Maharashtra Krishi Diwas 2021: काँग्रेसचे असे मुख्यमंत्री, ज्यांनी शिवसेनेच्या वाघाला बळ दिलं, जे ‘स्वावलंबनासाठी’ फाशी जाईन म्हणाले!

| Updated on: Jul 01, 2021 | 3:23 PM

आजचाच दिवस महाराष्ट्र कृषी दिन म्हणून साजरा करतो. आणि का करु नये? ओसाड, दुष्काळी महाराष्ट्राला त्यांनी हिरवं स्वप्न दाखवलं आणि ते सत्यातही उतरवलं ते वसंतराव नाईकांनीच.

Maharashtra Krishi Diwas 2021: काँग्रेसचे असे मुख्यमंत्री, ज्यांनी शिवसेनेच्या वाघाला बळ दिलं, जे स्वावलंबनासाठी फाशी जाईन म्हणाले!
वसंतराव नाईक
Follow us on

मुंबई: वसंतराव नाईक म्हटलं की एका रुबाबदार मुख्यमंत्र्याची प्रतिमा डोळ्यासमोर उभी रहाते. ते होतेही रुबाबदार. त्यांच्या शिकारीचे किस्से अजूनही महाराष्ट्र ऐकतो, वाचतो. तोंडात शिलगवलेला पाईप तर त्यांच्या प्रतिमेशी घट्ट जोडला गेलाय. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी सर्वाधिक काळ रहाण्याचा मानही त्यांच्याच नावावर आहे. पण हे झाले सत्तेचं. राजकारणाचं. वसंतराव नाईक यांची आज जयंती. आजचाच दिवस महाराष्ट्र कृषी दिन म्हणून साजरा करतो. आणि का करु नये? ओसाड, दुष्काळी महाराष्ट्राला त्यांनी हिरवं स्वप्न दाखवलं आणि ते सत्यातही उतरवलं ते वसंतराव नाईकांनीच. (Maharashtra Krishi Diwas celebrated on the birth anniversary of Former Chief Minister Vasantrao Naik know about him)

मध्यप्रदेशचे मंत्री ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते यशवंतराव चव्हाण. ते केंद्रात गेले. त्यानंतर मारोतराव कन्नमवार मुख्यमंत्री झाले पण त्यांना फार काळ मिळाला नाही. त्यांचं अचानक निधन झालं आणि गृहमंत्री असलेल्या कोकणातल्या पी.के.सावंतांना काळजीवाहू मुख्यमंत्री व्हावं लागलं. त्यानंतर मुख्यमंत्रीपद आलं ते वसंतराव नाईकांकडे. पण ते काही त्यांच्याकडं आलेलं पहिलं पद नव्हतं. 1943 साली ते पुसदचे नगराध्यक्ष होते, 1952 साली
झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत ते पहिल्यांदा आमदार झाले. त्याच वेळेस मध्य प्रांतातल्या (आताचा मध्य प्रदेश) रविशंकर शुक्ला यांच्या मंत्रिमंडळात ते उप महसूल मंत्री झाले. नंतर बाँबे स्टेटमध्ये त्यांनी आधी सहकार सांभाळलं आणि नंतर 1960 ते 63 ते महसूल मंत्री झाले.

बापटांचं उपोषण आणि वसंतराव

1963 साली वसंतराव मुख्यमंत्री झाले. त्यानंतर अकरा वर्ष एवढा रेकॉर्ड काळ ते मुख्यमंत्रीपदावर कायम राहिले. असं नाही की, त्यांना पक्षात किंवा पक्षाबाहेर विरोधक नव्हते. पण दिल्ली आणि मुंबई एकाच वेळेस व्यवस्थित ‘मॅनेज’ करण्यात ते तरबेज होते. तसं नसतं तर काँग्रेस हायकमांडनं त्यांची वेळोवेळी स्तुतीही नसती केली. वसंतराव स्वभावानं अदबशीर होते. वागणूक मृदू होती आणि त्यांच्या चेहऱ्यावरच्या स्माईलनं समोरच्याला आपलसं करुन घ्यायचे. त्यामुळेच आचार्य विनोबा भावे, नेहरू, शास्त्री, यशवंतराव यांनाही वसंतरावांच्या सुसंस्कृतपणाचं कौतूक होतं.

पत्नी वत्सलाबाईंच्या नावे जमिन खरेदी प्रकरण, बाळासाहेब देसाईंच्या मुलाच्या प्रकरणात त्यांनी देसाईंना दिलेली क्लीन चिट, सेनापती बापट यांचं त्यांच्याच घराबाहेर उपोषणाला बसणं असे काही वादाचे प्रसंग घडलेच.पण त्यामुळे कधी त्यांचं पद, प्रतिष्ठा धोक्यात आली नाही. मुख्यमंत्रीपद तर नाहीच नाही. त्याला टाच लावायची हिंमत त्यावेळेस ना मुंबईत कुणाची होती ना दिल्ली. काही कारणांसाठी सेनापती बापटांना तर विरोधकांनी त्यांच्या निवासाबाहेरच उपोषणाला बसवलं. तेही बसले. पण मुख्यमंत्री असलेले वसंतराव त्यांच्याशी एवढ्या प्रेमानं वागले की, सेनापती बापटांचं उपोषणस्थळ जे गेटच्या बाहेर होतं, ते निवासस्थानाच्या आत नेण्यात यशस्वी झाले. अर्थातच उपोषणाची हवाच निघाली. ‘सिंहासन’ या ‘क्लासिक’ मराठी सिनेमात तो प्रसंगही साकारला गेलाय.

मुख्यमंत्री म्हणून काम

मुख्यमंत्री म्हणून वसंतरावांच्या कारकिर्दीतल्या कामाची यादी मोठी आहे. आज ज्या काही योजना तुम्हाला दिसतात किंवा वाचायला, ऐकायला मिळतात, त्याची पाळंमुळे हे वसंतरावांच्याच काळातली आहेत. मग कापूस एकाधिकार खरेदी योजना असेल किंवा ज्वारी खरेदी किंवा रोजगार हमी अशा सगळ्या योजना वसंतरावांच्याच काळातल्या. वसंतरावांना राज्यातल्या हरित क्रांतीचे प्रणेतेही मानलं जातं. शेतीवर त्यांचा खास जीव होता. ते अनेकदा म्हणायचेही शेतीत माझा जीव रमतो. महाराष्ट्राला दुष्काळ-दारीद्र्यातून बाहेर काढायचं तर शेतीशिवाय पर्याय नव्हता हे त्यांना माहित होतं. त्यांच्याच काळात 72 चा भीषण दुष्काळ पडला. तीन एक वर्ष महाराष्ट्रात अवर्षणाची स्थिती होती.

वसंतरावांनी रोजगार हमी सारख्या योजना सुरु केल्या. लोकांना काम दिलं. उजनी, पवना, जायकवाडी, अप्पर पैनगंगा, वारणा, मुळा, अप्पर वर्धा, लेंडी अशा कितीतरी पाटबंधारे प्रकल्पाचं काम वसंतरावांच्याच काळात सुरु झालं. वीज, बीज आणि सिंचन यावर त्यांनी खास लक्ष दिलं. पारस, परळी, खापरखेड्यात औष्णिक विद्यूत केंद्रांची कामं वेगानं होतील असं बघितलं. राज्यात चार कृषी विद्यापीठं, त्यात त्यांनी घेतलेल्या बैठका, जिल्हा पातळीवर नियोजन समित्या हे सगळं वसंतरावांनी केलं. ह्या सगळ्या कामाची भुरळ काँग्रेस हायकमांडलाही होती. राष्ट्रीय विकास परिषदेत दिल्लीला, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष असायचं.
वसंतरावांच्याच काळातल्या काही योजना नंतर देशपातळीवर राबवल्या गेल्या. वसंतरावांच्या काळात राबवलेल्या योजनांनी महाराष्ट्र हिरवा झाला. म्हणूनच त्यांना हरितक्रांतीचे प्रणेते मानले जातं. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, की अमुक एवढ्या मुदतीत राज्य अन्नदृष्ट्या स्वावलंबी न झाल्यास मी फाशी जाईन अशी धाडसी आणि आत्मघातकी घोषणाही वसंतरावांनी केली होती. अर्थातच त्यांनी जे बोललं ते करुन दाखवलं. त्यामुळे घोषणा अर्थातच धाडसी ठरली.

शिवसेनेच्या वाघाला बळ

वसंतरावांच्याच काळात शिवसेनेनं महाराष्ट्रात उभारी घेतली. खरं तर वसंतरावांनीच तिला कम्युनिस्टांच्या विरोधात बळ दिलं. एवढच नाही तर मुंबईत कम्युनिस्टांचा बंदोबस्त करण्यासाठी वसंतरावांनी शिवसेना वाढेल, फुलेल असं बघितलं असही जाणकार सांगतात. शिवसेनेचा तो दरारा असलेला काळ होता. खुद्द बाळासाहेब ठाकरे आणि वसंतराव यांचे स्नेहाचे संबंध होते. दोघांचे काही एकत्रित असलेले फोटो त्याची साक्ष देतात. शिवसेनेचा वाघ रस्त्यावर कम्युनिस्टांविरोधात डरकाळ्या फोडतो आणि काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत तो सलगी करतो असही त्यावेळेस म्हटलं जायचं. पण टिका टिप्पणी काहीही होवो. एक निश्चित, शिवसेना आज जी सत्तेपर्यंत पोहोचली आणि काँग्रेससोबतही तिनं सत्तेचं सुत जुळवलं, काँग्रेसनेही त्यासाठी मनाची जी तयारी केली, त्याची पाळंमुळं शोधली तर ती वसंतरावांपर्यंत जाऊन पोहोचतात.

वसंतराव नाईकांचं सिंगापूरमध्ये निधन झालं. तारीख होती 18 ऑगस्ट 1979. तेही 66 व्या वर्षी. खरं तर राजकारण्यांसाठी हे वय फार नाही. नंतर त्यांचे पुतणे सुधाकरराव नाईकही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. पण महाराष्ट्रानं कात टाकायला सुरुवात केली ते वसंतराव नाईकांच्याच काळात. यशवंतराव चव्हाणांच्या हस्ते ‘सुवर्णकलश’ आला तर वसंतरावांच्या हातानं महाराष्ट्राच्या प्रत्यक्ष पायाभरणीला सुरुवात झाली असं म्हटलं तर वावगं ठरू नये.

संबंधित बातम्या: 

कृषी संजीवनी मोहिमेत 40 हजार गावांमध्ये 6 लाख शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचं मार्गदर्शन : कृषीमंत्री

Maharashtra Krishi Diwas 2021: आई वडिलांना शेतात होणारा त्रास अनुभवला, मालेगावच्या तरुणानं टाकाऊ वस्तूंचं जुगाड करत थेट पेरणी यंत्र बनवलं

(Maharashtra Krishi Diwas celebrated on the birth anniversary of Former Chief Minister Vasantrao Naik know about him)