Summer Season: उन्हाळी सोयाबीनने शेतकऱ्यांचे पारणे फिटले, खरीप हंगामाचे टेन्शन मिटले

| Updated on: Mar 10, 2022 | 5:10 AM

यंदा प्रथमच उन्हाळी हंगामात चित्र बदलले आहे. कधी नव्हे ते सोयाबीनचा पेरा विक्रमी झाला असून सध्या मराठवाड्यात सोयाबीन बहरात आहे. यामुळे वेगळा प्रयोग तर यशस्वी झाला आहे पण शेतकऱ्यांची भविष्यातली चिंता मिटली आहे. उन्हाळी सोयाबीन जोमात असल्याने आता खरिपातील बियाणाची चिंता मिटलेली आहे. बियाणाच्याबाबतीत शेतकरी हा स्वयंपूर्ण झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची धावपळ तर होणारच नाही पण विकतच्या बियाणातून होणारी फसवणूकही टळणार आहे.

Summer Season: उन्हाळी सोयाबीनने शेतकऱ्यांचे पारणे फिटले, खरीप हंगामाचे टेन्शन मिटले
यंदा उन्हाळी हंगामातील सोयाबीनमुळे खरिपातील बियाणांची चिंता मिटली आहे.
Follow us on

लातूर : यंदा प्रथमच (Summer Season) उन्हाळी हंगामात चित्र बदलले आहे. कधी नव्हे ते सोयाबीनचा पेरा विक्रमी झाला असून सध्या  (Marathwada) मराठवाड्यात सोयाबीन बहरात आहे. यामुळे वेगळा प्रयोग तर यशस्वी झाला आहे पण शेतकऱ्यांची भविष्यातली चिंता मिटली आहे. उन्हाळी सोयाबीन जोमात असल्याने आता (Kharif Season) खरिपातील बियाणाची चिंता मिटलेली आहे. बियाणाच्याबाबतीत शेतकरी हा स्वयंपूर्ण झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची धावपळ तर होणारच नाही पण विकतच्या बियाणातून होणारी फसवणूकही टळणार आहे. मात्र, घरगुती बियाणे वापरण्यापूर्वी ते प्रमाणित आहे का नाही याची शहनिशा शेतकऱ्यांना करावी लागणार आहे. यंदाचे पोषक वातावरण आणि कृषी विभागाने केलेली जनजागृती शेतकऱ्यांच्या कामी आलेली आहे. मात्र, यंदा महाबीजनेही मोठ्या प्रमाणात बियाणांसाठी सोयाबीनची लागवड केली आहे. त्यामुळे आता या सोयाबीनची विक्री होणार की नाही याबाबत साशंका उपस्थित होत आहे.

खरीप हंगामात झाले होते नुकसान

खरीप हंगामात पीक जोमात असताना अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले होते. यामध्ये सर्वाधिक सोयाबीनला फटका बसला होता. त्याचवेळी खरिपात झालेले नुकसान रब्बी हंगामात भरुन काढण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला होता. शिवाय मुबलक पाण्यामुळे हे शक्यही झाले आहे.अधिकच्या पावसामुळे रब्बी हंगामातील पेरण्या लांबणीवर पडल्या होत्या. त्यामुळे ज्वारी पीक घेणे शक्य नसल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीनचा पर्याय निवडला असून तो आता यशस्वी झाल्याचे चित्र शिवारात पाहवयास मिळत आहे.

उत्पादकता कमी मात्र, बियाणांचा प्रश्न मिटणार

शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्ये बदल करुन सोयाबीन आणि हरभरा यावर भर दिला आहे. पोषक वातावरण, मुबलक पाणी असतानाही खरीप हंगामाप्रमाणे सोयाबीनला उतारा पडत नाही. मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यातील पहिल्या पेऱ्यातील सोयाबीनची काढणी झाली असून एकरी 4 ते 5 क्विंटल एवढे उत्पादन होत आहे. हा वातावरणाचा परिणाम आहे. शिवाय यंदा पहिल्यांदाच शेतकऱ्यांनी हा प्रयोग केल्याने काही बाबींमध्ये चूका झाल्या असल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक दत्तात्रय गावसाने यांनी सांगितले आहे. मात्र, ज्या शेतकऱ्यांनी भोदावर लागवड केली आहे त्यांना अधिकचे उत्पादन झाले आहे.

सध्या सोयाबीनची काय आवस्था

उन्हाळी हंगामातील सोयाबीन हे शेंगा लागण्याच्या अवस्थेत आहे. यंदा कमी क्षेत्रात आणि पाण्याची उपलब्धता पाहून शेतकऱ्यांनी हा प्रयोग केला होता. स्प्रिक्लंर, ठिबकचा वापर करुन शेतकऱ्यांनी हे पीक जोपासले आहे. यामुळे अधिकचे उत्पन्न मिळणार नसले तरी केलेला प्रयोग हा यशस्वी झाला असून किमान खरिपातील बियाणांचा प्रश्न मिटलेला आहे.

संबंधित बातम्या :

‘नाम’चे काम : नांदेडमधील 121 आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना मदतीचा हात, जिल्हा प्रशासनही राबवणार आत्मसन्मान योजना

Latur Market : शेतीमालाची आवक वाढली, हमीभाव केंद्रापेक्षा खुल्या बाजारातच हरभऱ्याची विक्री

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी : योजनेचा लाभ घ्या अन् कृषीपंपाचे वीजबिल कोरे करा, आता उरले 22 दिवस