पुढे धोका आहे…! फरदड कापूस नुकसानीचा असतानाही का घेत आहेत शेतकरी उत्पादन?

| Updated on: Dec 14, 2021 | 11:09 AM

सध्या कापसाला 8 हजार ते 8 हजार 500 चा दर मिळत आहे. फरदड कापसाचे उत्पादन घेतले तर इतर पिकाच्या लागवडीचा खर्च टळणार आहे. शिवाय वावरात उभ्या असलेल्या पिकाची जोपासना करायला काही खर्च नसल्याने अधिकचे उत्पादन मिळत असल्याची भावना ही शेतकऱ्यांची आहे.

पुढे धोका आहे...! फरदड कापूस नुकसानीचा असतानाही का घेत आहेत शेतकरी उत्पादन?
यंदा वातावरणातील बदलामुळे कापसाच्या उत्पादकतेमध्ये घट झाल्याचा अहवाल कृषी विभागाने सादर केला आहे.
Follow us on

औरंगाबाद : खरिपात झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी शेतकरी आता कोणतेही पाऊल उचलत आहे. (Cotton) कापसाची वेचणी तशी नोव्हेंबर महिन्यापर्यंतच अपेक्षित आहे. मात्र, सध्या कापसाचे वाढलेले दर यामुळे शेतकरी फरदड कापसामधून उत्पादन घेऊ लागला आहे. सध्या  (Cotton Rate) कापसाला 8 हजार ते 8 हजार 500 चा दर मिळत आहे. फरदड कापसाचे उत्पादन घेतले तर इतर पिकाच्या लागवडीचा खर्च टळणार आहे. शिवाय वावरात उभ्या असलेल्या पिकाची जोपासना करायला काही खर्च नसल्याने अधिकचे उत्पादन मिळत असल्याची भावना ही शेतकऱ्यांची आहे. मात्र, फरदडमुळे शेतीचे तर नुकसान होतेच पण बोंडअळीचा प्रादुर्भाव हा इतर पिकांवरही होतो. त्यामुळे फरदडचे उत्पादन धोक्याचे असल्याचे कृषितज्ञ सांगत आहेत.अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना याचाच आधार वाटत असल्याने मराठवाड्यात फरदड कापसातून उत्पन्न घेतले जात आहे.

फरदड कापूस म्हणजे नेमके काय?

खरीप हंगामातील कापसाची वेचणी तशी दिवाळी किंवा नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंतच केली जाते. वेळेत तोडणी केली तर कापसावरील बोंडअळीचा प्रादुर्भाव इतर पिकांवर होत नाही शिवाय शेतीचा दर्जाही टिकून राहतो. मात्र, जो कापूस उन्हाळ्यापर्यंत कायम ठेऊन त्याची जोपासना केली जाते त्यास फरदड असे म्हणतात. फरदडचे उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना नविन असे काहीच करावे लागत नाही. आहे त्या क्षेत्रावरील कापसाची जोपासना करायची आणि उत्पादन घ्यावयाचे एवढेच काही ते कष्ट.

फरदड कापसामुळे काय होते?

सध्या वातावरणातील बदलामुळे कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशातच कापूस शेतामध्ये कायम ठेवला तर अळीचा प्रादुर्भाव हा वाढणारच आहे. एवढेच नाही तर फरदड कापसाचा शेत जमिनीवरही परिणाम होत असतो. आगामी वर्षात उगवण क्षमतेवर त्याचा परिणाम होतो. तर आता रब्बी हंगामातील पिकांची उगवण झाली आहे. या फरदड कापसावरील बोंडअळीचा प्रादुर्भाव इतर पिकांवर होण्याचा धोका आहे. त्यामुळे तात्पूरत्या फायद्यासाठी शेतकऱ्यांनी आगामी हंगामातील आणि शेतजमिनीचे नुकसान करुन घेऊ नये असा सल्ला कृषितज्ञ रामेश्वर चांडक यांनी दिला आहे.

शेतकऱ्यांचे काय म्हणने आहे?

पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे यापूर्वीच नुकसान झाले आहे. आता कापसाला 8 हजार क्विटलप्रमाणे दर आहे. त्यामुळे इतर पिकाचे उत्पादन घेण्यासाठी अधिकचा खर्च करण्यापेक्षा आहे त्याच कापसाची जोपासना फायद्याची राहणार आहे. याकरिता केवळ 2 पाणी देण्याचे कष्ट आहे. एकतर यंदाच्या हंगामात सर्वकाही नुकसानीचे ठरत आहे. आता फरदड कापसातून दोन पैसे पदरात पडत असल्याचे शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे. रब्बीतील पिक घेण्यासाठी मशागतीपासून पेरणीपर्यंतचा खर्च पाहता फरदडचेच उत्पादन हे फायद्याचे राहणार आहे.

कापसाला 8 हजार रुपये दर

हंगामाच्या सुरवातीला कापसाच्या दरात कमालीची वाढ झाली होती. 9 हजार 500 रुपये क्विंटलपर्यंत दर गेले होते. मात्र, सध्या मागणीत घट झाल्याने दर हे 8 हजारावर आले आहेत. भविष्यात कापसाचे दर वाढतील या आशेने शेतकरी आता साठवणूकीवर भर देत आहे. यापूर्वी शेतातून वजन काट्यावर जात असलेल्या कापसाची आता साठवणूक केली जात आहे.

संबंधित बातम्या :

शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी : कृषी पंपाच्या थकबाकीतून मुक्त होण्यासाठी महावितरणची भन्नाट योजना, 15 हजार कोटींची माफी

अवकाळीनंतर डाऊनी मिल्डयुचा वाढतोय प्रादुर्भाव, द्राक्ष खराब होण्यापूर्वी असे करा नियंत्रण

गादी वाफ्यावरील पेरणीच कांद्यासाठी वरदान, अवकाळीमुळे मात्र अलिबागच्या पांढऱ्या कांद्याच्या उत्पादनात घट