IPL 2022: जयवर्धनेच्या मते Mumbai Indians कडे मॅच जिंकवून देणारे फिनिशर्स नाहीत, मग पोलार्ड-टिम डेविड कोण आहेत?

| Updated on: May 05, 2022 | 9:10 PM

IPL 2022: "आमच्याकडे शेवटी असे फिनिशर्सच नव्हते, जे टीमला विजयाकडे घेऊन जातील" असे जयवर्धने म्हणाले. जयवर्धने यांचं हे विधान हास्य़ास्पद आहे.

IPL 2022: जयवर्धनेच्या मते Mumbai Indians कडे मॅच जिंकवून देणारे फिनिशर्स नाहीत, मग पोलार्ड-टिम डेविड कोण आहेत?
Follow us on

मुंबई: IPL 2022 स्पर्धेत मुंबई इंडियन्सचं (Mumbai Indians) आव्हान आता फक्त औपचारिकता म्हणून उरलं आहे. मुंबईने पहिले आठ सामने गमावले. नवव्या मॅचमध्ये विजय मिळवला. अशा सुरुवातीनंतर मुंबई इंडियन्सच स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येणं स्वाभाविक होतं. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने चेन्नईवर विजय मिळवल्यानंतर यावर शिक्कामोर्तब झालं. गुरुवारी माहेला जयवर्धने (Mahela jayawardene) मुंबई इंडियन्सच्या अपयशाबद्दल बोलले. हेड कोच जयवर्धने यांनी मुंबई इंडियन्सच्या पराभवाची अनेक कारणं सांगितली. त्यात मॅच फिनिशरची कमतरता हे एक कारण होतं. जयवर्धन यांच्यामते मुंबई इंडियन्सकडे असे मॅच फिनिशर्सच नव्हते, जे संघाला विजय मिळवून देतील.

“आमच्याकडे शेवटी असे फिनिशर्सच नव्हते, जे टीमला विजयाकडे घेऊन जातील” असे जयवर्धने म्हणाले. जयवर्धने यांचं हे विधान हास्य़ास्पद आहे, कारण मुंबईकडे असे दोन फिनिशर्स होते, जे टीमला विजय मिळवून देतील. फक्त त्यातला एक आउट ऑफ फॉर्म होता, दुसऱ्यावर त्यांनी विश्वास दाखवला नाही. ते दोन फिनिशर्स आहेत, कायरन पोलार्ड आणि टिम डेविड. प्रति मॅच 15 धावा अशी पोलार्डच्या फलंदाजीची सरासरी आहे. टिम डेविडला पहिल्या दोन सामन्यांमध्ये खेळवून नंतर बसवलं. 9 व्या मॅचमध्ये संधी मिळाली, तेव्हा त्याने आक्रमक फलंदाजी केली व संघाला विजय मिळवून दिला. त्यामुळे जयवर्धने यांच्या या विधानाला अर्थ नाही.

अटी-तटीचे सामने गमावले

आयपीएलच्या या सीजनमध्ये अटी-तटीच्या सामन्यात रणनीतिक दृष्टीने अपयशी ठरल्याचे जयवर्धने यांनी गुरुवारी मान्य केले. “हा असा सीजन होता, ज्यात अटी-तटीच्या सामन्यांमध्ये आम्ही विजय मिळवू शकलो नाही व सामने सुद्धा फिनिश करु शकलो नाही” असं जयवर्धने म्हणाले. “आमच्या फलंदाजांना कामिगरीत सातत्य राखता आले नाही. हे कुणा एकट्या फलंदाजाचे काम नाही” असे जयवर्धने यांनी सांगितलं.

ऑक्शनची खराब रणनिती नडली

मेगा ऑक्शनच्यावेळी खराब रणनीती मुंबई इंडियन्सला महाग पडली. बासिल थम्पी, जयदेव उनाडकट, मुरुगन अश्विन यांची खरेदी इशान किशनसाठी 15.25 कोटी मोजणं, कायरन पोलार्डला रिटेन करणं, हे निर्णय़ मुंबई इंडियन्सचे चुकले. ज्याची किंमत त्यांना या सीजनमध्ये चुकवावी लागली.