Pahalgam Attack : संयुक्त राष्ट्रसंघात भारतानं केली पाकिस्तानची पोलखोल, संरक्षणमंत्र्यांच्या कबुलीमुळे पाक गोत्यात
संयुक्त राष्ट्रसंघात योजना पटेल यांच्याकडून पाकिस्तानची ही पोलखोल करण्यात आल्याची मोठी माहिती समोर येत आहे. यावेळी पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांच्या मुलाखतीचा भारताकडून उल्लेख करण्यात आला आहे. दरम्यान, संरक्षणमंत्री ख्वाजा आसीफ यांनी कबुलीच दिली असल्याचे योजना पटेल यांनी म्हटलंय.
संयुक्त राष्ट्र संघात भारताकडून पाकिस्तानची चांगलीच पोलखोल करण्यात आली आहे. संयुक्त राष्ट्र योजनेतील भारताचे प्रतिनिधी (डीपीआर) योजना पटेल यांनी पाकिस्तानला जोरदार फटकारले आहे. दहशतवादाला आश्रय देणारे आणि संपूर्ण प्रदेशाला अस्थिर करणारे ‘दुष्ट राष्ट्र’ असे त्यांनी पाकिस्तानचे वर्णन केले आणि भारतीयांच्या भावना बोलून दाखवल्या. योजना पटेल यांनी पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांच्या नुकत्याच झालेल्या यूएनमधील मुलाखतीचा उल्लेख केला, ज्यामध्ये त्यांनी पाकिस्तानमध्ये दहशतवादाला प्रोत्साहन दिल्याची कबुली दिली होती. खुद्द मंत्रीच ते मान्य करत असतील तर तिथे काय चालले आहे हे सांगण्याची गरज नाही, असे योजना पटेल म्हणाल्या आणि पाकिस्तानची पोलखोल केली. संयुक्त राष्ट्र दहशतवादविरोधी कार्यालयाने आयोजित केलेल्या बैठकीत बोलताना पटेल असेही म्हणाल्या की, ‘पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी कबूल केले की, पाकिस्तानला दहशतवादाला प्रशिक्षण आणि निधी पुरवण्याचा इतिहास आहे. यामुळे पाकिस्तान हा जागतिक दहशतवादाला प्रोत्साहन देणारा देश असल्याचे समोर आले आहे. जग यापुढे या धोक्याकडे डोळेझाक करू शकत नाही.