सोयापेंड आयातीला ‘ब्रेक’, आता सोयाबीनची साठवणूक की विक्री ? शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी

| Updated on: Dec 09, 2021 | 10:14 AM

सोयापेंडची आयात तर होणार नाही पण त्यामुळे काय सोयाबीनची पुन्हा साठवणूक करावी की काय? असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात डोकावू लागला आहे. मात्र, अति ताणले की तुटणारच त्यामुळे सोयाबीनला सरासरी 7 हजार रुपये क्विंटलचा दर मिळाला तर शेतकऱ्यांनी सोयाबीनची टप्प्याटप्प्याने विक्री करण्याचा सल्ला कृषितज्ञ हे देत आहेत.

सोयापेंड आयातीला ब्रेक, आता सोयाबीनची साठवणूक की विक्री ? शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी
संग्रहीत छायाचित्र
Follow us on

लातूर : सोयापेंडच्या आयातीवर (Soybean Market Price) सोयाबीनचे दर हे अवलंबून आहेत. यापूर्वी ऑगस्ट महिन्यामध्येच 12 लाख टन सोयापेंडच्या आयातीचा निर्णय झाला होता. त्यापैकी 6 लाख 50 हजार टन ( Import of Soyapend) सोयापेंडची आयातही झाली होती. त्यामुळे दिवाळीपर्यंत सोयाबीनचे दर हे दबावात होते. सोयापेंडचा साठा संपताच दिवाळीनंतर पुन्हा सोयाबीनचे दर वाढू लागले असतानाच उर्वरीत सोयापेंड आयातीचा निर्णय घेण्याची मागणी पोल्ट्रीफार्म धारकांकडून करण्यात आली होती. मात्र, असा कोणताही निर्णय नसल्याचे ( Central Government) केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता सोयापेंडची आयात तर होणार नाही पण त्यामुळे काय सोयाबीनची पुन्हा साठवणूक करावी की काय? असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात डोकावू लागला आहे. मात्र, अति ताणले की तुटणारच त्यामुळे सोयाबीनला सरासरी 7 हजार रुपये क्विंटलचा दर मिळाला तर शेतकऱ्यांनी सोयाबीनची टप्प्याटप्प्याने विक्री करण्याचा सल्ला कृषितज्ञ हे देत आहेत.

शेतकऱ्यांच्या काय आहेत अपेक्षा ?

हंगामाच्या सुरवातीलाच सोयाबीनचे दर हे कमी झाले होते. मात्र, घटलेले उत्पादन आणि अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान पाहता सोयाबीनचे दर वाढणारच हा आत्मविश्वास शेतकऱ्यांना होता. त्यानुसार दिवाळीनंतर सोयाबीनच्या दरात तब्बल 2 हजाराने वाढही झाली आहे. 4 हजार 500 वर असलेले सोयाबीन आता 6 हजार 600 वर गेलेले आहे. मध्यंतरी अनेक वावड्या उठल्या पण सोयाबीनच्या दरावर परिणाम झाला नाही. पण असे असताना शेतकऱ्यांना सोयाबीनला 8 हजाराचा दर मिळावा ही अपेक्षा आहे. मात्र, सध्याची परस्थिती पाहता शेतकऱ्यांनी 7 हजाराच्या आसपास दर गेले की विक्री करणे गरजेचे आहे.

साठवणूकीचे काय आहेत धोके?

ज्या तुलनेत सोयापेंडची आयात होणार होती त्यापैकी अजूनही 5 लाख 50 हजार टन साठा शिल्लक आहे. गेल्या काही दिवसांपासून सरकारची धोरणे बदलत आहेत. त्यामुळे पुन्हा निर्णय बदलला तर मात्र, सोयाबीनच्या दरात घसरण होण्याचा धोका आहे. दुसरीकडे यंदा उन्हाळी सोयाबीनचा पेरा वाढलेला आहे. पोषक वातावरणामुळे उत्पादन वाढले आणि बाजारात आवक वाढली तरी त्याचा परिणाम हा दरावर होणार आहे. त्यामुळे सध्याची मागणी आणि केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयावरुन सोयाबीनचे दर हे 7 हजारापर्यंत स्थिर राहतील असे व्यापारी अशोक आग्रवाल यांनी सांगितले आहे.

जोखीम पत्करुनच साठवणूक करा

हंगामाच्या सुरवातीपासून सोयाबीन हे दरावरुन चर्चेत राहिलेल आहे. आतापर्यंत दराबाबत शेतकऱ्यांचे अंदाज हे खरे ठरलेले आहेत. दर वाढले तरी आणि घसरले तरी मात्र, शेतकऱ्यांनी साठवणूकीवरच भर दिला होता. आता परस्थिती बदलत आहे. सरकारचे निर्णय आणि उन्हाळी सोयाबीनचे वाढलेले क्षेत्र या दोन्ही बाबींचा परिणाम सोयाबीनच्या दरावर होणार आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना 8 हजार रुपये क्विंटल दराची अपेक्षा आहे त्यांनी जोखीम पत्करुनच साठवणूक करावी अन्यथा इतर शेतकऱ्यांनी मात्र, 7 हजाराच्या आसपासचे दर पाहून विक्री केलेली फायद्याची राहणार आहे.

संबंधित बातम्या :

भाजीपाला रोपवाटिका काळाची गरज, असे करा व्यवस्थापन

दुधाळ जनावरांपासून उत्पादन वाढविण्याची शेतकऱ्यांना संधी, अनुदानावर मिळणार गाई-म्हशी

बाजार समित्यांच्या बळकटीकरणासाठी राज्य सरकारचे महत्वाचे निर्णय, पणन मंडळाच्या नियमातही होणार बदल