टोमॅटो झाला, आता वांग्यालाही कवडीमोल भाव, उद्विग्न शेतकऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल

| Updated on: Mar 02, 2021 | 11:35 AM

कांद्याच्या बाजारभावात नेहमी चढ-उतार होत कांदा उत्पादकांचे वांदे होत असल्याने शेतीत काहीतरी वेगळे प्रयोग करावे या हेतूने वांग्याचे पीक घेण्याचे ठरविले. | Farmer

टोमॅटो झाला, आता वांग्यालाही कवडीमोल भाव, उद्विग्न शेतकऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल
कॅरेटपाठी साडेचारशे रुपये इतका बाजार भाव मिळणाऱ्या वांग्याला सध्या कवडीमोल म्हणजे 50 ते 60 रुपये इतके कॅरेटला बाजार भाव मिळत आहे. त्यामुळे उत्पादन खर्च तर दूरच वाहतूक आणि काढणी मजुरी खर्चही निघणे मुश्कील झाल्याने संतापाच्या भरात शेतातील दोन एकरावरील उभे वांग्याचे पीक उपटून जमीनदोस्त केले.
Follow us on

नाशिक: गेल्या काही दिवसांत नाशिवंत शेतमालाचे भाव पडत असल्याने नाशिकमधील शेतकऱ्यांवर हताश होण्याची वेळ आली आहे. सध्या बाजारपेठेत कांदा (Onion), टॉमेटो आणि वांग्याला अक्षरश: कवडीमोल भाव मिळत आहे. त्यामुळे उद्विग्न झालेल्या येवल्यातील शेतकऱ्याने (Farmer) दोन एकरावरील वांग्याचे पीक उपटून जमीनदोस्त केले. (Rates of Vegetable decrease in wholesale market)

येवला तालुक्यातील नागडे गावातील शेतकरी भारत भावसार यांनी कांद्याच्या बाजारभावात नेहमी चढ-उतार होत कांदा उत्पादकांचे वांदे होत असल्याने शेतीत काहीतरी वेगळे प्रयोग करावे या हेतूने वांग्याचे पीक घेण्याचे ठरविले. त्यानुसार दोन एकरात मल्चिंग पेपर टाकून सहा हजार रोपे लावली तीन ते चार महिन्यात सत्तर ते ऐंशी हजार रुपये खर्च करत या वांग्याच्या पिकाला पोटच्या मुलासारखे जीव लावत पीक सुद्धा जोमात आले.

गेल्या पंधरवड्यात 14 ते 16 किलो कॅरेटला साडेचारशे रुपये इतका बाजार भाव मिळत होता. त्यामुळे भारत भावसार आनंदात होते. मात्र, नंतरच्या दिवसांमध्ये बाजारपेठेत वांग्याचा भाव अचानक खाली घसरला. त्यामुळे भारत भावसार यांना मोठा धक्का बसला. कॅरेटपाठी साडेचारशे रुपये इतका बाजार भाव मिळणाऱ्या वांग्याला सध्या कवडीमोल म्हणजे 50 ते 60 रुपये इतके कॅरेटला बाजार भाव मिळत आहे. त्यामुळे उत्पादन खर्च तर दूरच वाहतूक आणि काढणी मजुरी खर्चही निघणे मुश्कील झाल्याने संतापाच्या भरात शेतातील दोन एकरावरील उभे वांग्याचे पीक उपटून जमीनदोस्त केले.

कांद्याच्या भावात मोठी घसरण

राज्यासह देशांतर्गत उन्हाळ कांद्याची आवक येण्यास सुरुवात झाल्याने कांद्याच्या (Onion) बाजारभावात गेल्या आठवड्याच्या तुलनेत 50 टक्क्यांची घसरण झाली आहे. आशिया खंडातील कांद्याची अग्रेसर बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीत चार हजार रुपये विक्री होणाऱ्या कांद्याला 2000 ते 2200रुपये इतका सर्वसाधारण दर मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.

देशांतर्गत ठिकाणी अवकाळी पावसानंतर उन्हाळी कांद्याची आवक राज्यासह गुजरात, राजस्थान ,मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल तसेच दक्षिण भारतातील कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये येण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे या राज्यातून लाल आणि उन्हाळी कांद्याची मागणी कमी झाल्यामुळे कांद्याच्या बाजारभावात घसरण पाहायला मिळत आहे.

संबंधित बातम्या:

कांद्याच्या भावात मोठी घसरण; बळीराजा हवालदिल

कांद्याचे दर वाढले म्हणून बोंबलू नका, परवडत नसेल तर लसूण, मुळा खा : बच्चू कडू

कांद्याचे दर कोसळले, निर्यातबंदी हटवण्याची मागणी

(Rates of Vegetable decrease in wholesale market)