AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Water Cut | मुंबईकरांनो, पाणीकपात तूर्तास कायम! धरणसाठा 88.70% वर; पाऊस ओसरल्याने प्रशासनाचा मोठा निर्णय

Mumbai Water Cut | मुंबईकरांनो, पाणीकपात तूर्तास कायम! धरणसाठा 88.70% वर; पाऊस ओसरल्याने प्रशासनाचा मोठा निर्णय

| Updated on: Aug 10, 2026 | 10:09 AM
Share

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात प्रमुख धरणांमधील पाणीसाठा रविवारी सकाळी 88.70 टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या आठवड्यात हा पाणीसाठा 90 टक्क्यांच्या पुढे गेला होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पावसाने ओढ दिल्यामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात घट होत आहे. त्यामुळे मुंबईत सध्या लागू असलेली पाणीकपात तातडीने मागे घेण्याची शक्यता कमी असल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात प्रमुख धरणांमधील पाणीसाठा रविवारी सकाळी 88.70 टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या आठवड्यात हा पाणीसाठा 90 टक्क्यांच्या पुढे गेला होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पावसाने ओढ दिल्यामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात घट होत आहे. त्यामुळे मुंबईत सध्या लागू असलेली पाणीकपात तातडीने मागे घेण्याची शक्यता कमी असल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात जलाशयांमध्ये सध्या एकूण 88.70 टक्के पाणीसाठा आहे. यातील विहार आणि तुळशी या मुंबईच्या हद्दीतील दोन्ही तलावांमधील पाणीसाठा 90 टक्क्यांच्या पुढे गेला आहे. त्यामुळे पाणीकपात मागे घेतली जाईल, अशी आशा निर्माण झाली होती. मात्र, पावसाने पुन्हा विश्रांती घेतल्याने ही शक्यता सध्या कमी झाली आहे.

सध्या सातही धरणांमधील पाणीसाठ्याचा आढावा घेतला असता उर्ध्व वैतरणा 80.14 टक्के, मोडकसागर 99.99 टक्के, तानसा 98.77 टक्के, मध्य वैतरणा 90.55 टक्के, भातसा 86.28 टक्के, विहार 100 टक्के आणि तुळशी 99.87 टक्के इतका पाणीसाठा आहे. सातही जलाशयांचा एकत्रित साठा 88.70 टक्के आहे.

धरणांच्या पाणीसाठ्यात एक टक्का वाढ झाली की मुंबईला साधारण तीन दिवसांचा पाणीपुरवठा करता येतो. त्यामुळे 30 सप्टेंबरपर्यंत धरणे 100 टक्के भरली तरच हा पाणीसाठा पुढील मे-जून महिन्यापर्यंत किंवा पुढील पावसाळा सुरू होईपर्यंत पुरेल, अशी पाणीनियोजनाची स्थिती आहे.

यंदा अल निनोच्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर ऑगस्ट 2027 पर्यंतचे पाणी नियोजन करण्याच्या सूचना सरकारकडून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठ्याचा काळजीपूर्वक वापर करण्यावर प्रशासनाचा भर आहे. सध्या पाणीकपात मागे घेण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

मुंबईसाठी अद्याप पावसाळ्याचे दोन महिने महत्त्वाचे असून, या कालावधीत धरण क्षेत्रात किती पाऊस पडतो, यावर पुढील पाणीपुरवठ्याचे भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे पुढील काही दिवस तरी मुंबईतील पाणीकपात कायम राहण्याची शक्यता आहे.

Published on: Aug 10, 2026 10:09 AM

Follow Us