Team India : टीम इंडियाच्या 2 दिग्गजांचा 15 ऑगस्टला क्रिकेटला रामराम, कोण आहेत ते?

Indian Cricket Team: टीम इंडियाच्या 2 स्टार आणि अनुभवी खेळाडूंनी असा निर्णय घेतल्याने तेव्हा क्रिकेट चाहत्यांना धक्का बसला होता. मात्र त्यानंतर खेळाडूने एकत्र निवृत्त होण्यामागचं कारणही सांगितलं.

Team India : टीम इंडियाच्या 2 दिग्गजांचा 15 ऑगस्टला क्रिकेटला रामराम, कोण आहेत ते?
team india huddle talk m s dhoni
Image Credit source: AFP
Sanjay patil | Updated on: Aug 13, 2024 | 12:36 AM

अवघ्या काही तासांवर भारताचा स्वातंत्र्य दिन येऊन ठेपला आहे. प्रत्येक भारतीयासाठी 15 ऑगस्ट हा दिवस कधीही न विसरता येणारा असा आहे. भारताच्या अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी ब्रिटीश राजवटी विरुद्ध लढा दिला. अनेकांनी प्राणांची आहुती दिली.  काही स्वातंत्र्य सैनिक फासावर चढले.त्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळालं. भारताच्या या स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मृतीला 15 ऑगस्टला उजाळा दिला जातो. प्रत्येक भारतीयासाठी देशभावना सर्वोच्च स्थानी असते आणि आहे सुद्धा. टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने आपल्या सहकाऱ्यांसह भारताला आयसीसीच्या तिन्ही स्पर्धांमध्ये विजयी केलं. मात्र धोनीने 4 वर्षांपूर्वी स्वातंत्र्य दिनीच क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं होतं. धोनीने निवृत्तीसाठी स्वातंत्र्य दिनाचीच निवड केली. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना प्रामुख्याने धोनी चाहत्यांना त्याच्या लाडक्या खेळाडूच्या निवृत्तीची आठवण स्वातंत्र्य दिनी होते. मात्र 15 ऑगस्ट 2020 रोजी फक्त एकटा धोनीच नाही, तर त्याच्या खास सहकाऱ्यानेही निवृत्ती जाहीर केली. त्यामुळे चाहत्यांना 15 ऑगस्ट ही तारीख चांगलीच लक्षात आहे.

महेंद्रसिंह धोनी याने सोशल मीडियावरुन निवृत्ती घेत असल्याचा निर्णय जाहीर केला. त्यामागोमाग सुरेश रैना यानेही आपण रिटायर होत असल्याचं जाहीर केलं.त्यामुळे क्रिकेट चाहत्यांनाही धक्का बसला. धोनी आणि रैना या दोघांची ऑन आणि ऑफ फिल्ड असलेली मैत्री क्रिकेट चाहत्यांना माहित आहे. रैनाने निवृत्ती वेळेसही धोनीची साथ सोडली नाही. मात्र रैना आणि धोनी यांच्यात मैत्रीची सुरुवात कशी झाली? त्याच्या मागचा किस्सा काय आहे? हे रैनाने त्याच्या आत्मचरित्रात सांगितलं आहे.

मैत्रीची ‘ओपनिंग’ कुठून?

माझ्या आणि धोनीच्या मैत्रीची सुरुवात ही दुलीप ट्रॉफी 2005 स्पर्धेत फरीदाबाद येथे झालेल्या सामन्यातून झाल्याचं रैनाने त्याच्या आत्मचरित्रात सांगितलं आहे. धोनी या सामन्यात निर्भीड आक्रमक आणि आत्मविश्वासाने खेळत होता. त्याला खेळताना पाहून प्रभावित झाल्याचं रैनाने आत्मचरित्रात म्हटंल आहे. इथून या दोघांच्या मैत्रीच्या प्रवासाची सुरुवात झाली. त्यानंतर दोघे टीम इंडियात आले. दोघांनी टीम इंडियाला सामने जिंकून दिले. दोघांची मैत्री वाढली. असा धोनी आणि रैनाच्या मैत्रीची कहाणी आहे.

एकाच दिवशी निवृत्ती का?

दोघांनी एकाच दिवशी निवृत्ती का घेतली? याबाबत सुरेश रैना याने एका मुलाखतीत माहिती दिली होती. “आम्ही आधीच 15 ऑगस्टला निवृत्त व्हायचं ठरवलं होतं. धोनीचा जर्सी नंबर 7आणि माझा 3. आमच्या दोघांच्या जर्सीचा नंबर जोडल्यास तो 73 असा होतो. तसेच 15 ऑगस्ट 2020 रोजी भारताला स्वातंत्र्य होऊ 73 वर्ष पूर्ण झाले होते. त्यामुळे निवृत्तीसाठी यापेक्षा आणखी कोणताही चांगला दिवस नसता”, असं सुरेश रैनाने म्हटंल.

धोनी, रैना आणि वर्ल्ड कप

महेंद्र सिंह धोनी याने आपल्या नेतृत्वात टीम इंडियाला 2007 टी 20 वर्ल्ड कप, 2011 वनडे वर्ल्ड कप आणि 2013 साली चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विजयी केलं. सुरेश रैना 2011 च्या वर्ल्ड कप विजयी संघाचा भाग होता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us