PF Withdrawal: नोकरी सोडली किंवा गेल्यानंतर पीएफमधून किती पैसे काढता येणार, किती अडकणार?

ईपीएफ स्कीम 2026 अंतर्गत नोकरी सोडल्यानंतर किंवा गेल्यानंतर कर्मचारी आपला पूर्ण पीएफ लगेच काढू शकणार नाही. बेरोजगार झाल्यानंतर पीएफमधून फक्त 75 टक्के रक्कम काढू शकतील. तर उर्वरित रक्कम काढण्यासाठी एक अट असणार आहे.

PF Withdrawal: नोकरी सोडली किंवा गेल्यानंतर पीएफमधून किती पैसे काढता येणार, किती अडकणार?
PF Withdrawal: नोकरी सोडली किंवा गेल्यानंतर पीएफमधून किती पैसे काढता येणार, किती अडकणार?
Image Credit source: TV9 Network
| Updated on: Aug 01, 2026 | 10:47 PM

नोकरी करत असताना टिकेल की जाईल याची चिंता नोकरदार वर्गाला कायम असते. त्यात नोकरी गेली तर सर्वच लगेच दुसरी नोकरी मिळेल की नाही याचीही शाश्वती नसते. त्यामुळे अडचणीच्या काळात पीएफमध्ये जमा झालेल्या रकमेवर आर्थिक नियोजनाची स्थिती येऊन ठेपते. अशा परिस्थिती पीएफ खात्यातून किती रक्कम काढता येईल हा पहिला प्रश्न पडतो. नवा नियम लागू होण्यापूर्वी पीएफची पूर्ण रक्कम काढता येत होती. मात्र ईपीएफ योजना 2026 नियमावली लागू झाल्यानंतर आता ही रक्कम पूर्ण काढता येणार नाही. दोन महिन्यांनी सुद्धा तुम्ही तुमची पूर्ण रक्कम काढू शकणार नाहीत. सरकारने रिटायरमेंट सेव्हिंग सुरक्षित करण्यासाठी नियमात सुधारणा केली आहे. त्यामुळे पैसे काढण्याची मर्यादा निश्चित केली आहे.

आता किती पीएफ काढता येणार?

नव्या नियमानुसार, कर्मचारी बेरोजगार झाल्यास त्याला एकूण पीएफच्या रकमेपैकी 75 टक्के रक्कम तात्काळ काढता येणार आहे. यात कर्मचाऱ्याचे योगदानच नाही तर कंपनीचं योगदान आणि त्यावर मिळणारे व्याज यांचाही समावेश असेल. जर तुमच्या पीएफ खात्यात 1 लाख रुपये असतील तर तुम्हाला 75 हजार काढता येतील. पण उर्वरित 25 हजार काढता येणार नाही. उर्वरित 25 टक्के रक्कम काढण्यासाठी कर्मचारी सलग एक वर्ष म्हणजेच 12 महिने बेरोजगार असणं आवश्यक आहे. तर आणि तरच उर्वरित रक्कम काढता येईल.

आधीचा नियम काय होता?

जुन्या पीएफ नियमानुसार, नोकरी सोडल्यानंतर किंवा गेल्यानंतर दोन महिने बेरोजगार राहिल्यास कर्मचाऱ्याला पीएफ शिल्लक रक्कम काढता येत होती. पण अनेक जण नोकरी बदलल्यानंतर किंवा नवी नोकरी लागण्यापूर्वी आपल्या पीएफची पूर्ण रक्कम काढत होते. त्यामुळे सेवानिवृत्तीची बचत वारंवार कमी होत होती. पीएफचा उद्देश नोकरी बदलताना होणारा खर्च भागवणे नसून सेवानिवृत्तीसाठी बचत करणे आहे. पीएफमधील संपूर्ण रक्कम काढल्याने चक्रवाढीच्या लाभाला मुकतात. नवीन नियमांनुसार, किमान 25 टक्के रक्कम पीएफ खात्यातच राहील आणि त्यावर चक्रवाढ व्याज मिळत राहील.

पीएफवर अवलंबून राहणं योग्य नाही

तज्ज्ञांच्या मते, नोकरदार व्यक्तीला नोकरी लगेच मिळणं कधी कधी कठीण होतं. त्यामुळे 75 टक्के रक्कम मिळाल्यानंतर काही अंशी दिलासा मिळतो. पण नवी नोकरी लागण्यास वेळ लागला तर 25 टक्के रक्कम अडकून असणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्याला एक आपतकालीन फंड तयार ठेवावा लागणार आहे. यामुळे घर भाडं, रेशन, वीज बिल आणि दैनंदिन खर्च भागवणं सोपं होईल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us