
भारतात आधारकार्डला नागरिकांची ओळखपत्र म्हणून महत्वाचे सरकारी कागदपत्र म्हणून पाहिले जाते. एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर ते आधारकार्ड रद्द करावे लागते. मात्र गेल्या १४ वर्षात केवळ १.१५ कोटी आधारनंबर संबंधिक नागरिकाचा मृत्यू झाल्यानंतर रद्द करण्यात आले होते. मात्र देशात या काळात झालेल्या मृत्यूच्या तुलनेत हा आकडा खूपच कमी असल्याचे माहितीच्या अधिकारात उघड झाले आहे.
संयुक्त राष्ट्र लोकसंख्या विभागानुसार एप्रिल २०२५ पर्यंत भारताची एकूण लोकसंख्या १४६.३९ कोटी रुपये आहे. तर आधारकार्डधारकांची संख्या १४२.३९ कोटी आहे. या तुलनेत भारताच्या सिटीझन रजिस्ट्रेशन सिस्टीम ( CRS ) अनुसार २००७ ते २०१९ पर्यंत दरवर्षी सरासरी ८३.५ लाख लोकांचा मृत्यू होत असतो. अशात गेल्या १४ वर्षात ११.६९ कोटीहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. परंतू UIDAI ने केवळ १.१५ कोटी आधार नंबर बंद केले आहेत. याचा अर्थ १० टक्क्यांहून कमी नंबर बंद करण्यात आले आहेत.
देशात किती लोकांकडे आधार नाही याची संख्या काढली आहे का असे विचारले असता UIDAI ने अशी कोणतीही आकडेवारी उपलब्ध नसल्याचे उत्तर त्यांनी दिलेले आहे. UIDAI च्या मते जेव्हा रजिस्टार जनरल ऑफ इंडिया (RGI) आधार नंबरासह कोणा मृतकाचा डेटा सादर करते तेव्हाच एका प्रक्रीयेनंतर आधार नंबर निष्क्रीय केला जातो. ऑगस्ट २०२३ मध्ये जारी केलेल्या सर्क्युलरनुसार आधी मृत्यू रजिस्टरच्या डेटाला UIDAI च्या डेटाबेसशी संलग्न केला जातो तेव्हा दोन बाबी तपासल्या जातात. १) नाव ९० टक्के समान हवे आणि २ ) लिंग ( १०० टक्के ) जुळणारे आहे.
जर दोन्ही अटी पूर्ण झाल्या की मृत्यूनंतर त्या संबंधित आधार नंबरवरुन कोणतेही बायोमेट्रीक ऑथेंटीकेशन अपडेट तर झालेले नाही ना याची खात्री केल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जातो.जर मृत्यूनंतरही तो आधार नंबर वापरलेला असला तर पुढील तपास केला जातो. निष्क्रीय केलेला आधारनंबरही जर भविष्यात कोणत्याही प्रक्रीयेत वापरला असेल तर तर सिस्टीम उपयोग करणाऱ्यास सावधान करते. जर असा नंबर चुकून बंद केला असेल तर ती व्यक्ती बायोमेट्रीक व्हेरिफिकेशनने आधार पुन्हा सक्रीय करु शकते.
आरटीआयद्वारे विचारण्यात आले की गेल्या पाच वर्षांत दरवर्षी किती आधार नंबर मृत्यू नंतर बंद केले गेले.यावर UIDAI ने स्पष्ट सांगितले की अशी कोणतीही माहीती त्यांच्याकडे नाही. UIDAI ने केवळ एकूण आकडा सांगितले की ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत मृत्यूआधारे १.१५कोटी आधार नंबर निष्क्रीय करण्यात आले आहेत.
बिहारात स्पेशल समरी रिव्हीजन दरम्यान अनेक जिल्ह्यात १०० टक्क्यांहून अधिक आधार सॅच्युरेशन पाहायला मिळाले. उदा. किशनगंज: १२६ %, कटिहार आणि अररिया: १२३ %, पूर्णिया: १२१ %, शेखपुरा: ११८ %