सामन्याला काही तास उरलेले असतानाच पाकिस्तानचा खतरनाक प्लान… टीममध्ये मोठे फेरबदल; त्या खेळीने अडचण वाढणार?

भारत विरुद्ध पाकिस्तानच्या सामन्यासाठी क्रिकेटप्रेमी प्रचंड उत्सुक आहेत. टीम इंडियासाठी आनंदाची बातमी म्हणजे अभिषेक शर्मा पूर्णपणे तंदुरुस्त आहे. परंतु पाकिस्तानच्या टीमने सामन्याच्या काही तास आधीच टीममध्ये मोठे फेरबदल केले आहेत.

सामन्याला काही तास उरलेले असतानाच पाकिस्तानचा खतरनाक प्लान... टीममध्ये मोठे फेरबदल; त्या खेळीने अडचण वाढणार?
Ind vs Pak
Image Credit source: Instagram
| Updated on: Feb 15, 2026 | 12:57 PM

भारत-पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधील ट्वेंटी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील लढत अखेर आज (रविवारी) कोलंबोच्या के. आर. प्रेमदासा मैदानावर पार पडेल. या सामन्यात मधल्या फळीची कामगिरी आणि षटकांचा खेळ महत्त्वाचा ठरणार आहे. संपूर्ण दक्षिण आशिया हा सामना घडवून आणण्यासाठी प्रयत्न करत होता. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6.30 वाजता टॉस होणार असून प्रत्यक्ष सामना 7 वाजता सुरू होईल. टीम इंडियाचा सलामीवीर अभिषेक शर्मा पूर्णपणे बरा झाला असून 14 फेब्रुवारी रोजी नेट प्रॅक्टिसमध्ये त्याने भाग घेतला. दरम्यान या सामन्याला काही तास उतरले असतानाच पाकिस्तानने त्यांच्या टीममध्ये मोठे फेरबदल केले आहेत. या सामन्यात पाकिस्तानी संघ पाच फिरकीपटू मैदानात उतरवण्याची अपेक्षा आहे. यामध्ये शादाब खान, उस्मान तारिक, अबरार अहमद, सॅम अयुब आणि मोहम्मद नवाज यांचा समावएश आहे.

पाकिस्तान संघाची रणनीती काय?

सॅम आयुब हल्ली चांगली गोलंदाजी करतोय. म्हणजेच पाकिस्तानकडे पाचवा फिरकीपटू पर्यात म्हणून राहील. तर मिस्ट्री स्पिनर उस्मान तारिक हा त्यांचा ट्रम्प कार्ड मानला जातोय. पाकिस्तानी टीमने अमेरिकेविरुद्धही अशीच रणनीती आखली होती. त्यावेळीसुद्धा त्यांनी पाच फिरकीपटू मैदानात उतरवले होते. टीम इंडियाबद्दल बोलायचं झाल्यास, सलामीवीर अभिषेक शर्मा हा पोटाच्या संसर्गामुळे तंदुरुस्त नव्हता. म्हणूनच नामिबियाविरुद्धच्या सामन्यातून तो वगळण्यात आला होता. आता अभिषेक टीममुळे परतल्यामुळे संजू सॅमसनला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्याची शक्यता आहे.

प्रेमदासा मैदानाची खेळपट्टी ही फिरकीपटूंसाठी अनुकूल मानली जाते. त्यामुळे टीम इंडिया या सामन्यात कुलदीप यादवलाही मैदानात उतरवू शकते. म्हणजेच भारतीय संघात एकूण तीन फिरकीपटूंचा समावेश होऊ शकतो. जर कुलदीप खेळात सहभागी झाला तर वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला बाजूला बसावं लागू शकतं. भारताकडे वेगवान गोलंदाजांमध्ये शिवम दुबेचाही पर्याय आहे. तर जसप्रीत बुमराहसोबत हार्दिक पांड्यासुद्धा बॉलिंग करू शकतो.

या सामन्याच्या पार्श्वभूमीवर टीम इंडियाचा कॅप्टन सूर्यकुमार यादव म्हणाला, “रविवारी जेव्हा आपण सामना सुरू करू, तेव्हा उत्कंठा शिगेला पोहोचलेली असेल. परंतु मी असं म्हणू इच्छितो की कोणताही दबाव नाही, चिंता नाही. ही एक मोठी संधी आहे.” तर पाकिस्तानी टीमचा कॅप्टन सलमान अली आगा म्हणाला, “मला झोप तर आलीच नाही, परंतु माझ्या दाढीचे केस पांढरे झाले आहेत. जेव्हा तुम्ही टीमचे कर्णधार असता आणि 250 ते 260 दशलक्ष लोकांचं प्रतिनिधित्व करता, तेव्हा ही एक अतिरिक्त जबाबदारी तुमच्या खांद्यावर असते. जेव्हा तुम्ही तुमच्या देशासाठी भाग घेतला आणि टीमचे कॅप्टन असता, तेव्हा तुम्ही जबाबदारीपासून पळू शकत नाही.”

टीम इंडियाचे संभाव्य प्लेइंग 11- अभिषेक शर्मा, इशान किशन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग/कुलदीप यादव

पाकिस्तानी टीमचे संभाव्य प्लेइंग 11- सॅम अयुब, साहिबजादा फरहान, सलमान अली आगा (कर्णधार), बाबर आझम, उस्मान खान (यष्टीरक्षक), शादाब खान, मोहम्मद नवाज, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, उस्मान तारिक आणि अबरार अहमद