Gautam Gambhir Birthday | तू होतास म्हणून…, गंभीरच्या वाढदिनी चाहत्यांकडून 2011 च्या वर्ल्डकपची आठवण

| Updated on: Oct 14, 2020 | 2:59 PM

गौतम गंभीरच्या अनेक चाहत्यांनी त्याच्या 2007 आणि 2011 मधील विश्वचषकातील स्पर्धेतील अंतिम सामन्यातील कामगिरीला उजाळा दिला. तु नसतास तर त्या दिवशी काय झाले असते, अशी अनेक ट्विट्स गंभीरच्या चाहत्यांनी केली आहेत. (Gautam Gambhir Birthday)

Gautam Gambhir Birthday | तू होतास म्हणून..., गंभीरच्या वाढदिनी चाहत्यांकडून 2011 च्या वर्ल्डकपची आठवण
Follow us on

मुंबई: टीम इंडियाचा माजी सलामीवीर आणि भाजपा खासदार गौतम गंभीरच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. क्रिकेटचं मैदान गाजवून राजकारणाच्या मैदानात यशस्वी एन्ट्री करणाऱ्या गंभीरवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. चाहत्यांनी गंभीरच्या 2007 आणि 2011 मधील विश्वचषकातील स्पर्धेतील अंतिम सामन्यातील कामगिरीला उजाळा दिला. तू नसतास तर त्या दिवशी काय झाले असते, अशे अनेक ट्विट्स गंभीरच्या चाहत्यांनी केली आहेत. 2011 च्या अंतिम सामन्यात गंभीरनं श्रीलंकेविरुद्ध 97  धावांची खेळी करत भारताच्या विजयाचा पाया रचला होता. (Gautam Gambhir Fans remembers his inning in world cup final 2011 against Shri Lanka )

2007 चा टी-20 आणि 2011 चा विश्वचषक जिंकून देणारा खरा हिरो
गौतम गंभीर हे भारतीय क्रिकेटमधलं एक असं नाव, ज्याने अनेक ऐतिहासिक विक्रम तर केले, पण त्याचं श्रेय त्याला कधीही मिळालं नाही. 28 वर्षांनी भारतीय संघाचं विश्वविजेता होण्याचं जे स्वप्न होतं, ते तत्कालीन कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या 2011 च्या विश्वचषकातील अखेरच्या षटकानंतर पूर्ण झालं. श्रीलंकन गोलंदाजांनी त्या सामन्यात सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, विराट कोहली यांच्यासारखे दिग्गज माघारी धाडले होते. पण गंभीरने धीर सोडला नाही. त्याने टिच्चून फलंदाजी केली आणि भारतीय संघाला लय मिळवून दिली. त्या सामन्यात गौतम गंभीर विजयी समारोप करण्याच्या तयारीत असतानाच 97 धावांवर तो बाद झाला.

भारताने 2007 मध्ये पहिला टी-20 विश्वचषक जिंकला. पाकिस्तान विरुद्धच्या महत्त्वाच्या आणि ऐतिहासिक सामन्यात गंभीरने 54 चेंडूत 75 म्हणजे संपूर्ण संघाच्या तुलनेत निम्म्या धावा एकट्यानेच केल्या होत्या. पण, श्रीसंतने जेव्हा मिसबाह उल हकचा झेल घेतला आणि भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब झालं तोच क्षण प्रत्येकाच्या लक्षात राहिला. रियल हिरो गौतम गंभीरची खेळी त्या विश्वचषकातही झाकोळली गेली.

शालेय क्रिकेटपासून संघर्ष
गौतम गंभीर आणि संघर्ष हे नातं नवं नाही. दमदार कामगिरीनंतरही गंभीरला अंडर-14 आणि अंडर-19 संघातून वगळण्यात आलं होतं. पण निराश झालेल्या गंभीरने कधीही जिद्द सोडली नाही आणि तो परिस्थितीशी लढत राहिला. त्याला जास्त काळ दुर्लक्षित करणं निवडकर्त्यांनाही जमलं नाही आणि अखेर त्याच्या स्वप्नातला दिवस 2003 साली आला. गंभीरने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातून भारतीय संघात पदार्पण केलं.

भारतीय संघात गौतम गंभीरनं स्वतःचं मजबूत स्थान निर्माण केलं आणि 2009 साली आयसीसी प्लेयर ऑफ दी इयर होण्याचा मान मिळवला. एवढंच नाही, तर तो सलग तीन वर्ष टॉप फलंदाजांमध्ये होता. सलग चार कसोटी मालिकांमध्ये 300 पेक्षा जास्त धावा करणारा गंभीर एकमेव भारतीय आहे. सलग 11 सामन्यांमध्ये 50 पेक्षा जास्त करणारा गंभीर जगातला दुसरा फलंदाज ठरला. त्याने वेस्ट इंडिजचे माजी दिग्गज फलंदाज सर व्हीव रिचर्ड्स यांच्या विक्रमाची बरोबरी केली.

गंभीरने कोलकाता नाईट रायडर्सला आयपीएलमध्ये नेतृत्त्वाचा करिष्मा दाखवत दोनवेळा चॅम्पियन बनवलं. गौतम गंभीरनं 58 कसोटी सामन्यांमध्ये 4158 धावा केल्या आहेत. गंभीरनं 147 एकदिवसीय सामन्यात 5238 धावा केल्या तर 37 टी-20 सामन्यांमध्ये 932 धावा काढल्या आहेत. क्रिकेट कारकिर्दीत गंभीरनं 20 शतकं ठोकली आहेत.

राजकारणाच्या मैदानातही गंभीरची एन्ट्री
क्रिकेटमधून निवृ्त्ती स्वीकारल्यानंतर गौतम गंभीरनं 2019 च्या लोकसभा निवडणुकीद्वारे राजकारणात प्रवेश केला. भाजपच्या तिकिटावर गंभरीनं पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला. काँग्रेसच्या अरविंद सिंह लवलींचा 3.91 लाख मतांनी पराभव केला.

संबंधित बातम्या :

Happy B’day Gautam Gambhir | दुर्लक्षित राहिलेला भारताचा हिरो – गौतम गंभीर

संजू सॅमसन पुढचा धोनी, शशी थरुर यांच्याकडून कौतुक, गौतम गंभीर भडकला

(Gautam Gambhir Fans remembers his inning in world cup final 2011 against Shri Lanka )