रेशीम शेती एक उत्तम पर्याय, क्षेत्रही वाढले अन् आता उद्योगांची संख्याही, जाणून घ्या सर्वकाही

| Updated on: Feb 15, 2022 | 12:22 PM

'विकेल तेच शेतामध्ये पिकलं' तर शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होण्यास वेळ लागणार आहे. मात्र, हा बदल घडून येण्यासाठी योग्य वेळ आणि चांगल्या पर्यायाची आवश्यकता असते. रेशीम शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसमोर चांगला पर्याय तर उभा राहत आहे. शिवाय रेशीमच्या दरात कायम वाढ होत असल्याने ती योग्य वेळही आली आहे.

रेशीम शेती एक उत्तम पर्याय, क्षेत्रही वाढले अन् आता उद्योगांची संख्याही, जाणून घ्या सर्वकाही
जालना येथील खरेदी केंद्रावरच आता रेशीम कोषची गुणवत्ता तपासली जाणार आहे.
Follow us on

नागपूर : ‘विकेल तेच शेतामध्ये पिकलं’ तर शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होण्यास वेळ लागणार आहे. मात्र, हा बदल घडून येण्यासाठी योग्य वेळ आणि चांगल्या पर्यायाची आवश्यकता असते. (Silk Farming) रेशीम शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसमोर चांगला पर्याय तर उभा राहत आहे. शिवाय रेशीमच्या दरात कायम वाढ होत असल्याने ती योग्य वेळही आली आहे. एवढेच नाही तर आता (Silk Thread) रेशीम धागा तयार करणाऱ्या उद्योगांमध्ये 2 ची भर पडणार आहे. त्यामुळे वाढीव क्षेत्रामुळे उत्पादन वाढले तरी बाजारपेठ उपलब्ध राहणार आहे. गेल्या वर्षभरापासून  (Directorate General of Silk) रेशीम महासंचालनालयाचे प्रयत्न आणि शेतकऱ्यांना या पीक पध्दतीमधील बदलाचे महत्व कळाल्याने राज्यात यंदा 19 हजार हेक्टरावर तुतीची लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात तर भर पडणार आहे आणि शिवाय एक चांगला पर्यायही उभा राहणार आहे.

रेशीम कोशाला विक्रमी दर, असा घ्या अनुदानाचा लाभ

तुती लागवड क्षेत्र वाढले असतानाही गत आठवड्यात रेशीम कोशाला 1 हजार 42 रुपये किलो असा दर मिळाला होता. म्हणजेच 1 लाख रुपये क्विंटल. त्यामुळे शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेऊन लागवड करणे गरजेचे आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी या योजने अंतर्गत 1 एकरसाठी तुती लागवड जोपासना तसेच साहित्य खरेदी यामध्ये रोपे, खते, औषधी यासाठी एकूण 2 लाख 176 रुपये इतके अनुदान 3 वर्षात विभागून दिले जाते. तसेच किटक संगोपन गृह बांधकामासाठी एका वर्षात 92 हजार 289 रुपये अनुदान देण्यात येते. या योजनेत लाभ घेण्यासाठी मात्र, लाभार्थी यांचेकडे जॉब कार्ड असणे आवश्यक आहे.

धागा तयार करणाऱ्या उद्योगाची काय आहे स्थिती?

राज्यात कोशापासून धागा तयार करणारे उद्योग हे तीन आहेत. यामध्ये अणखीन 2 उद्योगांची भर पडणार असल्याचे रेशीम महासंचालनालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे. राज्यात यंदा तुती लागवडीमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे उत्पादन वाढणार हे निश्चित असून शेतकऱ्यांना बाजारपेठ मिळवून देण्याच्या अनुशंगाने हे पाऊल उचलण्यात आले आहे. दोन उद्योग उभारणीला मंजूरी मिळाली असून लवकरच याचे काम सुरु होणार असल्याचे रेशीम महासंचालनालयाचे उपसंचालक महेंद्र ढवळे यांनी सांगितले आहे.

19 हजार हेक्टरावर तुतीची लागवड

गेल्या वर्षभरापासून तुती लागवडीचे महत्व शेतकऱ्यांना पटवून दिले जात आहे. रेशीम महासंचालनालयाच्यावतीने जनजागृतीसाठी महारथ रॅलीही काढण्यात आली होती. त्याचा फायदा झाला असून यंदा 19 हजार हेक्टरावर तुतीची लागवड झाली आहे. यामधून 2 हजार 205 टन कोश उत्पादन मिळेल असा दावा आहे. वाढत्या उत्पादनाबरोबर उद्योगही वाढणे गरजेचे आहे. यामुळे दोन उद्योग उभारणीला परवानगी देण्यात आली आहे.

संबंधित बातम्या :

Rabi Season : पीक पध्दतीमध्ये बदल, ज्वारीचे क्षेत्र घटले, शेतकऱ्यांनी कोणते पीक निवडले..!

व्हॅलेंटाईनला गुलाबासोबत चालून आली ‘लक्ष्मी’, पुण्यातल्या मावळ प्रांतात शेतकऱ्यांना गणित परफेक्ट जमलं!

जालन्याच्या मोसंबीला किसान रेल्वेचे ‘इंजिन’, क्षेत्रही वाढले अन् शेतकऱ्यांचे उत्पन्नही