Mobile App : भर पावसामध्ये शेतीकामाची लगबग, पण वीजांपासून कसं करणार संरक्षण? दामिनी अॅपद्वारे जाणून घ्या वीजेचा अंदाज

| Updated on: Jun 12, 2022 | 1:04 PM

'दामिनी अॅप'जर मोबाईलमध्ये डाऊनलोड असेल तर संभाव्य धोक्यापासून केवळ मनुष्याचेच नाही तर मुक्याचे प्राण्याचेही जीव वाचविता येणार आहेत.प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून भारत सरकारच्या पृथ्वी मंत्रालयाने हे मोबाईल अॅप विकसित केले आहे. हे अॅप जीपीएस लोकेशनद्वारे काम करते. वीज पडण्याच्या 15 मिनिट आगोदर अॅपमध्ये स्थिती दर्शविण्यात येते.

Mobile App : भर पावसामध्ये शेतीकामाची लगबग, पण वीजांपासून कसं करणार संरक्षण? दामिनी अॅपद्वारे जाणून घ्या वीजेचा अंदाज
वीज पडण्याच्या 15 मिनिट आगोदर सूचना देणारे मोबाईल अॅप विकसित करण्यात आले आहे.
Follow us on

लातूर : उन्हाळा असो की पावसाळा कष्ट हे (Farmer) शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पूजलेले आहे. आता गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाला असून पावसापेक्षा वादळी वारे आणि (Lightning) वीजेचा कडकडाटच अधिक आहे. असे असले तरी खरिपातील उत्पादनवाढीसाठी शेतकऱ्यांचे प्रयत्न सुरु आहेत. मशागतीची कामे पूर्ण करुन शेतकऱ्याला आता चाढ्यावर मूठ ही ठेवावीच लागणार आहे. पेरणीचे टायमिंग साधण्यासाठी पावसाचे आणि वीजांचे कारण सांगता येणार नाही. पण (Central Government) केंद्र सरकारने असे एक मोबाईल अॅप तयार केले आहे जे वीज पडण्यापूर्वी 15 मिनिट अलर्ट देईल. त्याचं नाव आहे ‘दामिनी अॅप’ज्याचा सर्वांनाच फायदा होणार आहे. मात्र, जो शेतकरी रानामाळात अधिक धोक्याच्या ठिकाणी आपल्या काळ्या आईची सेवा करतो त्याला हे अधिक उपयोगी पडणार आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला या मोबाईल अॅपबद्दल अधिकची माहिती असणे गरजेचे आहे. आणि हो हे ‘दामिनी अॅप’ गुगल प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड करुन घेता येणार आहे.

अॅपद्वारे मिळणार सिग्नल

‘दामिनी अॅप’जर मोबाईलमध्ये डाऊनलोड असेल तर संभाव्य धोक्यापासून केवळ मनुष्याचेच नाही तर मुक्याचे प्राण्याचेही जीव वाचविता येणार आहेत.प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून भारत सरकारच्या पृथ्वी मंत्रालयाने हे मोबाईल अॅप विकसित केले आहे. हे अॅप जीपीएस लोकेशनद्वारे काम करते. वीज पडण्याच्या 15 मिनिट आगोदर अॅपमध्ये स्थिती दर्शविण्यात येते. त्यामुळे आपल्या अॅपमध्ये सभोवताली वीज पडणार असल्याच्या सुचना मिळतात. अशी सूचना मिळताच शेतकऱ्याला तर सुरक्षित ठिकाणी जाता येतेच शिवाय जनावरांनाही सुरक्षित ठिकाणी घेऊन जाण्यापर्यंतचा वेळ त्याकडे राहतो. याबाबतची सर्व माहिती मंत्रालयाच्या माध्यमातून देण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना अॅप बद्दल माहिती मिळणार तरी कशी

पृथ्वी मंत्रालयाच्या माध्यमातू हे अत्याधुनिक पध्दतीचे अॅप विकसित करण्यात आले असले तरी याचा शेतकरी कसा उपयोग करणार हा मोठा प्रश्न आहे. पण यावरही सरकारने उपाययोजना काढली आहे. हे मोबाईल अॅप प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याने डाऊनलोड करुन घ्यायचे आहे. यामध्ये स्थानिक पातळीवर काम करणारे मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, पोलिस पाटील, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, महसूल सहाय्यक यांचा समावेश आहे. यांनी तर अॅपचा वापर करायचाच आहे पण शेतकऱ्यांना याची माहिती देऊन वापर करण्याचा सल्ला द्यायचा आहे. त्यामुळे हे अत्याधुनिक अॅप शेतकऱ्यांसाठी अधिक उपयोगी ठरणार आहे.

हे सुद्धा वाचा

गेल्या चार दिवसांमध्ये वीज पडल्याच्या अनेक घटना

राज्यात मान्सूनचे आगमन झाले असून वातावरणात बदल झाला आहे. गेल्या चार दिवसांमध्ये वीज पडून कुठे मनुष्यहानी झाली आहे तर कुठे मु्क्या जनावरांना आपला जीव सोडावा लागला आहे. एकट्या मराठवाड्यात गेल्या दोन दिवसांमध्ये 5 जणांचा वीज पडल्याने मृत्यू झाला आहे तर बिहारमध्ये 16 जिल्ह्यांमध्ये वीज कोसळून तब्बल 33 जणांनी जीव गमावला आहे. या आठवड्याच्या सुरवातीला लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात वीज कोसळ्याने एका शेतकऱ्याचा आणि 6 शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला होता.