Nanded : पोषक वातावरणानंतरही भुईमूग उत्पादनात घटच, हंगामाच्या अंतिम टप्प्यात बदलले चित्र

| Updated on: May 16, 2022 | 9:50 AM

हंगामाच्या सुरवातीला पोषक वातावरण आणि मुबलक प्रमाणात पाणी यामुळे भुईमूग पीक बहरले होते. शिवाय अधिक उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी वेळोवेळी खताची मात्रा दिली. मात्र, हंगामाच्या अंतिम टप्प्यात वाढत्या उन्हामुळे भुईमूगाचा पाला तर करपलाच पण शेंगाही पोसल्या नाहीत. त्यामुळे खर्च करुनही अपेक्षित उत्पादन मिळणार नाही.

Nanded : पोषक वातावरणानंतरही भुईमूग उत्पादनात घटच, हंगामाच्या अंतिम टप्प्यात बदलले चित्र
भर उन्हामध्ये नांदेड जिल्ह्यात भुईमूग काढणी कामे सुरु आहेत
Follow us on

नांदेड : निसर्गाचा लहरीपणा शेती उत्पादन घट होण्यास कारणीभूत ठरत आहे. आतापर्यंत (Unseasonable Rain) अवकाळी पावसामुळे फळबागांवर परिणाम झाला होता. आंबा आणि द्राक्ष उत्पादनात कमालीची घट झाली असताना आता उन्हाच्या झळा हंगामी पिकांना बसत आहेत. जिल्ह्यात दरवर्षी (Summer Crop) उन्हाळी भुईमूंगावर शेतकऱ्यांचा भर असतो. यंदाही क्षेत्र वाढले आहे मात्र, वाढत्या उन्हामुळे आणि अंतिम टप्प्यात पाण्याची कमतरता भासल्याने उत्पादनात घट निश्चित मानली जात आहे. त्यामुळे उत्पादनावर झालेला खर्च तरी पदरी पडतो की नाही अशी स्थिती आहे. सध्या उन्हाचा पारा 42 अंशावर असताना (Groundnut crop) भुईमूग काढणी कामे सुरु आहेत. वातावरणातील बदलामुळे हे पीक हातावेगळे करण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे.

भुईमूग बहरला पण शेंगाच पोसल्या नाहीत

हंगामाच्या सुरवातीला पोषक वातावरण आणि मुबलक प्रमाणात पाणी यामुळे भुईमूग पीक बहरले होते. शिवाय अधिक उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी वेळोवेळी खताची मात्रा दिली. मात्र, हंगामाच्या अंतिम टप्प्यात वाढत्या उन्हामुळे भुईमूगाचा पाला तर करपलाच पण शेंगाही पोसल्या नाहीत. त्यामुळे खर्च करुनही अपेक्षित उत्पादन मिळणार नाही. शेतकरी पीक पध्दतीमध्ये बदल करुन उत्पादन वाढीचा प्रयत्न करीत आहे. पण निसर्गाच्या लहरीपणाचा अडसर होत आहे. गत खरिपापासून शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन मिळालेले नाही. यंदा तर हंगामी पिकांचीही अवस्था अशी झाल्याने शेतकरी त्रस्त आहे.

भर उन्हात काढणी कामे

उन्हाचा पारा 40 अंशापेक्षा अधिकवर गेला आहे. अशा रखरखत्या उन्हामध्ये भुईमूगाची काढणी कामे सुरु आहेत. आगामी खरिपासाठी शेत रिकामे करण्याच्या उद्देशान जे मिळेल ते पदरात पाडून घेऊन काढणी कामे सुरु आहेत. उत्पादन घटले तरी किमान घरी शेंगा विकत घेण्याचा खर्च टळेल याच अपेक्षेने आता काढणी कामे सुरु आहेत. प्रत्येक पिकांच्या बाबतीत असेच होत असल्याने शेतकरी हतबल आहे.

हे सुद्धा वाचा

तेलाचे दर वाढले तेलबियांचे काय?

गेल्या काही दिवसांपासून खाद्यतेलांच्या किंमती ह्या दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे भुईमूगालाही चांगला दर मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. पण सध्या मार्केटमध्ये भुईमूगाला 5 हजार 400 असा दर आहे तर दुसरीकडे सर्वच खाद्यतेलाचे दर 150 (किलो) रुपयांपेक्षा जास्त आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला अधिकचा दर मिळत नाही तर प्रक्रिया उद्योजकांची यामध्ये चांदी होत आहे.