Maharashtra Krishi Diwas 2021: आई वडिलांना शेतात होणारा त्रास अनुभवला, मालेगावच्या तरुणानं टाकाऊ वस्तूंचं जुगाड करत थेट पेरणी यंत्र बनवलं

| Updated on: Jul 01, 2021 | 11:48 AM

कापूस, भुईमूग ,मका लागवड करताना आपल्या आई आणि वडिलांना होणारा त्रास सहन न झाल्याने नाशिकच्या मालेगावातील देवरपाडे येथील तरुण शेतकऱ्यानं टाकाऊ वस्तूनपासून पेरणीयंत्र किंवा टोकण यंत्र बनवलं आहे.

Maharashtra Krishi Diwas 2021: आई वडिलांना शेतात होणारा त्रास अनुभवला, मालेगावच्या तरुणानं टाकाऊ वस्तूंचं जुगाड करत थेट पेरणी यंत्र बनवलं
कमलेश घुमरे
Follow us on

नाशिक: जून महिन्यात सुरुवातीच्या आठवड्यात मान्सूनच्या पावसानं दमदार हजेरी लावल्यानंतर शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग सुरु झाली. पेरणी करण्यासाठी ट्रॅक्टरचं पेरणी यंत्र किंवा बैलजोडीचा वापर केला जातो. काही पिकं टोकण पद्धतीनं देखील लावली जातात. यंदा खरिपाचा हंगाम सुरू असून पेरण्या सुरू झाल्या आहेत. कापूस, भुईमूग ,मका लागवड करताना आपल्या आई आणि वडिलांना होणारा त्रास सहन न झाल्याने नाशिकच्या मालेगावातील देवरपाडे येथील तरुण शेतकऱ्यानं टाकाऊ वस्तूनपासून पेरणीयंत्र किंवा टोकण यंत्र बनवलं आहे. आई वडिलांचा त्रास आपण कमी करू शकतो का या उद्देशाने मालेगाव तालुक्यातील युवा शेतकरी कमलेश घुमरे यांनी टाकाऊ वस्तू पासून देशी जुगाड करत पेरणी यंत्र बनवलं आहे. (Nashik Malegaon Devarpade Youth Farmer Kamlesh Ghumare make cultivation machine)

घरात उपलब्ध असणाऱ्या वस्तूंचा वापर

मालेगावच्या देवारपाडयाच्या हा आहे कमलेश घुमरे या युवा शेतकऱ्यांनी अगदी सहज उपलब्ध होणाऱ्या टाकाऊ वस्तूंपासून घरच्या घरी पेरणी यंत्र तयार केले आहे. कमी किंमतीत हलक्या वजनाच्या या यंत्राने कपाशी ,मका भुईमूग आदी पिकांची सहज लागवड करता येणार आहे.त्यामुळे शेतकऱ्यांचे कष्ट ,वेळ तर वाचणार आहे मात्र मजूर टंचाईवर मात करता येणार असल्याचे कमलेश यांनी सांगितले. पाईप, वायर, पाण्याची रिकामी बॉटल याचा वापर करुन हे यंत्र बनवलं आहे.

फायदा काय?

कमलेश घुमरे यांनी बनवलेल्या पेरणी यंत्रामुळे शेतकऱ्यांना शेतात टोकण करताना वाकून काम करावं लागणार नाही. यामुळे शेतकऱ्यांचा त्रास वाचणार आहे. या पेरणी यंत्राद्वारे शेतकऱ्यांचं कष्ट वाचणार आहे.

कमलेशने बनवलेलं यंत्र हा शेतकऱ्यांच्या खूप फायद्याचं असून या यंत्रामुळे पेरणी करतानाचे कष्ट कमी होणार आहे. या यंत्रामुळं वेळ ,पैसे ही वाचणार असल्याने आम्ही ही या यंत्राचा वापर करणार असल्याचे शेतकरी नाना सूर्यवंशी यांनी सांगितलं आहे.

कृषी दिन

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिम्मित्त शासनानं राज्यभरात कृषी दिन 1 जुलै रोजी साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्राच्या शेती क्षेत्रासाठी केलेल्या कामाची दखल घेत हा निर्णय घेण्यात आला आहे. कृषी दिनाच्या निमित्तानं दरवर्षी कृषी सप्ताहाचं आयोजन केलं जातं. या सप्ताहामध्ये शेतकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शन केलं जातं. वसंतराव नाईक यांचा जन्म 1 जुलै 1913 रोजी झाला होता. ते 1963 ते 1975 दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. या कालावधीमध्ये दुष्काळनिवारणासाठी त्यांनी मोठं कार्य केलं होतं. त्यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्रात 1 जुलै हा कृषी दिन म्हणून साजरा केला जातो.

संबंधित बातम्या:

कृषी संजीवनी मोहिमेत 40 हजार गावांमध्ये 6 लाख शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचं मार्गदर्शन : कृषीमंत्री

मुख्यमंत्र्यांपासून शरद पवारांच्या भेटीगाठी, शेतकरी नेत्यांकडून आघाडी सरकारकडे ‘या’ 4 मागण्या

(Nashik Malegaon Devarpade Youth Farmer Kamlesh Ghumare make cultivation machine)