अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीनंतर सचिन काय म्हणाला? त्या फोनबाबत आता झाला खुलासा
अजिंक्य रहाणे याने नुकतंच आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएलमधून निवृत्ती घेतली. त्याच्या निवृत्तीच्या बातमीनंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. त्यात एक नाव होतं सचिन तेंडुलकरचं... याबाबतचा खुलासा खुद्द अजिंक्य रहाणे याने केलं आहे.

भारतीय क्रिकेटमध्ये नावलौकिक मिळवलेला आणि शांत, संयमी क्रिकेटपटू म्हणून ओळख असलेल्या अजिंक्य रहाणे यांनी नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. अजिंक्य रहाणेकडे रेड बॉल क्रिकेटमधील एक आश्वासक चेहरा म्हणून पाहिलं जात होतं. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याच्या नेतृत्वाची पारखही झाली होती. पण गेल्या काही वर्षात त्याला संघात स्थान मिळणं कठीण झालं होतं. त्यामुळे अजिंक्य रहाणे फक्त आयपीएल आणि देशांतर्गत स्पर्धेत खेळताना दिसत होता. अखेर अजिंक्य रहाणे याने क्रिकेटला रामराम ठोकला. त्याच्या या निर्णयानंतर क्रीडाप्रेमी तसेच या क्षेत्रातील दिग्गजांना आश्चर्याचा धक्का बसला होता. क्रीडाप्रेमी, आजी माजी खेळाडू यांनी अजिंक्य रहाणेला शुभेच्छा दिल्या होत्या. पण सर्वात पहिला फोन हा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा आला होता, असं खुद्द अजिंक्य रहाणे याने सांगितलं.
अजिंक्य रहाणे याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत निवृत्तीची घोषणा केली होती. हा निर्णय त्याच्यासाठी किती कठीण होता हे व्हिडीओतील रिएक्शनवरून दिसून आलं. निवृत्तीची घोषणा करताना अजिंक्य रहाणे भावुक झाला होता. या निर्णयामुळे सचिन तेंडुलकरलाही आश्चर्याचा धक्का बसला होता. द इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, अजिंक्य रहाणेने सांगितलं की ‘पहिला कॉल हा सचिन तेंडुलकरचा आला होता. त्यांना असं वाटलं की मी अजून काही काळ खेळेन. मी त्यांना सांगितलं की जास्त लांब खेचू इच्छित नाही कारण कोणत्याही पश्चातापाशिवाय मी निवृत्त होत आहे.’ इतकंच काय तर इरफान पठाणने देखील कॉल केला होता. तर संघ सहकारी असलेल्या रोहित शर्मा, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि जसप्रीत बुमराह यांनी मेसेज केला होता.
अजिंक्य रहाणेचं आंतरराष्ट्रीय करिअर
अजिंक्य रहाणेने टीम इंडियाचं कसोटी नेतृत्व सांभाळलं होतं. तसेच क्रिकेट कारकिर्दीत ओपनर आणि मधल्या फळीत फलंदाजी केली. त्याने 85 कसोटी सामन्यात 5077 धावा केल्या. यात 12 शतकांचा समावेश आहे. या शिवाय 90 वनडे सामन्यात 2962 धावा केल्या. तर फक्त 20 टी20 सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. भारतासाठी खेळताना त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 15 शतकं आणि 51 अर्धशतकं ठोकली आहेत.