Jalna : ऊस पिकावरही रोटावेटर, अतिरिक्त ऊस असलेल्या जालन्यात शेतकऱ्याचा टोकाचा निर्णय

मराठवाड्यात कधी नव्हे ते शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्ये बदल करुन उत्पन्न वाढीसाठी ऊसाची लागवड केली होती. शिवाय पोषक वातावरण आणि पाण्याची उपलब्धता यामुळे ऊस बहरलाही. मराठवाड्यासारख्या माळरानावरचा भाग हिरवागार दिसला पण उत्पन्नाच्या दृष्टीने त्याचा अधिकचा फायदा झाला नाही. उत्पन्न तर सोडाच पण शेतामधील ऊस बाहेर काढणेही मुश्किल झाले आहे.

Jalna : ऊस पिकावरही रोटावेटर, अतिरिक्त ऊस असलेल्या जालन्यात शेतकऱ्याचा टोकाचा निर्णय
| Edited By: | Updated on: May 30, 2022 | 3:58 PM

जालना : जून महिन्याच्या तोंडावरही राज्यात (Surplus Sugarcane) अतिरिक्त उसाचा प्रश्न हा कायम आहे. सर्वाधिक अतिरिक्त उसाचा प्रश्न हा (Jalna) जालना जिल्ह्यात निर्माण झाला असून आता ऊस उत्पादक शेतकरी टोकाचा निर्णय घेत आहेत. उसाची नोंद छत्रपती संभाजी राजे साखर उद्योग या कारखान्याकडे होती. कारखान्याकडे नोंद करुनही ऊसाची तोड न झाल्याने जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील शेतकऱ्यांने दोन एकरावरील ऊसावर रोटावेटर फिरवून क्षेत्र रिकामे केले आहे. अनेक वेळा (Sugar Factory) साखर कारखान्याकडे खेटे मारुनही प्रश्न मार्गी लागत नसल्याने दाजीबा राऊत यांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे. कारखान्याची तर तोड नाहीच पण मालक तोडीसाठी 45 हजाराची मागणी केल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे.

जालन्यात सर्वाधिक अतिरिक्त ऊस

मराठवाड्यात कधी नव्हे ते शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्ये बदल करुन उत्पन्न वाढीसाठी ऊसाची लागवड केली होती. शिवाय पोषक वातावरण आणि पाण्याची उपलब्धता यामुळे ऊस बहरलाही. मराठवाड्यासारख्या माळरानावरचा भाग हिरवागार दिसला पण उत्पन्नाच्या दृष्टीने त्याचा अधिकचा फायदा झाला नाही. उत्पन्न तर सोडाच पण शेतामधील ऊस बाहेर काढणेही मुश्किल झाले आहे. राज्यात सर्वाधिक अतिरिक्त ऊस हा जालना जिल्ह्यात असल्याचा अहवाल साखर आयुक्त कार्यालयानेच सादर केला होता. त्यामुळे उत्पन्नवाढीसाठी शेतकऱ्यांनी केलेला हा प्रयत्न पुरता फसला आहे.

मालक तोडही परवडली नाही

कारखाना प्रशासनाने दुर्लक्ष केल्यानंतर राऊत यांनी मालक तोड करुन का होईना ऊस साखर कारखान्याला नेण्यासाठी प्रयत्न केले. ऊसतोड पदरुन देऊन गाळप करण्याची तयारी त्यांनी दर्शवली होती. पण येथेही त्यांना अपयशच आले. कारण दोन एकरातील ऊस तोडण्यासाठी त्यांच्याकडे 45 हजाराची मागणी झाली. त्यामुळे संपूर्ण उसाचे गाळप झाले तरी एवढे बील मिळेल की नाही अशी अवस्था होती. जागोजागी अपयश आल्याने अखेर उद्विग्न होऊन राऊत यांनी ऊसावर रोटावेटर फिरवून क्षेत्र रिकामे करुन घेतले.

आता खरिपाचा पेरा करायचा कसा?

येणाऱ्या उत्पादनातूनच आगामी हंगामाचा खर्च केला जातो. उसामधून अधिकचे उत्पन्न तर सोडाच पण दाजीबा राऊत यांचे 2 लाखाचे नुकसान झाले आहे शिवाय वेळ आणि परीश्रम हे वेगळेच. ऐवढे करुनही त्यांना आता खरीप हंगामात पेरणी करावी कशी असा सवाल त्यांच्यासमोर आहे. खरिपातील पूर्व मशागत, पेरणी, नांगरणी यासाठी पैशाची गरज असताना ऊसातून एक रुपयाचेही उत्पन्न राऊत यांना मिळालेले नाही. अल्पभूधारक असलेल्या शेतकऱ्याकडे उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन नसताना या शेतकऱ्यांनी आता पुढे खरीप हंगामाची तयारी कशी करावी? हा मोठा यक्ष प्रश्न उभा राहिला आहे.