दुखापत नव्हे, विजय शंकरला परत पाठवण्यामागे दुसरंच कारण?

| Updated on: Jul 01, 2019 | 8:34 PM

विजय शंकरच्या पायाच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. पण सूत्रांच्या माहितीनुसार, विजय शंकरला भारतात परत पाठवण्यामागे विजय शंकरची दुखापत हे कारण नाही. त्याची कामगिरी पाहता संघात त्याच्यासाठी योग्य स्थान नसल्यामुळेच त्याला वगळण्यात आल्याचं बोललं जातंय.

दुखापत नव्हे, विजय शंकरला परत पाठवण्यामागे दुसरंच कारण?
Follow us on

लंडन : विश्वचषकात टीम इंडियाला आणखी एक धक्का बसलाय. दुखापतीमुळे अष्टपैलू विजय शंकर विश्वचषकातून बाहेर पडलाय. त्याच्या जागी सलामीवीर मयांक अग्रवालला संधी देण्यात आली. विजय शंकरच्या पायाच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. पण सूत्रांच्या माहितीनुसार, विजय शंकरला भारतात परत पाठवण्यामागे विजय शंकरची दुखापत हे कारण नाही. त्याची कामगिरी पाहता संघात त्याच्यासाठी योग्य स्थान नसल्यामुळेच त्याला वगळण्यात आल्याचं बोललं जातंय.

सूत्रांच्या माहितीनुसार, संधी देऊनही विजय शंकरला चौथ्या क्रमांकाचा फलंदाज म्हणून विश्वास मिळवून देता आला नाही. याबाबतीत संघव्यवस्थापन आणि बीसीसीआयचा विश्वास मिळवण्यात त्याला अपयश आलं आणि त्याची रवानगी करण्यात आली.

जसप्रीत बुमराच्या गोलंदाजीवर सराव करताना विजय शंकरच्या बोटाला दुखापत झाली होती. पण ती दुखापत अत्यंत किरकोळ होती. यानंतर तो फिटनेस टेस्टमध्येही पास झाला. पण इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात रिषभ पंतला संधी देण्यासाठी विजय शंकरला वगळण्यात आलं. विजय शंकरला वगळण्यासाठी त्याची दुखापत हे कारण नव्हतं, असंही सूत्रांनी सांगितलंय.

सलामीवीर शिखर धवन माघारी परतल्यामुळे टीम इंडियाच्या सलामीचा प्रश्न निर्माण झालाय. केएल राहुल फॉर्ममध्ये दिसत नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, या परिस्थितीमध्ये विजय शंकरला संघात ठेवण्यात काहीही अर्थ नव्हता. पण आयसीसीच्या नियमांनुसार फक्त दुखापतीच्या कारणास्तवच खेळाडू बदलला जाऊ शकतो.

सलामीला अपयशी ठरलेल्या केएल राहुलला आता चौथ्या क्रमांकावर खेळवलं जाण्याची रणनीती असल्याची माहिती आहे. कारण, पहिल्या क्रमांकावर फलंदाजीसाठी भारताकडे मयांक अग्रवालचा पर्याय आहे. तो एक स्फोटक फलंदाज म्हणूनही ओळखला जातो. शिखर धवन माघारी परतलाय, गोलंदाज भुवनेश्वर कुमार बसून आहे, त्यात विजय शंकर हा एक अतिरिक्त खेळाडू बनला होता.

भारतासाठी पुढील दोन सामने महत्त्वाचे आहेतच, पण त्यापेक्षाही महत्त्वाचा सेमीफायनल असेल. त्याअगोदर दोन सामन्यात चौथ्या क्रमांकासाठी आणि सलामीसाठी प्रयोग करुन पाहण्याची संधी भारताकडे आहे. त्यामुळे राहुलला चौथ्या क्रमांकावर आणि मयांकला सलामीला उतरवण्यासाठीच विजय शंकरला परत पाठवलं असल्याची माहिती आहे. भारत 2 जुलैला बांगलादेश आणि 6 जुलैला श्रीलंकेविरुद्ध खेळणार आहे. त्यानंतर गुणतालिकेतील अव्वल चार संघांमध्ये सेमीफायनल सामने होतील.