शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी कधी करावी? कृषी विभागाचा मोलाचा सल्ला

| Updated on: Jun 09, 2021 | 12:13 PM

कृषी विद्यापीठाच्या निर्देशानुसार बियाणे उगवणीसाठी जमिनीमध्ये पुरेसा ओलावा आवश्यक असतो.त्यासाठी किमान 80 ते 100 मि.मी. पाऊस होण्याची गरज असते.

शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी कधी करावी? कृषी विभागाचा मोलाचा सल्ला
वाशिममध्ये पेरणीला सुरुवात
Follow us on

वाशिम: खरीप हंगामामध्ये सोयाबीन पिकाची पेरणी करताना शेतकऱ्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे. कृषी विद्यापीठाच्या निर्देशानुसार बियाणे उगवणीसाठी जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असणे गरजेचे आहे. त्यासाठी सरासरी 80 ते 100 मि.मी. पाऊस पडणे आवश्यक आहे. जो पर्यंत 80 ते 100 मि.मी पाऊस होत नाही तोपर्यंत सोयाबीन पेरणी करु नका, असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे. ( Agriculture department appeal farmers to not germinate soybean before 80 to 100 mm rain)

कमी पावसावर पेरणी केल्यास दुबार पेरणीचं संकट

जो पर्यंत वाशिम जिल्ह्यामध्ये 80 ते 100 मि.मी. पाऊस पडत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करू नये, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे. यापेक्षा कमी पाऊस पडल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणी केल्यास पुरेशा प्रमाणात ओलावा नसल्याने जमिनीच्या उष्णतेमुळे बियाणे अतिशय कमी प्रमाणात अंकुरते व बियाणे जळण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार बियाणे पेरण्याची वेळ येवू शकते, असं शंकर तोटावार म्हणाले.

आर्थिक फटका बसण्याची शक्यता

दुबार पेरणी करण्याची वेळ शेतकऱ्यावर आल्यास यामध्ये त्यांचे पैसे आणि वेळपण अधिक खर्च होतो. याचा विपरीत परिणाम उत्पादनावर होवून उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.दुबार पेरणीचा खर्चही शेतकऱ्यांना करावा लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी 80 ते 100 मि.मी पाऊस झाल्याशिवाय पेरणी करु नये.

वाशिममध्ये मान्सूनपूर्व तुरीची लागवड

वाशिम जिल्ह्यातील उंबर्डा बाजार परिसरातील शेतकऱ्यांनी पारंपारिक शेतीला फाटा देत आधुनिक पद्धतीने मान्सूनपूर्व तुरीची लागवड केली आहे. तर काही शेतकरी तुरीच्या लागवडीत व्यस्त आहेत.त्यामुळं वाशिम जिल्ह्याच्या कारंजा तालुक्यात यंदा तुरीच्या क्षेत्रात वाढ होणार आहे.सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी ठिबकचा वापर करून तुरीची लागवड केली आहे. त्यामुळे तालुक्यातील अनेक शेतक-यांच्या शेतात मान्सुनपूर्व लागवड केली आहे.

तुरीचे पीक शंभर टक्के यशस्वी ठरले असून पावसाळ्यापूर्वीच शेतात तुरीचे पीक डोलताना दिसत आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसात तुरीला इतर पिकांच्या तुलनेत जास्त दर मिळत असून,हमीभावापेक्षा दर वाढून मिळत असल्याने जिल्ह्यात तूर पिकांच्या क्षेत्रात यंदा वाढ होणार असल्याचे दिसून येत आहे.

संबंधित बातम्या:

Mumbai Rain | पहिल्यात पावसाने मुंबईची दाणादाण, रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प, ट्रॅफिकही जॅम

अमावस्येच्या तोंडावर लासलगांव बाजार समितीचा दुसरा ऐतिहासिक निर्णय, 75 वर्षांची परंपरा बंद होणार

(Agriculture department appeal farmers to not germinate soybean before 80 to 100 mm rain)