T20 World cup: एअरपोर्टवर वेळेत पोहोचला नाही, अखेर वेस्ट इंडिजचा मोठा खेळाडू T20 वर्ल्ड कपमधून बाहेर

| Updated on: Oct 04, 2022 | 1:37 PM

T20 World cup: 'या' खेळाडूने यंदाचा IPL सीजन गाजवला होता, वेळेत न पोहोचण्याची मोठी किंमत चुकवावी लागली.

T20 World cup: एअरपोर्टवर वेळेत पोहोचला नाही, अखेर वेस्ट इंडिजचा मोठा खेळाडू T20 वर्ल्ड कपमधून बाहेर
west indies team
Follow us on

मुंबई: वेळ खूप महत्त्वाची असते. वेळेइतकं ताकतवान कोणीच नाही. त्यामुळे नेहमी वेळेची किंमत करणं आवश्यक आहे. वेस्ट इंडिजचा (West indies) प्रमुख डावखुरा फलंदाज शिमरॉन हेटमायरला (shimron hetmyer) याच वेळेच महत्त्व समजलं नाही. परिणामी त्याला टी 20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World cup) खेळता येणार नाहीय. वेस्ट इंडिज बोर्डाने हे कठोर पाऊल उचलत त्याला शिक्षा दिली आहे.

वेस्ट इंडिज बोर्डाने दिली शिक्षा

शिमरॉन हेटमायर वेळेवर एअरपोर्टवर पोहोचला नाही. परिणामी त्याला ऑस्ट्रेलियाला जाणारं विमान पकडता आलं नाही. अखेर शिक्षा म्हणून त्याला टी 20 वर्ल्ड कप टीममधील स्थान गमवावं लागलं आहे.

हेटमायरच्या जागी कोण?

वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने शिमरॉन हेटमायरला बाहेरचा रस्त दाखवलाय. त्याच्याजागी शेमा ब्रूक्सला टीममध्ये संधी दिली आहे. 14 सप्टेंबरला T20 वर्ल्ड कपसाठी वेस्ट इंडिजच्या टीमची घोषणा करण्यात आली. या टीममध्ये शेमार ब्रूक्सच नाव नव्हतं.

वेस्ट इंडिज बोर्डाने दिली माहिती

पण वेळ बदलली आणि शेमार ब्रूक्सचा ऑस्ट्रेलियाला जायचा मार्ग मोकळा झाला. टी 20 वर्ल्ड कप टीममधून हेटमायरला बाहेर करुन त्याच्याजागी ब्रूक्सला संधी दिल्याची माहिती वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने दिली आहे.

फ्लाइट रिशेड्यूल केलं होतं

वेस्ट इंडिज बोर्डाने याआधी सुद्धा हेटमायरसाठी फ्लाइट रिशेड्यूल केलं होतं. त्याला 1 ऑक्टोबरला म्हणजे शनिवारी ऑस्ट्रेलियाला रवाना व्हायचं होतं. पण त्याने कौटुंबिक कारण सांगितलं. त्यानंतर 3 ऑक्टोबरला सोमवारी फ्लाइट रिशेड्यूल करण्यात आली.

पण यावेळी सुद्धा हेटमायर वेळेवर विमानतळावर पोहोचला नाही. त्यामुळे त्याची फ्लाइट मिस झाली. खरंतर हेटमायरसाठी फक्त विमानच चुकलं नाही, तर वर्ल्ड कपच त्याचं तिकिट हुकलं.

आधी इशारा देऊन नंतर कारवाई

शिमरॉन हेटमायरला संघाबाहेर करण्याचा निर्णय तडकाफडकी झालेला नाही. त्याला आधीच वेस्ट इंडिज बोर्डाकडून माहिती देण्यात आली होती. फ्लाइट रिशेड्यूल करतानाच कल्पना दिली होती. पुन्हा उशिरा झाला, तर टी 20 वर्ल्ड कप टीममधून स्थान गमवाव लागेल. त्यामुळे वेस्ट इंडिज बोर्डाने इशारा देऊन नंतर कारवाई केली.