Chandrakant Patil | ‘चंद्रकांत पाटील काय चीझ आहे माहीत नाही, कोणाला घाबरणार नाही’ : चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारचा पंचनामा केला. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला. महाविकास आघाडीच्या बेफिकीरीमुळे आणि भ्रष्टाचारामुळे राज्यातील प्रशासन कोसळले आहे.
पुणे: ठाकरे सरकारला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. या दोन वर्षात भ्रष्टाचार व गोंधळामुळे राज्यात प्रशासन कोसळले आहे. खुलेआम मोगलाई अवतरली आहे. सरकारचे शेतकरी, महिला, ओबीसी, मराठा, धनगर, अनुसूचित जाती – जमाती, विद्यार्थी, कामगार अशा कोणाकडेच लक्ष नाही. कोविडसह सर्व विषयात हे सरकार अपयशी ठरले आहे. संधी मिळाली तर राज्यातील जनता या सरकारला फेकून देतील, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. चंद्रकांत पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारचा पंचनामा केला. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला. महाविकास आघाडीच्या बेफिकीरीमुळे आणि भ्रष्टाचारामुळे राज्यातील प्रशासन कोसळले आहे. राज्याच्या एका पोलीस आयुक्तांनी गृहमंत्र्यांवर शंभर कोटी वसुलीचा आरोप केला. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआयने चौकशी सुरू केली. न्यायालयाच्या आदेशानंतर गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला आणि बरेच दिवस ते परागंदा होते. आरोप करणारे पोलीस आयुक्तही परागंदा होते. मंत्रिमंडळातील अनेक मंत्री चौकशीच्या फेऱ्यात आहेत, असं पाटील म्हणाले.