मुंबई : भारतील रेल्वेकडून (Indian Railway) 21 जूनपासून देशातील पहिली भारत गौरव टूरिस्ट ट्रेन चालविण्यात येणार असल्याचे नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. आयआरसीटीसीने (IRCTC) सांगितले, की त्यांची टूरिस्ट ट्रेन आपल्या यात्रेदरम्यान, नेपाळच्या (Nepal) जनकपुरलाही जाणार आहे. आयआरसीटीसीची ही ट्रेन स्वदेश दर्शन स्कीमअंतर्गत रामायण सर्किटवर चालविण्यात येणार आहे. आणि भगवान श्री राम यांच्याशी निगडीत सर्व पवित्र जागांचे दर्शन या माध्यमातून भाविकांना मिळणार आहे. आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर मिळालेल्या माहितीनुसार, भारत गौरव टूरिस्ट ट्रेनचे पॅकेज 17 रात्री आणि 18 दिवसांसाठी असणार आहे.
आयआरसीटीसीने या टूर पॅकेजचे नाव भारत ‘गौरव टूरिस्ट ट्रेनव्दारा श्री रामायण यात्रा’असे ठेवले आहे. या यात्रेमध्ये 17 रात्री आणि 18 दिवसांचे पॅकेज देण्यात आले आहे. ही यात्रा 21 जून 2022 पासून सुरु होणार आहे. या यात्रेसाठी दिल्ली आणि टूण्डलापासून बोर्डिंग सुरु करण्यात येणार आहे. आगरा आणि दिल्ली स्टेशनवर यात्रा संपण्याची शक्यता आहे. या टूर पॅकेजमध्ये सर्व भाविकांना थर्ड क्लास एसी कोचमध्ये सीट देण्यात येणार आहेत. ट्रेनमध्ये सर्वच भाविकांसाठी शुध्द शाकाहारी जेवणदेखील मिळणार आहे.
दिल्ली आणि टूण्डलापासून भाविकांना घेतल्यानंतर या यात्रेचा पाहिला स्टॉप अयोध्या असणार आहे. अयोध्यानंतर ट्रेन नंदीग्राम, सीतामढी, जनपूर, वाराणसी, प्रयागराज, चित्रकूट, नाशिक, हम्पी, रामेश्वरम, कांचीपुरम, भद्राचलम मार्गे पुन्हा दिल्ली जाणार आहे. यात्रेदरम्यान, आयआरसीटीसीकडून संबंधित शहरांमध्ये एसी रुम असलेल्या हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
थर्ड एसी ट्रेन, एस रुमचे हॉटेल आणि खाण्यापिण्याची संपूर्ण व्यवस्था सोबत 18 दिवसांच्या या यात्रेचे सुरुवातीचे तिकीट 5 ते 11 वर्षांच्या मुलांसाठी 56700 रुपये आहे. एकच वयस्क व्यक्तीसाठी हे पेकेज 62370 रुपये आणि 71820 रुपये ठरविण्यात आले आहे. या पेकेजच्या अधिकच्या माहितीसाठी आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर जाउ शकतात.