धोनीमुळे 2011 च्या विश्वचषकात माझं शतक हुकलं, गौतमचा ‘गंभीर’ दावा

| Updated on: Nov 18, 2019 | 10:07 AM

2011 मध्ये विश्वचषकाच्या अंतिम फेरीत कर्णधार धोनीचा सल्ला ऐकल्यामुळे माझं शतक हुकलं, असा दावा गौतम गंभीरने केला आहे.

धोनीमुळे 2011 च्या विश्वचषकात माझं शतक हुकलं, गौतमचा गंभीर दावा
Follow us on

नवी दिल्ली : क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर भाजपच्या तिकीटावर खासदार झालेला गौतम गंभीर सध्या या न् त्या कारणाने चर्चेत आहे. 2011 मध्ये विश्वचषकाच्या अंतिम फेरीत कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा सल्ला ऐकल्यामुळे माझं शतक हुकलं, असा आरोप गंभीरने (Gautam Gambhir blames Dhoni) केला आहे. त्यानंतर नेटिझन्सनी मात्र गंभीरलाच धारेवर धरलं आहे.

दिल्लीतील प्रदूषणावर संसदीय बैठकीला दांडी मारुन इंदूरमध्ये जिलबीवर ताव मारणाऱ्या गंभीरचे फोटो दोनच दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यावरुन सोशल मीडियावर ट्रोलिंग, तर दिल्लीत ‘आमचे खासदार बेपत्ता’ असं होर्डिंगही लागले. हे कमी होतं, म्हणून की काय गंभीरने एका ऑनलाईन पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत धोनीवर खापर फोडून नेटिझन्सचा आणखी रोष ओढवून घेतला आहे.

‘कर्णधार धोनीने दिलेल्या सल्ल्यामुळे माझं लक्ष विचलित झालं आणि माझी शतकी खेळी होऊ शकली नाही’ असं गौतम गंभीरचं म्हणणं आहे. ‘2011 मधील विश्वचषकात श्रीलंकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात 97 धावांवर खेळताना अचानक काय झालं? हा प्रश्न मला अनेक वेळा विचारला जातो. 97 वर पोहचेपर्यंत मी वैयक्तिक धावसंख्येचा विचारच केला नव्हता, असं मी प्रत्येक तरुणाला सांगतो. श्रीलंकेने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्याचा एकच विचार माझ्या डोक्यात होता. मला चांगलंच आठवतंय, षटक संपल्यावर धोनी माझ्याजवळ आला. मी आणि तो क्रीझवर होतो. तो म्हणाला, तीनच धावा बाकी आहेत. तीन धावा काढ म्हणजे तुझं शतक पूर्ण होईल.’ असं गौतमने सांगितलं.

प्रदूषणावरील बैठकीला दांडी मारुन जिलेबीवर ताव, गंभीर ट्रोल

‘तुम्ही संघाच्या धावसंख्येचा विचार करत असताना तुमचं लक्ष वैयक्तिक परफॉर्मन्सकडे विचलित होतं. त्यामुळे माझं रक्त उसळलं. त्याआधी श्रीलंकेच्या टार्गेटकडे माझं लक्ष होतं, ते तसंच राहिलं असतं, तर माझं शतकही पूर्ण झालं असतं.’ अशी खंत गंभीरने बोलून दाखवली.

‘बाद होऊन ड्रेसिंग रुमकडे जातानाच माझ्या मनात विचारांचं काहूर माजलं होतं. या तीन धावा आता मला आयुष्यभर छळत राहणार, असं मी मनात म्हटलं होतं. आणि ते खरं ठरतंय. आजही मला चाहते विचारतात तू त्या तीन धावा का घेतल्या नाहीस.’ असं गंभीर (Gautam Gambhir blames Dhoni) म्हणाला.

2011 मधील विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा सहा विकेट्सनी धुव्वा उडवून विश्वचषक उंचावला होता. 91 धावांवर नाबाद राहिलेला धोनी ‘सामनावीर’ ठरला होता.