राजकारण थांबवून शेतकऱ्यांना दिलासा द्या, अन्यथा सत्ताधारी-विरोधकांच्या दारात टॉमेटो ओतणार : किसान सभा

| Updated on: Aug 26, 2021 | 5:43 PM

अखिल भारतीय किसान सभेने सरकारला धारेवर धरलंय. सरकारने राजकारण थांबवून टॉमेटो उत्पादकांना दिलासा द्यावा. अन्यथा सत्ताधारी आणि विरोधक दोघांच्याही दारात टोमॅटो ओतून आंदोलन करू, असा इशारा किसान सभेचे नेते अजित नवले यांनी दिलाय.

राजकारण थांबवून शेतकऱ्यांना दिलासा द्या, अन्यथा सत्ताधारी-विरोधकांच्या दारात टॉमेटो ओतणार : किसान सभा
Follow us on

अहमदनगर : अचानक बाजारात टोमॅटोचे दर कमालीचे घसरल्यानं राज्यभरात शेतकऱ्यांचा संताप पाहायला मिळतोय. बाजारातील भाव इतके कोसळले आहेत की त्याचा उत्पादन खर्चही निघणं कठिण झालंय. त्यामुळेच अखिल भारतीय किसान सभेने सरकारला धारेवर धरलंय. सरकारने राजकारण थांबवून टॉमेटो उत्पादकांना दिलासा द्यावा. अन्यथा सत्ताधारी आणि विरोधक दोघांच्याही दारात टोमॅटो ओतून आंदोलन करू, असा इशारा किसान सभेचे नेते अजित नवले यांनी दिलाय.

अजित नवले म्हणाले, “अचानक टॉमेटोचे दर कोसळल्यानं राज्यातील टॉमेटो उत्पादक शेतकरी अत्यंत संकटात सापडले आहेत. ते दीनवाण्या अवस्थेत जाऊन पोहचले आहेत. लाखो रुपये खर्च करुन उत्पादन केलेला टॉमेटो रस्त्यावर, ओढ्या नाल्यांमध्ये आणि बांधावर फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आलीय. राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक कुणाचंही याकडे लक्ष नाही. मान-अपमान, एकमेकांवर चिखलफेक यातच हे सर्व राजकारणी मश्गुल आहेत.”

“शेतकऱ्यांबद्दल कुणालाही आस्था नाही, मोठ्या प्रमाणात असंतोष खदखदतो”

“शेतकऱ्यांबद्दल कुणालाही आस्था नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष खदखदतो आहे. सरकारने हा खेळखंडोबा आता थांबवावा. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सहकार, पणन आणि कृषी विभागाने एकत्र यावं. कोल्ड स्टोरेजचा उपयोग करुन हा माल साठवता येईल का, प्रक्रिया उद्योगांना सोबत घेऊन नाशिवंत शेती माल साठवता येईल का, कर्ज देता येईल का? अनुदान देऊन शेतकऱ्यांना दिलासा देता येईल का यावर गांभीर्याने पुढाकार घ्यावा,” असं अजित नवले यांनी सांगितलं.

“अन्यथा सत्ताधारी-विरोधकांच्या दारात टॉमेटो ओतणार”

“सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी उपाययोजना केल्या नाहीत, तर प्रसंगी हा सर्व टॉमेटो शेतकऱ्यांच्या वतीने राज्य सरकारच्या मंत्र्यांच्या आणि विरोधकांच्याही दारात टाकण्याचं आंदोलन किसान सभा करेल. ती वेळ येऊन देऊ नये,” असा थेट इशारा किसान सभेने सरकारला दिलाय.

‘लेटर टू डेअरी मिनिस्टर’ आंदोलन सुरू, पहिल्याच दिवशी शेकडो पत्र रवाना

दुधाला एफआरपीचे संरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने सुरू असलेल्या आंदोलनाचा पुढील टप्पा म्हणून आज राज्यात लेटर टू डेअरी मिनिस्टर आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे. 9 ऑगस्ट रोजी राज्यभर झालेल्या दूध आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून दुग्ध विकास मंत्री यांना हजारो पत्र पाठवण्याचे हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. 25 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर या कालावधीमध्ये दूध उत्पादक शेतकरी दूध संकलन केंद्रांवर जमतील व सामुहिकपणे आपल्या नऊ मागण्यांचा उल्लेख असणारी पत्रे दुग्धविकास मंत्र्याला पाठवून आपल्या मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधतील असे आंदोलनाचे स्वरूप निश्चित करण्यात आले आहे.

दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या 9 मागण्या

आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी राज्यभरातील शेकडो दूध उत्पादक केंद्रांवरून दुग्धविकास मंत्र्यांना पत्रे पाठवण्यात आली. पुढे पंधरा दिवस विविध ठिकाणावरून अशी पत्रे पाठवण्यात येणार आहेत.

  • गायीच्या दुधाला प्रति लिटर 35 रुपये व म्हशीच्या दुधाला प्रति लिटर 60 रुपये दर द्या.
  • लॉकडाऊन काळातील लुटवापसी म्हणून शेतकऱ्यांना प्रति लिटर 5 रुपये अनुदान द्या.
  • खाजगी व सहकारी दूध संघांना लागू होईल असा लूटमार विरोधी कायदा करा.
  • दुधाला एफ.आर.पी. आणि रेव्हेन्यू शेअरींगचे कायदेशीर संरक्षण द्या.
  • अनिष्ट ब्रँड वॉर रोखण्यासाठी ‘एक राज्य एक ब्रँड’ हे धोरण स्वीकारा.
  • भेसळ मुक्तीची कायदेशीर हमी द्या.
  • सदोष मिल्को मिटर द्वारे होणारी लुट थांबविण्यासाठी निरीक्षकांची नेमणूक करा.
  • शासकीय अनुदानातून पशु विमा योजना सुरु करा.
  • राज्यात दुध मूल्य आयोगाची स्थापना करा

या 9 मागण्यांसाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती राज्यभर आंदोलन करत आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दुधाला एफ. आर. पी. लागू करणार असल्याचे आश्वासन दुग्धविकास मंत्री सुनिल केदार यांनी संघटनेला दिले होते. या संदर्भात मंत्रिमंडळ टिपणीही बनविण्यात आली आहे. दुग्धविकास विभागाने साखर आयुक्तांचे याबाबत मत विचारले असता दूध क्षेत्रासाठी एफ. आर. पी. चा कायदा करावा असे अनुकूल मत साखर आयुक्त कार्यालयाने नोंदविले असल्याचेही सांगण्यात आले आहे. आता अधिक विलंब न लावता सरकारने यानुसार दुधाला एफ. आर. पी. चे संरक्षण लागू करावे व वरील उर्वरित मागण्यांना मंजुरी द्यावी अशी मागणी दूध उत्पादक करत आहेत.

अकोले येथील कोतुळ परिसरातील शेतकऱ्यांनी सदाशिव साबळे बाळू देशमुख, प्रकाश आरोटे, रघुनाथ जाधव आदींच्या नेतृत्वाखाली राज्यातील विधानसभा व विधान परिषदेवर असलेल्या सर्व आमदारांना व मंत्र्यांना 425 निवेदने पोस्टाने पाठविली. संकलन केंद्रावरून दुग्धविकास मंत्र्यांना पत्र पाठविण्यात आली.

डॉ. अशोक ढवळे, डॉ. अजित नवले, श्रीकांत करे, उमेश देशमुख, सतीश देशमुख, धनुभाऊ धोरडे, जोतिराम जाधव, डॉ. अशोक ढगे, दीपक वाळे, महेश नवले, सुरेश नवले, रामनाथ वदक, सुहास रंधे, दादाभाऊ गाढवे, राजकुमार जोरी, सुदेश इंगळे, सिद्धपा कलशेट्टी, माणिक अवघडे आदी आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत.

हेही वाचा :

कृषीमंत्र्यांच्या जिल्ह्यात टोमॅटोचा लाल चिखल, किलोला एक ते दीड रुपया दर, शेतकऱ्यांची परवड सुरुच

रक्ताचं पाणी करुन जगवलेली पपईची बाग उद्धवस्त, पिके कापण्याच्या घटना वाढल्या, पोलिसांच्या कारवाईची गरज

कृषिमूल्य आयोग एफआरपी सरकारच्या सोयीनुसार ठरवतं की उत्पादन खर्च पाहून? : राजू शेट्टी

व्हिडीओ पाहा :

Kisan Sabha Ajit Nawale warn state government over prices of farm produce in Maharashtra