आरसीबी संघ विकून टाका, सहाव्या पराभवानंतर वैतागला हा खेळाडू

| Updated on: Apr 16, 2024 | 4:54 PM

RCB VS SRH : आरसीबी संघाला पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला आहे. सोमवारी झालेल्या या सामन्यात हैदराबादने आयपीएलमधील सर्वात मोठी धावसंख्या उभारली होती. त्याचा पाठलाग करताना आरसीबीला टार्गेट पर्यंत पोहोचता आले नाही. २५ धावांनी त्यांचा पराभव झाला.

आरसीबी संघ विकून टाका, सहाव्या पराभवानंतर वैतागला हा खेळाडू
RCB
Follow us on

IPL 2024 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची कामगिरी आहे तशीच कायम आहे. सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात आरसीबीला पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्यात हैदराबादने आयपीएल इतिहासातील सर्वात मोठा स्कोर उभा केला होता. त्यामुळे आरसीबीला सहाव्या पराभवाला सामोरे जावे लागले. संघाच्या गोलंदाजांमुळे संघ पराभूत झाल्याचं बोललं जात आहे. संघाची सततची लाजिरवाणी कामगिरी पाहून महान टेनिसपटू महेश भूपती देखील संतापला आहे.

भूपतीने आरसीबीला फटकारले

सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 25 धावांनी पराभव झाल्यानंतर महेश भूपतीने त्याच्या X अकाऊंटवर ट्विट केलेय, “क्रीडा, आयपीएल, चाहते आणि अगदी खेळाडूंच्या फायद्यासाठी, मला वाटते बीसीसीआयने आरसीबी संघ नवीन मालकाला विकला पाहिजे. आम्हाला नवीन मालकाची गरज आहे.”

संघर्षानंतर आरसीबीचे फलंदाज पराभूत

चिन्नास्वामी स्टेडिअमवर झालेल्या या सामन्यात धावांचा महापूर पाहायला मिळाला. प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादने आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या स्कोअर बोर्डवर नोंदवली. संघाने 3 गडी गमावून 287 धावा केल्या. प्रत्युत्तरात आरसीबीच्या फलंदाजांनीही चांगली कामगिरी करत 7 गडी गमावून 262 धावा केल्या. मात्र, फक्त 25 धावांनी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. दिनेश कार्तिकने शानदार फलंदाजी करत 35 चेंडूत 83 धावांची तुफानी खेळी केली. त्याचवेळी कर्णधार फाफ डू प्लेसिसने 28 चेंडूत 62 धावा ठोकल्या.

हैदराबादच्या फलंदाजांची फटकेबाजी

आरसीबीच्या घरच्या मैदानावर सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांनी चांगलीच फटकेबाजी केली. ट्रॅव्हिस हेडने तुफानी फलंदाजी करत हैदराबादसाठी वेगवान शतक झळकावले. हेडने 41 चेंडूत 102 धावा केल्या. तर, हेनरिक क्लासेनने 31 चेंडूत 67 धावा केल्या. शेवटच्या षटकांमध्ये ॲडम मार्करामने 17 चेंडूत 32 धावा आणि अब्दुल समदने 10 चेंडूत 37 धावा करत हैदराबादला 287 धावांपर्यंत पोहोचवले.

आरसीबीच्या खेळाडूंनी देखील चांगली सुरुवात केली. पण नंतर लवकर विकेट पडल्याने संघ डगमळला आणि मग संघाला पराभवाचा सामना करावा लागला. आरसीबीसाठी विराट कोहलीने २० बॉलमध्ये ४२ धावा केल्या. फाफ ड्युप्लेसीसने 28 बॉलमध्ये 62 रन केले. दिनेश कार्तिकने 35 बॉलमध्ये 83 रन केले.