
नागपूरमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या टी 20 सामन्यात भारताने न्यूझीलंडवर एकतर्फी 48 धावांनी विजय मिळवला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 238 धावा केल्या. न्यूझीलंडच्या टीमने 190 धावा केल्या. टीम इंडियाला पहिल्या सामन्यात मोठा विजय मिळाला. पण हा विजय मिळवताना टीमच्या खेळाडूंनी एक नाही तर दोन-दोन अशा चूका केल्या जो चिंतेचा विषय आहे. जर, असचं सुरु राहिलं, तर पुढच्या महिन्यापासून सुरु होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचं जिंकणं खूप कठीण आहे.
पहिल्या सामन्यात भारतीय टीमच्या फलंदाज आणि गोलंदाजांनी जबरदस्त प्रदर्शन केलं. पण फिल्डिंगमध्ये कामगिरी सरासरी होती. न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या टी 20 सामन्यात इशान किशन आणि रिंकू सिंह दोघांनी सोपे झेल सोडले. कॅच सोडणं हा फक्त एका मॅचचा विषय नाही. मागच्या काही सामन्यात भारतीय खेळाडू कॅच सोडत असल्याचं दिसून आलय. टेस्ट असो वा वनडे सीरीज टीम इंडियाचे खेळाडूंची फिल्डिंगमधील कामगिरी निराशाजनक आहे. कॅच पकडण्याच्या बाबतीत भारतीय टीम तिन्ही फॉर्मेटमध्ये खूप खाली आहे.
काय सांगता, इतके चान्स सोडले
भारतीय क्रिकेट टीमच्या फिल्डिंगच्या आकड्यांवर नजर टाकली तर ते खूप खराब आहेत. 2023 पासून आतापर्यंत टेस्ट खेळणाऱ्या 12 टीम्समध्ये कॅच पकडण्याच्या बाबतीत भारतीय टीम 10 व्या नंबरवर आहे. भारताची कॅच एफिशिएन्सी 78.1 टक्के आहे. इंग्लंड विरुद्ध टेस्ट सीरीजमध्ये भारताने पहिल्या 3 टेस्ट मॅचमध्ये 8 कॅच सोडले. संपूर्ण सीरीजमध्ये भारताने एकूण 23 संधी गमावल्या.
तर दुसऱ्यांदा आपण वर्ल्ड कप कसा जिंकणार?
वनडेमध्ये भारताची कॅच एफिशिएंसी 75.6 टक्के आहे. यातही भारत 10 व्या स्थानी आहे. आशिया कप 2025 मध्ये भारताने 25 पैकी 12 झेल सोडले. 8 टीम्समध्ये आपण हॉन्गकॉन्ग पेक्षा पुढे होतो. भारतीय खेळाडू इतके फिट आहेत, मग ते इतक्या कॅच का सोडत आहेत? टी 20 वर्ल्ड कप सारख्या स्पर्धेत असचं प्रदर्शन कायम राहिलं, तर दुसऱ्यांदा आपण वर्ल्ड कप कसा जिंकणार? या समस्येवर जलदगतीने उपाय शोधावा लागेल.