Washim : खरिपावर चिंतेचे ढग, पेरणीचा टक्का घसरला, उत्पादनाचे काय होणार?

| Updated on: Jun 24, 2022 | 2:02 PM

विदर्भासह मराठवाड्यात पावसाला सुरवात तर झाली आहे मात्र, सातत्य नसल्याने खरिपातील पेरण्या खोळंबल्या आहेत. यंदा शेती मशागतीची कामे पूर्ण करुन शेतकरी अधिकचे उत्पादन घेण्याच्या दृष्टीने कामाला लागला होता. शिवाय वेळेपूर्वीच मान्सूनचे आगमन होणार म्हणून शेती मशागतीची कामे पूर्ण करुन बी-बियाणांची खरेदी झाली होती. मात्र, वेळेपूर्वी सोडा जूनच्या अंतिम टप्प्यातही अपेक्षित पाऊस झालेला नाही.

Washim : खरिपावर चिंतेचे ढग, पेरणीचा टक्का घसरला, उत्पादनाचे काय होणार?
शेती मशागतीची कामे पूर्ण झाली असली तरी पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या आहेत
Follow us on

वाशिम :  हंगामाच्या सुरवातीपासूनच यंदा खरिपाबाबत शंका उपस्थित केला जातोय. कारण हंगामापूर्वीच यंदा (Monsoon) मान्सूनचे आगमन राज्यात होणार असल्याचा दावा (Meteorological Department) हवामान विभागाने केला होता. मात्र, जून महिना अंतिम टप्प्यात असतानाही अपेक्षित पाऊस न झाल्याने केवळ वाशिम जिल्ह्यातीलच नाहीतर राज्यातील खरिपाच्या पेरण्या ह्या खोळंबल्या आहेत. वाशिम जिल्ह्यात (Kharif Season) खरिपाचे सरासरी क्षेत्र हे 4 लाख 6 हजार हेक्टर एवढे असताना केवळ 9 हजार 514 हेक्टर म्हणजे 2.3 टक्के एवढ्याच पेरण्या झाल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. शिवाय हंगामाला सुरवात होऊन महिना झाला आहे अद्याप एकही मोठा पाऊस झालेला नाही. त्यामुळे आगामी काळात खरिपातील पिकांचे काय चित्र असणार असा सवाल आता शेतकऱ्यांना पडला आहे. आतापर्यंत झालेली पेरणीही धोक्यात आहे. पेरणीपासून पाऊसच झाला नसल्याने पिके उगवणार तरी कशी? निसर्गाच्या या लहरीपणामुळे यंदा खरिपाचे भवितव्य काय हा सवाल प्रत्येक शेतकऱ्यांच्या मनात आहे.

पावसामध्ये अनियमितता, पेरणीचा खोळंबा

विदर्भासह मराठवाड्यात पावसाला सुरवात तर झाली आहे मात्र, सातत्य नसल्याने खरिपातील पेरण्या खोळंबल्या आहेत. यंदा शेती मशागतीची कामे पूर्ण करुन शेतकरी अधिकचे उत्पादन घेण्याच्या दृष्टीने कामाला लागला होता. शिवाय वेळेपूर्वीच मान्सूनचे आगमन होणार म्हणून शेती मशागतीची कामे पूर्ण करुन बी-बियाणांची खरेदी झाली होती. मात्र, वेळेपूर्वी सोडा जूनच्या अंतिम टप्प्यातही अपेक्षित पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकरीही पेरणीचे धाडस करीत नाही. त्यामुळे वाशिम जिल्ह्यात केवळ 2.3 टक्के क्षेत्रावरच पेरण्या झालेल्या आहेत.

पेरले पण उगवलेच नाही

वाशिम जिल्ह्यात 9 हजार 514 हेक्टरावर खरीप हंगामातील पिकांचा पेरा झाला आहे. शिवाय पेरले ते उगलेच असे नाही, कारण पेरणीपासून जिल्ह्यातील पाऊस गायब आहे. खरिपातील सर्व पिके ही पावसावरच अवलंबून असतात. 23 जूनपर्यंत जिल्ह्यात सरासरीच्या केवळ 48 टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे ज्या क्षेत्रावर पेरा झाला आहे त्या ठिकाणीही दुबार पेरणीचे संकट ओढवणार हे निश्चितय. सबंध महिन्याभरात एकही दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे यंदा खरिपाचे काय होणार या चिंतेत बळीराजा आहे.

हे सुद्धा वाचा

काय आहे कृषी विभागाचे आवाहन ?

खरीप हंगामाच्या अनुशंगाने प्रशासकीय स्तरावर सर्वतोपरी तयारी झाली आहे. मात्र, पावसाने पाठ फिरवल्याने आता पेरणी म्हणजे शेतकऱ्यांवर दुहेरी संकट ओढावणार आहे. यवतमाळसह उर्वरीत भागात 22 जूननंतरच पाऊस सक्रीय होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी 22 जूननंतरच चाढ्यावर मूठ ठेवली तर ते फायद्याचे राहणार आहे. शिवाय खरिपाची पेरणी ही 15 जुलैपर्यंत केली तरी त्याचा उत्पादनावर परिणाम होणार नसल्याचे कृषी सहसंचालक शंकर तोटावार यांनी सांगितले आहे.