RCB vs GT : आरसीबीच्या विजयी हॅटट्रिकनंतर कॅप्टन फाफ खुश, म्हणाला…
Faf Du Plessis RCB vs GT : आरसीबीने गुजरातला पराभूत करत आयपीएलच्या 17 व्या हंगामात विजयाची हॅटट्रिक पूर्ण केली. या विजयानंतर आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसीस काय म्हणाला?
फाफ डु प्लेसीस याच्या नेतृत्वात आरसीबी अर्थात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 52 वा सामना जिंकला. आरसीबीने गुजरात टायटन्सवर 4 विकेट्सने आश्वासक विजय मिळवला. आरसीबीने विजयासाठी मिळालेलं 148 धावांचं आव्हान 13.4 ओव्हममध्ये 6 विकेट्स गमावून पूर्ण केलं. कॅप्टन फाफ डु प्लेसिस याने 64 तर विराट कोहलीने 42 धावांच योगदान दिलं. तर त्याआधी आरसीबीच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत गुजरातला 150 च्या आत गुंडाळलं. आरसीबीच्या गोलंदाजांनंतर फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. आरसीबीचा हा सलग तिसरा आणि एकूण चौथा विजय ठरला. या विजयानंतर कॅप्टन फाफ डु प्लेसीस काय म्हणाला हे जाणून घेऊयात.
फाफने काय म्हटलं?
“आम्ही गेल्या काही सामन्यांमध्ये बॅटिंग आणि बॉलिंगने खरोखरच चांगली कामगिरी केली आहे. आम्ही मैदानातही अविश्वसनीय आहोत”, असं फाफने आरसीबीच्या विजयानंतर म्हटलं. “विकेट जरा वेगळी होती, थोडी जास्त उसळी होती. ती माहिती आम्ही खेळपट्टीवरून घेऊन गोलंदाजांना देऊ, याची खात्री करायची होती”, असंही फाफने नमूद केलं. “आम्ही बॅटिंगसाठी बाहेर पडलो तेव्हा आम्ही स्कोअर बोर्डकडं पाहिलं नाही ,हे महत्त्वाचे होते आणि आम्ही ज्या पद्धतीने खेळतो तसेच खेळण्याचा प्रयत्न केला. जरा निराश होतो”, असंही फाफने सांगितलं.
विराट कोहली ऑरेंज कॅपचा मानकरी
विराट कोहलीने गुजरात विरुद्ध केलेल्या 42 धावांच्या खेळीमुळे त्याला चांगलाच फायदा झाला आहे. विराटने पुन्हा एकदा ऑरेंज कॅप मिळवली आहे. विराटने चेन्नई सुपर किंग्सचा कॅप्टन ऋतुराज गायकवाड याला मागे टाकत ही ऑरेंज कॅप मिळवली आहे. या सामन्याआधी ऋतुराज आणि विराट या दोघांच्या धावांमध्ये फक्त 8 धावांचा फरक होता. मात्र विराटने गुजरात विरुद्ध 8 धावा पूर्ण करत ही कॅप मिळवली.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू प्लेइंग ईलेव्हन : फाफ डू प्लेसिस (कॅप्टन), विराट कोहली, विल जॅक्स, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), कर्ण शर्मा, स्वप्नील सिंग, मोहम्मद सिराज, यश दयाल आणि विजयकुमार वैशाक.
गुजरात टायटन्स प्लेइंग ईलेव्हन : शुबमन गिल (कर्णधार), ऋद्धीमान साहा, साई सुधारसन, डेव्हिड मिलर, शाहरुख खान, राहुल तेवतिया, रशीद खान, मानव सुथार, नूर अहमद, मोहित शर्मा आणि जोशुआ लिटल.