
कुठल्याही सामन्यात असा एक क्षण असतो, ज्याची नेहमीच चर्चा होते. भारत-पाकिस्तान सामनाही याला अपवाद नाही. भारत-पाकिस्तान सामन्यात विकेट गेल्यानंतर सेलिब्रेशन असो किंवा बाऊंड्री-सिक्स मारणं, त्या क्षणापेक्षापण मोहसीन नक्वी यांची चर्चा आहे. रविवारी 15 फेब्रुवारीला श्रीलंकेत कोलंबोमध्ये प्रेमदासा स्टेडियमवर भारत-पाकिस्तान सामना झाला. भारतीय क्रिकेट चाहत्यांनी या सामन्याच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला. कारण भारताने हा सामना सहज जिंकला. भारताने पाकिस्तानवर टी20 वर्ल्ड कपमधील आतापर्यंतचा मोठा विजय मिळवला. भारत-पाकिस्तान सामन्यात मोहसीन नक्वी चर्चेत येण्यामागचं कारण आहे, त्यांचं न थांबणं.
प्रेमदासा स्टेडियमच्या व्हीआयपी कक्षात मोहसीन नक्वी बसले होते. ते पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आहेत. पण सामना जसा-जसा भारताच्या बाजूने झुकायला लागला, ते नक्वी यांना सहन झालं नाही. सामन्यातील शेवटचा चेंडू टाकण्याआधीच मोहसीन नक्वी आपल्या जागेवरुन निघून गेल्याचं दिसलं. पाकिस्तानचा शेवटचा विकेट पडेपर्यंत नक्वी तिथे थांबले नाहीत. आवश्यक धावगती वाढत चाललेली आणि स्कोरबोर्डवर पाकिस्तानची स्थिती वाईट होत चालली, आपण हरणार याची नक्वी यांना जणू आधीच चाहूल लागली होती. त्यामुळे ते शेवटापर्यंत थांबले नाहीत. ते आधीच तिथून निघून गेले.
पाक गोलंदाजांची अक्षरक्ष: लक्तरं काढली
या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 7 बाद 175 धावांचा डोंगर उभारला. पाकिस्तानचा डाव अवघ्या 114 धावात आटोपला. संपूर्ण सामन्यातही कुठल्याही टप्प्यावर पाकिस्तान मॅचमध्ये आहे असं अजिबात वाटलं नाही. या विजयाने टीम इंडियाचा सुपर-8 मधील प्रवेश निश्चित झाला आहे. पाकिस्तानला मात्र आता नामीबिया विरुद्ध जिंकावचं लागेल. ग्रुप ए मध्ये टीम इंडिया टॉपवर आहे. इशान किशनने काल पाकिस्तानी गोलंदाजांची अक्षरक्ष: लक्तरं काढली. इशान किशन क्रीजवर असेपर्यंत एकही पाकिस्तानी गोलंदाज छाप पाडू शकला नाही. इशान किशनने चौफेर फटकेबाजी करत पाकिस्तानी गोलंदाजांना झोडून काढलं.
हे त्यांना सहनच झालं नाही
आशिया कप प्रमाणे या मॅचमध्येही कर्णधार सूर्यकुमार यादवसह संपूर्ण टीमने पाकिस्तानी खेळाडूंशी कुठेही हस्तांदोलन केलं नाही. हा पराभव नक्वी यांच्या जास्त जिव्हारी लागणं स्वाभाविक आहे. कारण आशिया कप फायनलच्यावेळी आशियाई क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष असूनही टीम इंडियाने त्यांच्याकडून विजेतेपदाची ट्रॉफी स्वीकारली नव्हती. त्यावेळी ते ट्रॉफी आपल्यासोबत घेऊन गेले होते. यावरुन बराच वाद झालेला. ते पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आहेत. इतका सगळा अपमान झाल्यानंतर पुन्हा वर्ल्ड कपमध्ये भारताकडून पराभव होणं हे त्यांना सहनच झालं नाही. म्हणून नक्वी मॅच संपण्याआधीच तिथून निघून गेले.