IND vs PAK, WWC 2022: वर्ल्डकपमध्ये भारतीय महिला संघाच्या वादळासमोर पाकिस्तान उद्धवस्त

| Updated on: Mar 07, 2022 | 2:37 PM

IND vs PAK, WWC 2022: ICC महिला वर्ल्डकप स्पर्धेत भारताने दमदार सुरुवात केली आहे. मिताली राजच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय महिला संघाने पाकिस्तानवर मोठा विजय मिळवला आहे.

IND vs PAK, WWC 2022: वर्ल्डकपमध्ये भारतीय महिला संघाच्या वादळासमोर पाकिस्तान उद्धवस्त
मिताली राजच्या (Mithali Raj) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय महिला संघाने पाकिस्तानवर मोठा विजय मिळवला आहे. भारतीय महिला संघाने पाकिस्तान विरोधात विजयाचा आपला सिलसिला कायम राखला आहे. भारतीय संघाने तब्बल 108 धावांनी विजय मिळवला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय महिला संघाने विजयासाठी 245 धावांचं लक्ष्य दिलं होतं. पण पाकिस्तानचा डाव अवघ्या 137 धावांमध्ये आटोपला. भारताच्या विजयाच श्रेय चार खेळाडूंना जातं.
Image Credit source: bcci
Follow us on

IND vs PAK, WWC 2022: ICC महिला वर्ल्डकप स्पर्धेत (ICC Womens world cup) भारताने दमदार सुरुवात केली आहे. मिताली राजच्या (Mithali Raj) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय महिला संघाने पाकिस्तानवर मोठा विजय मिळवला आहे. भारतीय महिला संघाने पाकिस्तान विरोधात विजयाचा आपला सिलसिला कायम राखला आहे. क्रिकेटच्या मैदानावर भारत-पाकिस्तान सामना युद्धापेक्षा कमी नसतो. याची भारतीय महिला संघाला कल्पना होती. त्यामुळे आज त्यांनी त्याच दर्जाचा उत्तम खेळ दाखवला. भारतीय महिला संघाच्या (Indian womens Team) वादळापुढे पाकिस्तानी महिला संघाचा निभावच लागला नाही. भारतीय संघाने तब्बल 108 धावांनी विजय मिळवला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय महिला संघाने विजयासाठी 245 धावांचं लक्ष्य दिलं होतं. पण पाकिस्तानचा डाव अवघ्या 137 धावांमध्ये आटोपला. भारतीय आणि पाकिस्तान महिला संघामधील हा 11 वा वनडे सामना होता. भारतीय महिलांनी आपला रेकॉर्ड कायम ठेवला. मिताली राजच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानला नमवण्याची ही दहावी वेळ आहे. या विजयासह भारतीय संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला आहे.

राजेश्वरी गायकवाडने दिला दणका

पूजा वस्त्राकर, स्नेह राणा, स्मृती मानधना आणि राजेश्वरी गायकवाड या चौघींनी पाकिस्तान विरोधातील विजयाच महत्त्वाची भूमिका बजावली. संघ अडचणीत असताना पूजा आणि स्नेहमध्ये 97 चेंडूत 122 धावांची भागीदारी झाली. त्यामुळे भारताला 244 ही आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली. त्यानंतर सर्वच भारतीय महिला गोलंदाजांनी टिच्चून मारा केला. पण त्यात राजेश्वरी गायकवाड उजवी ठरली. तिने आपल्या फिरकी गोलंदाजीने पाकिस्तानला चांगलाच दणका दिला. राजेश्वरीने 10 षटकात 31 धावा देत चार विकेट घेतल्या. झुलन गोस्वामी, स्नेह राणाने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. पाकिस्तानकडून सलामीवीर सिद्रा अमीनने सर्वाधिक 30 धावा केल्या. पाकिस्तानी महिला संघ सामना जिंकू शकतो, असं एकदाही वाटलं नाही. ठराविक अंतराने त्यांचे फलंदाज बाद होत राहिले.

स्मृतीने रचला पाया

तत्पूर्वी भारताची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. सलामीवीर शेफाली वर्मा भोपळाही न फोडता तंबूत परतली. पण त्यानंतर सांगलीच्या स्मृती मानधनाने कमालीचा खेळ दाखवत डाव सावरला. डावखुऱ्या स्मृतीने दीप्ती शर्मासोबत मिळून दुसऱ्या विकेटसाठी 92 धावांची भागीदारी केली.स्मृती आणि दीप्तीमध्ये दुसऱ्या विकेटसाठी 116 चेंडूत 92 धावांची भागीदारी झाली. स्मृती मानधनाने 75 चेंडूत 52 धावांची अर्धशतकी खेळी केली. या खेळीत तिने तीन चौकार आणि एक षटकार लगावला.

पूजा आणि स्नेहने संपूर्ण चित्रच पालटलं

स्मृती मानधना, उपकर्णधार हरमनप्रीत कौर, ऋचा कौच आणि कॅप्टन मिताली राज झटपट माघारी परतले. एकवेळ भारताचा डाव 200 पर्यंत तरी पोहोचेल? अशी मनात शंका निर्माण झाली होती. पण त्यानंतर पूजा आणि स्नेहने डाव सावरला. पूजा आणि स्नेहने संपूर्ण चित्रच पालटून टाकलं. दोघींनी पाकिस्तानच्या महिला गोलंदाजावर हल्लाबोल करत खोऱ्याने धावा वसूल केल्या. स्नेह राणाने 48 चेंडूत 53 धावांच्या खेळीत चार चौकार लगावले. पूजाने 59 चेंडूत 67 धावांच्या खेळीत आठ चौकार फटकावले.