Team India : जसप्रीत बुमराह कमबॅक करणार की नाही? रोहित शर्माने स्पष्टच सांगितलं!

Team india : जसप्रीत बुमराह आयर्लंडविरूद्धच्या मालिकेमध्ये संघात परतणार असल्याची चर्चा आहे. अशातच यावर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

Team India : जसप्रीत बुमराह कमबॅक करणार की नाही? रोहित शर्माने स्पष्टच सांगितलं!
ऑगस्टमध्ये होणाऱ्या आयर्लंडविरूद्ध बुमराह खेळणार आहे की नाही याबाबत आतातरी मला काही माहिती नसल्याचं रोहित शर्मा म्हणाला.
| Updated on: Jul 27, 2023 | 10:18 AM

मुंबई : टीम इंडियाचा स्टार खेळाडू जसप्रीत बुमराह गेल्या अनेक महिन्यांपासून क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. आता आशिया कप आणि वर्ल्ड कप तोंडावर आला असल्याने त्याने कमबॅक करावं अशी चाहत्यांची इच्छा आहे. बुमराहने टीम इंडियाला एकट्याच्या जोरावर अनेक सामने जिंकून दिले आहेत. त्यामुळे त्याचं संघात कमबॅक होणं महत्त्त्वाचं आहे, आताच काही दिवसांपूर्वी त्याने सराव करतानाचा व्हिडीओ शेअर करत परतत असल्याचे संकेत दिले आहेत. अशातच बुमराह आयर्लंडविरूद्धच्या मालिकेमध्ये संघात परतणार असल्याची चर्चा आहे. यावर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर असून कसोटी मालिकेनंतर आजपासून म्हणजेच गुरूवारी वन डे मालिकेला सुरूवात होणार आहे. यावेळी पत्रकार परिषदेमध्ये रोहितला बुमराहबाबत विचारण्यात आलं. ऑगस्टमध्ये होणाऱ्या आयर्लंडविरूद्ध बुमराह खेळेल की नाही हे आतातरी मला काही माहित नाही. मात्र वर्ल्ड कपच्या दृष्टीने त्याला जास्तीत जास्त सामने खेळवण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. आम्ही NCA संपर्कात असून तो आता सरावाला लागला ही आमच्यासाठी सकारात्मक गोष्ट असल्याचं रोहित शर्मा म्हणाला.

जसप्रीत बुमराह मोठ्या दुखापतीमधून आता सावरत आहे. त्यामुळे लगेच त्याला आयर्लंड दौऱ्यावर पाठवलं जाईल की नाही याबाबत अद्याप काही माहिती नाही. संघासाठी तो सर्वात महत्त्वाचा खेळाडू असून त्याला तसा अनुभवही असल्याचं रोहित शर्माने सांगितलं.

वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर टीम इंडिया आयर्लंडचा दौरा करणार आहे. यासह आशिया कप आणि वन डे वर्ल्ड कपचीही संघबांधणी करायची आहे. यंदा भारतामध्ये वर्ल्ड कपचं आयोजन असल्याने टीम इंडिया प्रबळ दावेदार आहे. मात्र अंतिम संघ निवडणं हे बीसीसीआयसमोर मोठं आव्हानात्मक असणार आहे.

दरम्यान, आता टीम इंडियाने वेस्ट इंडिजविरूद्धची कसोटी मालिका 1-0 ने जिंकली आहे. पहिल्या सामन्यात मोठा विजय मिळवल्यानंतर दुसरा सामनाही टीम इंडियाने जिंकला असता मात्र पावसामुळे हा सामना रद्द झाला. आता वनडे मालिकेला आजपासून सुरूवात होणार आहे. पहिला सामना आज संध्याकाळी 7 वाजता सुरू होणार आहे.