WCL 2025 : दोन महिन्यात पहलगाम विसरले, कुठे गेली देशभक्ती? युवराज, धवन, रैनावर भारतीय चाहत्यांचा संताप

WCL 2025 : वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्स लीगच्या निमित्ताने भारतीय क्रिकेट चाहते युवराज सिंग, शिखर धवन आणि सुरेश रैनावर खवळले आहेत. दोन महिन्यातपूर्वी माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी भारताविरुद्ध गरळ ओकत होता. त्याला शिखर धवनने सुनावलेलं. पण आता दोन महिन्यातच भारताच्या या स्टार क्रिकेटर्सना पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा विसर पडल्याच दिसत आहे.

WCL 2025 : दोन महिन्यात पहलगाम विसरले, कुठे गेली देशभक्ती? युवराज, धवन, रैनावर भारतीय चाहत्यांचा संताप
yuvraj singh-shikhar dhawan
Image Credit source: instagram
| Updated on: Jul 19, 2025 | 9:47 AM

आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या T20 लीग सुद्धा जगभरात सुरु आहेत. आजी क्रिकेटपटूंसह माजी म्हणजे निवृत्त खेळाडूंसाठी सुद्धा लीग होत आहेत. अशीच एक लीग इंग्लंडमध्ये आहे. त्यावरुन भारतीय क्रिकेट चाहते भडकले आहेत. ही वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्स लीग आहे. या लीगचा हा दुसरा सीजन आहे. या लीगच्या निमित्ताने भारत-पाकिस्तान सामना होणार आहे. त्यावरुन भारतीय चाहते खवळले आहेत.

वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्स लीगच्या दुसऱ्या सीजनची सुरुवात 18 जुलैपासून झाली. या लीगमध्ये भारत, पाकिस्तानशिवाय इंग्लंड, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू सुद्धा खेळणार आहेत. याआधी 2024 साली इंग्लंडमध्ये ही लीग आयोजित करण्यात आली होती. यात युवराज सिंगच्या नेतृत्वाखाली भारताने पाकिस्तानला हरवून किताब जिंकला होता.

पहलगाम विसरले का?

मागच्या सीजनमध्ये भारत-पाकिस्तानच्या एकत्र खेळण्यावरुन कुठलाही वाद झाला नाही. पण आता पाकिस्तान विरुद्ध खेळण्यावरुन भारतीय फॅन्स खवळले आहेत. यावेळी सुद्धा युवराज सिंगच टीम इंडियाचा कॅप्टन आहे. भारतीय फॅन्स खवळण्याचं कारण आहे, पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेला दहशतवादी हल्ला. त्यात निरपराध 26 भारतीय पर्यटकांची हत्या झाली. त्यानंतर 7 ते 10 मे दरम्यान भारत-पाकिस्तानमध्ये सैन्य संघर्ष झाला.

कधी विसरणार नाहीत असा धडा शिकवला

भारताने 7 मे रोजी पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ ऑपरेशन सिंदूर लॉन्च केलं. भारताने पाकिस्तानात घुसून त्यांचे दहशतवादी तळ नष्ट केले. त्यानंतर पाकिस्तानने भारतावर हल्ला केला. पण भारताने पाकिस्तानचा हल्ला यशस्वीरित्या परतवून लावला. त्यांना कधी विसरणार नाहीत असा धडा शिकवला.


धवनची देशभक्ती कुठे गेली?

ही तीच वेळ होती, जेव्हा शाहिद आफ्रिदी आणि काही माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू भारताविरुद्ध सोशल मीडियावर गरळ ओकत होते. खासकरुन पाकिस्तानचा पराभव होऊनही या आफ्रिदीने खोटी विक्ट्री परेड काढलेली. याचवेळी शिखर धवनने आफ्रिदीला सोशल मीडियावर प्रत्युत्तर दिलेलं. आपली देशभक्ती दाखवून दिली.


फक्त एकटा धवन नाहीय, तर….

ऑपरेशन सिंदूरनंतर अवघ्या 2 महिन्यात शिखर धवन त्याच शाहिद आफ्रिदीसोबत एकत्र मॅच खेळण्यासाठी उतरणार आहे. फक्त एकटा धवन नाही, युवराज सिंग, सुरेश रैना, इरफान पठानसह अनेक नावाजलेले खेळाडू या टुर्नामेंटमध्ये खेळणार आहेत. आफ्रिदी, मोहम्मद हफीज, शोएब मलिक सारख्या पाकिस्तानी खेळाडूंसोबत खेळणार आहेत. यावरुन भारतीय चाहते खवळले आहेत. यांची देशभक्ती कुठे गेली? असा प्रश्न विचारत आहेत.