Astrology: 7 वार आणि 7 उपाय..! प्रत्येक दिवसासाठी खास तोडगा, चांगल्या फळासाठी ज्योतिषीय उपचार
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संबंधित आहे. त्या त्या दिवसाला ग्रह आणि देवतांशी संबंध जोडला गेला आहे. यासाठी प्रत्येक दिवशी उपाय केलें तर त्याचा सकारात्मक परिणाम मानवी जीवनावर होतो, असं ज्योतिषशास्त्र सांगतं. चला जाणून घेऊयात रविवार ते शनिवारपर्यंतचे ज्योतिषीय उपाय...

ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहमंडळाचा आपल्या जीवनावर प्रभाव पडत असतो. मग तो सकारात्मक असो की नकारात्मक.. पण प्रत्येक घडामोडीमागे ग्रहांची स्थिती असते. एखादा ग्रह कुंडलीत चांगल्या स्थितीत असेल तर त्याचा फायदा होतो. पण ग्रह नकारात्मक स्थितीत असेल तर मात्र नुकसान होतं. आर्थिक स्थितीही खालावते. कामात असंख्य अडचणी येतात. त्यामुळे ज्योतिषी प्रत्येक ग्रहासंबंधी एक तोडगा सांगतात. हा तोडगा तुम्ही प्रत्येक दिवसाला त्या त्या ग्रहानुसार करू शकता. सात दिवस ग्रहांशी निगडीत आहेत. तुम्ही छोटे उपाय करून जीवनात सकारात्मक गोष्टी घडवून आणू शकता. चला जाणून घेऊयात त्याबाबत…
रविवार : हा दिवस सूर्यदेवतेशी निगडीत आहे. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून सूर्याला अर्घ्य देणं शुभ मानलं जातं. तांब्याच्या तांब्यात पाणी घ्या. त्यात लाल फूल आणि थोडीशी रोली टाका आणि सूर्याला अर्घ्य द्या. असं अर्घ्य देणं शुभ मानलं जातं. यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि समाजात मानसन्मान मिळतो. तसेच सरकारी कामात येणाऱ्या अडचणी दूर होतात.
सोमवार: हा दिवस चंद्राशी निगडीत आहे आणि भगवान शिवांना अतिशय प्रिय दिवस आहे. या दिवशी शिवलिंगावर जल, दूध आणि बेलपत्र अर्पण केल्याने चंद्र मजबूत होतो. यामुळे मानसिक तणाव कमी होतो. ज्या लोकांच्या आयुष्यात अडचणी येत आहे. मानसिक संतुलन बिघडलं आहे. त्यांनी हे उपाय करावे. तसेच ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा.
मंगळवार : हा दिवस मंगळ ग्रहाशी निगडीत आहे. तसेच मारूतीरायासाठी अत्यंत प्रिय दिवस मानला जातो. या दिवशी हनुमान चालीसेचं पठण करावं. तसेच मारूतीरायाला सिंदूर, चमेलीचं तेल अर्पण करावं. यामुळे मंगळ ग्रह मजबूत होतो.
बुधवार : हा दिवस बुध ग्रहाशी जोडला गेला आहे. या दिवशी बुद्धीची देवता असलेल्या गणपती बाप्पाची पूजा केली तर चांगलं फळ मिळतं. या दिवशी गणपणी बाप्पााला दुर्वा आणि मोदक अर्पण केलं पाहीजे. यामुळे बुद्धी तलख होते आणि निर्णय क्षमता वाढते, असं ज्योतिषशास्त्र सांगतं.
गुरूवार : हा दिवस गुरू ग्रहाचा आहे. तसेच भगवान विष्णुंना प्रिय असलेला हा दिवस आहे. या दिवशी पिवळे वस्त्र आणि केळीच्या झाडाची पूजा करणं शुभ मानलं जातं. भगवान विष्णुंना पिवळं फुल अर्पण करावं. यामुळे ज्ञान, धन, वैवाहिक जीवन आणि कौटुंबिक प्रगती होते.
शुक्रवार: हा दिवस देवी लक्ष्मीला समर्पित आहे. तसेच भौतिक सुखांचा कारक असलेल्या शुक्र ग्रहाचा हा दिवस.. या दिवशी देवी लक्ष्मीची विधिवत पूजा करावी. तसेच कमळ आणि खिरेचा भोग अर्पित केला तर जीवनात सकारात्मक बदल घडतात. शुक्रवारी देवीपुढे तुपाचा दिवा लावावा. यामुळे देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते.
शनिवार : हा दिवस न्यायदेवता शनिचा आहे. शनि ग्रह म्हंटलं की अनेकांना घाम फुटतो. त्यामुळे या दिवशी काही उपाय प्रभावी ठरतात. पिंपळाच्या वृक्षाखाली तीळाचा दिवा लावणं आणि शनि देवांना तेल अर्पण करणं शुभ मानलं जातं. इतकंच काय तर गरीब आणि गरजूंना काळे तीळ, उडद डाळ आणि ब्लँकेट दान केल्याने शनि दोष कमी होतो.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)