टोमॅटो उत्पादकांची परवड सुरुच, सांगली सोलापुरात टोमॅटो रस्त्यावर फेकले; येवल्यात शेतात मेंढ्या सोडत संताप

| Updated on: Aug 30, 2021 | 2:09 PM

टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची स्थिती सर्वात खराब असून किलोला 1 ते 2 रुपये इतका भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च किंवा वाहतूक खर्च निघणं अवघड होऊन बसलेय.

टोमॅटो उत्पादकांची परवड सुरुच, सांगली सोलापुरात टोमॅटो रस्त्यावर फेकले; येवल्यात शेतात मेंढ्या सोडत संताप
नाशिक शेतकरी
Follow us on

नाशिक: राज्यातील शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. टोमॅटो, ढोबळी मिरची आणि फ्लॉवर उत्पादक शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं राहिलं आहे. टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची स्थिती सर्वात खराब असून किलोला 1 ते 2 रुपये इतका भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च किंवा वाहतूक खर्च निघणं अवघड होऊन बसलेय. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांसमोर टोमॅटो रस्त्यावर फेकण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही. नाशिक जिल्ह्याली येवल्यामध्ये युवा शेतकऱ्यानं टोमॅटोच्या शेतात मेंढ्या चरण्यास सोडून दिल्या आहेत. सोलापूरमध्ये टोमॅटो रस्त्यावर फेकण्यात आले. तर, सांगलीतही तरुण शेतकऱ्यानं टोमॅटो फेकून दिले.

उभ्या पिकात मेंढ्या सोडल्या

येवला तालुक्यातील अंदरसुल गावातील शेतकरी ज्ञानेश्वर जाधव यांनी एक एकर मध्ये टोमॅटोचे पीक घेतले होते. मात्र, टोमॅटोच्या भावात दिवसेंदिवस घसरण होत गेल्याने संतप्त होत या शेतकऱ्यांने आपल्या उभ्या टोमॅटोच्या पिकात मेंढ्याच चरण्यास सोडून दिल्या. टोमॅटोचे पीक उपटून टाकत आपला संताप व्यक्त केला. या शेतकऱ्याने टोमॅटो बरोबर ढोबळी मिरची ,कोबी, फ्लॉवर हे सुद्धा पीक घेतले होते. मात्र, त्याला देखील भाव मिळत नसल्याने हा शेतकरी हवालदिल झाला आहे. आता कोणते पीक घ्यावे असा प्रश्न या शेतकऱ्यांना पडला आहे.

सांगलीतही टोमॅटो रस्त्यावर फेकले

सांगली जिल्ह्यातील जत मार्केट मध्ये टोमॅटोला भाव नसल्याने शेतकऱ्यानं चक्क रस्त्यावर टोमॅटो फेकून दिला आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शेतकऱ्यांकडे लक्ष द्या, असे म्हणत आपला पिकवलेल्या माल रस्त्यावर फेकून दिला. सोमनाथ कुळगी जत तालुक्यातील वळसंग येथील शेतकरी आहेत. त्यांनी आज जत मार्केट मध्ये दीड टन टोमॅटो आणला होता. पण मालाला 10 हजार सुद्धा मिळाले नाहीत. त्यांना लागवडी साठी 1 लाख रुपये आणि औषध साठी 30 ते 40 हजार खर्च आला आहे. त्यामुळे त्यांनी आज सकाळी भर चौकात मार्केट समोर रस्त्यावर टोमॅटो फेकून दिला आहे.

जत मार्केट मध्ये मालाची आवक वाढली आहे. एरवी 200 ते 250 कॅरेट आवक होत होती. आज अचानक 500 कॅरेट आवक झाल्याने आणि त्यात पाऊस पडल्याने व्यापारी आले नाहीत त्यामुळे भाजीपाला आणि टोमॅटोचे दर पडले आहेत, असे जत मार्केट अध्यक्ष यांनी सांगितले.

सोलापूरमध्येही शेतकरी मेटाकुटीस

सोलापूरमध्येही टोमॅटोला भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्याच्या कडेला टाकले. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला टोमॅटो टाकून दिले आहेत. टोमॅटोचे दर कोसळल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी मेटाकुटीस आले  आहेत.

केंद्र 50 टक्के सबसिडी देणार?

टोमॅटोला मातीमोल बाजार भाव मिळत असल्याने लासलगाव दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना टीव्ही 9 मराठीच्या प्रतिनिधीने प्रश्न विचारले. टोमॅटोला बाजार भाव नसल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात सापडला असून केंद्राकडून काही दिलासा मिळेल का?, असं विचारलं असता त्यांनी या प्रश्नाची दखल घेत केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्याजवळ तत्काळ पाठपुरावा केला. यानंतर 50% सबसिडी देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, राज्य सरकारला कळवल्यानंतरही राज्य सरकारकडून अद्यापही कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचं चित्र आहे.

इतर बातम्या:

नावात राणे, विचार चार आण्याचे, शिवसेना नेते बबनराव थोरात यांचं टीकास्त्र

विरोधकांच्या मागं ईडी, सीबीआय लावण्याचे उद्योग बंद करावेत, विनायक राऊतांचा केंद्राला इशारा

Tomato Price down Solapur, Sangli Nashik Yeola Farmers throw tomato on Road