विराट कोहलीला जीवे मारण्याचा दहशतवाद्यांचा कट!

| Updated on: Oct 29, 2019 | 12:22 PM

विराटसोबतच राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवत अशा 12 जणांच्या नावांचा समावेश हिटलिस्टमध्ये आहे.

विराट कोहलीला जीवे मारण्याचा दहशतवाद्यांचा कट!
Follow us on

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ‘ऑल इंडिया लष्कर-ए-तोयबा’ नामक एका दहशतवादी संघटनेने कोहलीला जीवे मारण्याचा कट (Virat Kohli on Terrorist Hit list) रचल्याची माहिती आहे. राष्ट्रीय तपास संस्थेला मिळालेल्या हिटलिस्टवर विराटसह अनेक दिग्गजांची नावं असल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

‘ऑल इंडिया लष्कर हाय पावर कमिटी कोझीकोड, केरळ’ अशा नावाने ही यादी ‘एनआयए’कडे पाठवण्यात आली आहे. विराटसोबतच राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवत, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, काश्मिरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्याही नावांचा समावेश आहे.

भारताचं पाकिस्तानला चोख उत्तर, लष्कराकडून 4 दहशतवादी तळ उद्ध्वस्त

राजकीय नेते अनेक वेळा दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असतात, परंतु चित्रपट किंवा क्रीडा क्षेत्रातील एखादा सेलिब्रिटी दहशतवाद्यांच्या हिटलिस्टमध्ये असण्याचा प्रकार फारसा घडत नाही. संबंधित दहशतवादी संघटना नवीन असल्यामुळे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी ही यादी जारी केल्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

दक्षिण आफ्रिकेविरोधात विराट कोहलीच्या नेतृत्वात नुकतंच टीम इंडियाने कसोटी मालिका जिंकली होती. त्यानंतर विराट कोहली पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत दिवाळी साजरी करताना दिसत आहे. कोहलीने ट्विटरवर फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या होत्या. आता कोहलीच्या सुरक्षेत वाढ होणार आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानच्या कुरापती वाढल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर एका नव्या दहशतवादी संघटनेनं डोकं वर काढल्याची चिन्हं आहेत. बिथरलेल्या एखाद्या गटाने भारतातील नामांकित चेहऱ्यांना लक्ष्य केल्याचं दिसत आहे. पाकिस्तानने हात झटकण्यासाठी लष्कर ए तोयबाच्या नावापुढे ‘ऑल इंडिया’ हा शब्द योजल्याचं म्हटलं जातं.

आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तान एकटा पडल्यामुळे छुप्या पद्धतीने भारतातील प्रसिद्ध चेहऱ्यांवर हल्लाबोल करण्याचा पाकिस्तानचा डाव (Virat Kohli on Terrorist Hit list) असल्याचं म्हटलं जात आहे.