 रोजी होणारा हा खगोलीय सोहळा शतकातील सर्वात लांब सूर्यग्रहण म्हणून इतिहासात नोंदवला जाईल.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेले आहेत. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)