टिपू सुलतान संबंधीच्या वादग्रस्त तुलनेवरून काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी अखेर खेद व्यक्त केला आहे. भाजपने आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. मालेगाव महापालिकेत टिपू सुलतानची प्रतिमा लावण्यावर भाजपने आक्षेप घेतल्यानंतर, सपकाळ यांनी टिपू सुलतानचे कथित समर्थन करताना छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केल्यामुळे महाराष्ट्रात मोठा राजकीय वाद निर्माण झाला होता.
सपकाळ यांनी स्पष्ट केले की, ते टिपू सुलतानबद्दलच्या आपल्या भूमिकेवर आजही ठाम आहेत, मात्र भाजपने त्यांच्या शिवरायांशी केलेल्या तुलनेसंबंधीच्या विधानाचा विपर्यास केला. यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्याबद्दल खेद वाटतो, असे ते म्हणाले. दुसरीकडे, भाजपने सपकाळ यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध करत, त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागण्याची मागणी केली आहे. भाजपने सपकाळ यांच्या तुलनेला मूर्खपणाचे कृत्य म्हटले असून, समस्त हिंदू आघाडीनेही त्यांच्यावर कठोर टीका केली आहे. या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे.